NCP Sunetra Pawar : राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन घमासान! सुनेत्रा पवारांना विरोध का होतोय? बड्या नेत्याने सगळचं सांगितलं
NCP Sunetra Pawar : यानंतर आता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी देखील सिंह यांच्या आक्षेपावर सहमती दर्शवली आहे.

NCP Sunetra Pawar : सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घरघर लागली असल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेत निवडीविरोधात कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा संघर्ष सुरू झाला आहे. यानंतर आता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी देखील सिंह यांच्या आक्षेपावर सहमती दर्शवली आहे. (NCP Sunetra Pawar)
सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदीच्या निवडीवर उपस्थित केलेला आक्षेप योग्य आहे. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सगळेच स्वीकारतात, त्यावर कोणाला आक्षेप नाही. पण पक्षाच्या संविधानानुसार त्यांची निवड व्हावी ही मागणी आहे. सच्चिदानंद सिंह हे जबाबदार पदाधिकारी आहेत, त्यांची मागणी योग्य आहे, असे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर त्यांनी ही प्रतिक्रिया एका न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना दिली आहे.
नेमकं प्रकरण काय? (NCP Sunetra Pawar)
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून मोठा खल झाला होता. अखेर सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड अवैध असून, त्यावर पक्षातील बड्या नेत्याने आक्षेप नोंदवला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह या निवडीवर कायदेशीर नोटीस पाठवून जाब विचारला. मात्र, पक्षात कोणीही ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचा मोठा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. (NCP Sunetra Pawar)
“मी तीन महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांना यासंदर्भात पत्र पाठवले होते. मात्र, ते पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून गांभीर्याने घेण्यात आले नाही आणि मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. परिणामी मी सुनेत्रा पवार यांच्या निवडीविरोधात कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला.” असं राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह म्हणाले.
हेही वाचा : ATS: पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर एटीएसचा मोठा प्रहार; पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये धाडी
पक्षात संवादाचा प्रचंड अभाव ( NCP Sunetra Pawar)
अजितदादा गेल्यानंतर पक्षात संवादाचा प्रचंड अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. संवाद नाही, आपापसात चर्चा नाही, एकमेकांशी बोलायचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते सगळं अजितदादा गेल्यानंतर थांबले आहे. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे, असे ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी सांगितलं.
तटकरे-पवार-पटेल यांच्यात संवादाचा अभाव (NCP Sunetra Pawar)
सुनेत्रा पवारांच्या अधिकारात कोणीही हस्तक्षेप करत नाही, सगळे त्यांच्यासोबत आहेत. पण पक्षातील संवादाचा अभाव संपला पाहिजे. सगळ्यांनी यावर चिंतन केलं पाहिजे. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यातही संवादाचा अभाव आहे. त्याचमुळे आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर मिळाले नाही, असेही ब्रिजमोहन श्रीवास्तव म्हणाले आहेत.





