Rajya Sabha Election : राष्ट्रवादीचा राज्यसभा सस्पेन्स वाढला; अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत, कोणाला मिळणार संधी?
Rajya Sabha Election : सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत खलबतं सुरू आहेत.

Rajya Sabha Election : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा अधिकृतपणे राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाला संधी देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. (Rajya Sabha Election)
या रिक्त जागेसाठी ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर होते. भुजबळ यांना दिल्लीच्या राजकारणात रस असून त्यांना राज्यसभेवर धाडले जाईल, अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, स्वतः छगन भुजबळ यांनी या सर्व चर्चांचे खंडन करत आपण या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Rajya Sabha Election)
भुजबळ यांनी माघार घेतल्याने आता या जागेसाठी पक्षात अनेक नवीन नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आनंद परांजपे, अविनाश आदिक आणि पक्षातील काही निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नावांचा विचार केला जात आहे. (Rajya Sabha Election)
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, जातीय समीकरणे आणि प्रादेशिक समतोल साधणाऱ्या नेत्यालाच राज्यसभेवर पाठवण्याची रणनीती पक्षाचे वरिष्ठ नेते आखत असल्याचे समजते. (Rajya Sabha Election)
सुनेत्रा पवार यांनी बारामतीत ऐतिहासिक मताधिक्य मिळवून आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे, त्यामुळे त्यांनी रिक्त केलेल्या या जागेवर कोणाची वर्णी लागते, यावर पक्षाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. पक्षातील युवा नेतृत्व किंवा संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या निष्ठावान चेहऱ्याला दिल्लीत पाठवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
इच्छूकांची चढाओढ
सुनेत्रा पवार यांनी रिकामी केलेली ही जागा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच पक्षातील अनेक वरिष्ठ आणि इच्छूकांची या पदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. सद्यस्थितीत पक्षातील अंतर्गत स्पर्धा तीव्र झाली असून, विविध गटांकडून आपल्या समर्थकाचे नाव पुढे रेटले जात आहे. (Rajya Sabha Election)
विशेषतः ज्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, अशा चेहऱ्यांचा विचार प्राधान्याने केला जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीतील वजन कायम राखण्यासाठी अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्वाला संधी मिळावी, असा एक मतप्रवाह पक्षात दिसून येत आहे. (Rajya Sabha Election)





