Ujjwal Nikam : केतन अग्रवाल प्रकरणात उज्वल निकम यांची नियुक्ती; पहिली प्रतिक्रिया समोर म्हणाले…
Ujjwal Nikam : या प्रकरणी केतनची वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Ujjwal Nikam : महाराष्ट्रात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची कसून चौकशी केली जात आहे. चौकशीत सियाकडून विविध दावे केले जात आहे. यामुळे या प्रकरणाचा गुंता अधिक वाढताना दिसत आहे.
या प्रकरणी केतनची वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुलाला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कोणतीही कसूर करणार नाही, असे आश्वासन दिले.
विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्यात यावी तसेच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी तत्काळ मान्य केली. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास संमती दर्शवत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उज्वल निकम?
“हे अत्यंत आव्हानात्मक प्रकरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून अग्रवाल कुटुंबीयांची मागणी माझ्यापर्यंत पोहोचवली. या प्रकरणात पोलिसांचा तपास हा सर्वांत महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. तपासातील प्रत्येक बाब मजबूत असणे गरजेचे असून हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.”
हेही वाचा : Pimpri Railway Station: पिंपरी रेल्वे स्थानकावरील एस्केलेटर पुन्हा सुरू; ‘दैनिक प्रभात’च्या बातमीचा इम्पॅक्ट
लोहगड किल्ल्याची रेकी
केतनची हत्या करण्याचा कट पूर्वनियोजित होता. यासाठी प्लॅनिंग करण्यात आले होते. केतनच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी एका कॅफेत बसून हा कट शिजला असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे केतनची हत्या करण्यासाठी दोघांनी मे महिन्यात लोहगड किल्ल्याची रेकी केल्याचे समजते. पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी मोबाइलमधील चॅट देखील डिलीट केले. पोलिसांनी त्यांचे मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येईल.
नीरज कुमार माफीचा साक्षीदार
चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे प्रेमसंबंध होते. सियाच्या दाव्यानुसार तिने केतनला ही गोष्ट सांगितली होती. पण तो तिच्यासोबतच लग्न करण्यावर ठाम होता. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याला संपवलं असा आरोप त्यांच्यावर आहे. आरोपी चेतन चौधरीच्या दुकानातील कर्मचारी नीरज कुमार साक्षीदार होणार असल्याचे सांगितले जात आहे. चेतनने घटनेच्या दिवशी निरजसोबत मोबाईलची अदलाबदल केली होती. नीरजने दिवसभर चेतनचे फोन स्वीकारले, तर चेतन निरजचा फोन घेऊन लोहगडाला गेला. मात्र पोलिसांच्या तांत्रिक तपासात निरजच्या मोबाईलचे लोहगड येथील लोकेशन समोर आल्याने चेतनचा हा बनाव उघड झाला.
हेही वाचा : Police Action: मोठा अनर्थ टळला! भरचौकात हत्यारांसह फिरणारे दोन तरुण अटकेत; पोलिसांची धडाकेबाज कारवाई






