महाळुंगे – खेळताना खड्यात पडून तिघा भावंडांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आंबेठाण गावातील लांडगे वस्ती येथे घडली आहे. एका व्यक्तीने खड्डा उकरून ठेवला होता. त्यात पाणी साठले होते त्यातच या तिघा भावंडांचा बुडून मृत्यू झाला. मृत मुले ही बिहार येथील जयकिशन दास यांची आहेत. ते कामानिमित्त लांडगे वस्ती येथे भाड्याने राहत असत.
किशोर दास हे मूळ बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. त्यांना एकूण चार अपत्य आहेत. त्यातील रोहित दास (वय -८), राकेश दास (वय -६), श्वेता दास (वय -४) असे मयत झालेल्या मुलांची नावे आहेत. एका बेजबाबदार व्यक्तीने हा खड्डा करून ठेवल्याने हा मोठा अनर्थ झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी मदत कार्य टिम व महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस प्रशासन दाखल झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वाय.सी.एम हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास महाळुंगे पोलीस करत आहेत.