मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याचे दोन्ही शासन निर्णय (जीआर) रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी ही यशस्वी लढाई असल्याचे सांगितले. सरकारने शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, या समितीच्या अहवालानंतरच त्रिभाषा सूत्राबाबत पुढील धोरण ठरेल. मात्र, ठाकरे यांनी ५ जुलै रोजी नियोजित मनसे-शिवसेना (यूबीटी) मोर्चाचे आता विजयी सभेत रूपांतर करणार असल्याची घोषणा केली. भाजपचा ‘खोट्याची फॅक्ट्री’चा अजेंडा उघड पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “भाजपचा छुपा अजेंडा मराठी माणसात फूट पाडून अमराठी मतं खेचण्याचा होता. पण मराठी माणसाने समंजसपणा दाखवला. भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे. मराठी एकजुटीमुळे सरकारला जीआर रद्द करावे लागले.” ठाकरे यांनी भाजपला ‘खोट्याची आणि अफवांची फॅक्ट्री’ संबोधताना, “सक्तीच्या विरोधातील मोर्चा फोडण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी झाला. आता ५ जुलैला आम्ही विजयी जल्लोष सभा घेऊ. याचे ठिकाण आणि तपशील दोन दिवसांत ठरवले जातील,” असे सांगितले. हिंदी सक्तीला कायमचा विरोध ठाकरे यांनी स्पष्ट केले की, डॉ. नरेंद्र जाधव यांच्या समितीचा अहवाल काहीही असो, हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही. “सक्ती मागे घ्यायला लावली आहे. कोणतीही समिती नेमली तरी मराठी माणूस सक्ती स्वीकारणार नाही,” असे ठाकरे म्हणाले. त्यांनी मराठी जनतेला या विजयी सभेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “संकटाची वाट पाहू नका, मराठी एकजुटीची ताकद कायम ठेवा,” असे सांगत त्यांनी सर्वांना ५ जुलैच्या सभेला उपस्थित राहण्याची विनंती केली. या घोषणेमुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्या संयुक्त आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे.