Tungareshwar Wildlife Sanctuary : तुंगारेश्वर अभयारण्यात केवळ 30 प्राण्यांच्या नोंदी; अतिक्रमण, जंगलतोडीचा प्राण्यांच्या संख्येवर परिणाम

वसई : वसईच्या तुंगारेश्वर अभयारण्यात बुद्धपौर्णिमेला पारंपारिक पद्धतीने प्राणी गणना करण्यात आली आहे. या गणनेत केवळ ३० प्राणांच्या नोंदी करण्यात आल्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. वसईच्या पूर्वेच्या भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यात दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गानिभाव व प्राणांच्या प्रजातीची माहिती मिळविण्यासाठी प्राणी गणना केली जाते.
यंदाच्या वर्षी सुद्धा बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागाकडून प्राणीगणना करण्यात आली. सात पाणवठ्याच्या ठिकाणी नियोजन करून त्याठिकाणी लाकडी मचाण (माची) तयार करण्यात आली होती. त्यावर वनकर्मचारी व प्राणीप्रेमी यांच्या शांतपणे टेहळणी करून पाणवठ्याच्या ठिकाणी येणाऱ्या प्राण्यांवर लक्ष ठेवून त्याच्या नोंदी घेण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी ३ वन कर्मचारी व प्राणी प्रेमी यांचा समावेश होता.
सुरवातीच्या काळापासून पाणी गणना व प्राण्यांच्या प्रजातींची माहिती मिळविण्यासाठी वनविभागाकडून दरवर्षी निसर्गनुभव कार्यक्रम घेण्यात येतो. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लख्ख प्रकाश असल्याने त्यादिवशी पारंपारिक पद्धतीने प्राणी गणना केली जात आहे. परंतु वन्य प्राण्यांची सविस्तर माहिती समोर आणण्यासाठी या पांरपरिक पद्धतीबरोबरच कॅमेरा ट्रॅपिंग आणि ट्रान्झक्ट पद्धतीचा वापर केला जात आहे.
मागील काही वर्षांपासून जंगल परीसरात मानवी हस्तक्षेप वाढू लागला आहे. काही अतिक्रमण, जंगल तोड, आगी लावण्याचे प्रकार तर काही ठिकाणी ध्वनी आवाजाचे प्रदूषण वाढीस लागत आहे. त्यामुळे हळूहळू वन्य प्राणांचा वावर हा जवळच्या भागातून कमी होऊ लागला आहे. यापूर्वी प्राणिगणने दरम्यान मोठ्या प्रमाणात प्राणी आढळून येत होते. आता मात्र ती संख्या घटत असल्याने प्राणी प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
कोणते आहेत प्राणी – पक्षी ?
या दरम्यान पाणवठ्यांच्या ठिकाणी रानडुक्कर २, वानर ३, रान मांजर १, लिफ माकड १, घुबड ३, मोर १, काळी मांजर २, कुहू कोंबडी २, टोई पोपट ६, खंड्या २, माकड ३ असे एकूण ३० वन्य प्राणी दिसून आले असून त्यांच्या नोंदी करण्यात आल्याची माहिती तुंगारेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री साळवे यांनी दिली आहे.





