Top 15 News : ठाण्यात ‘सौ दाऊद, एक राऊत’च्या घोषणा, मोदी सरकारमध्ये मोठे बदल होणार? आणि डीजेविरोधी बापटांच्या समर्थनार्थ सोनाली कुलकर्णी, वाचा टॉप १५ बातम्या
Top 15 News : महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे.

सरकारी भरती परीक्षांसाठी नवी समिती;
विद्यार्थ्यांच्या सूचनाही जाणून घेणार
Top 15 News : महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेणार आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस आणि लोकप्रतिनिधींकडून सूचना व अभिप्राय घेतले जाणार आहेत. पुण्यात ७ ते १० सप्टेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष सुरू राहणार आहे. तसेच १२ सप्टेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समिती विद्यार्थी व परीक्षार्थींशी संवाद साधणार आहे. नागरिकांना सूचना, शिफारशी आणि हरकती सादर करता येणार आहेत.
ठाण्यात ‘सौ दाऊद, एक राऊत’च्या घोषणा;
संजय राऊत म्हणाले, ‘हे ठाणे फक्त…’
ठाण्यातील दहीहंडी उत्सवात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत गोविंदांनी ‘सौ दाऊत, एक राऊत’ अशा घोषणा दिल्या. यावेळी राऊत यांनी ठाण्यातील उत्साहाचे कौतुक करत राजन विचारे यांचे अभिनंदन केले. “हे बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे आहे,” असे राऊत म्हणाले. विधानसभेत हळूहळू थर वाढवत पुढे जायचे आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच ठाण्यातील उत्सवाचे वातावरण पाहता उद्धव ठाकरे यांना येथे बोलावले पाहिजे, असे राऊत म्हणाले. ठाणे शहर फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि आनंद दिघे यांचे असल्याचा दावा त्यांनी केला.
‘उमेदवारी न मिळालेल्यांनी पक्ष पुढे नेण्यासाठी काम करावं’;
सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होळ येथे शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. अजित पवारांच्या नेतृत्वामुळे सोमेश्वर कारखाना आज भक्कम स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले. कारखाना कोण्या एका व्यक्तीचा नसून सर्व शेतकरी आणि सभासदांचा असल्याचे त्या म्हणाल्या. साखर उद्योग ग्रामीण अर्थकारणाचा कणा असून आधुनिक तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, ‘ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांनी पक्ष पुढे नेण्यासाठी काम करावं,’ असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
नागपुरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम;
३० सप्टेंबरपर्यंत फॉर्म ६ भरण्याचे आवाहन
नागपुरात मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. नवीन मतदारांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान फॉर्म क्रमांक ६ भरून नोंदणी करता येणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. ३० सप्टेंबरपर्यंत प्राप्त अर्जांची पडताळणी केल्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही सामान्य प्रक्रियेतून फॉर्म ६ भरता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
‘मैं हूँ डॉन’वर अंबादास दानवेंचा ठेका;
तरुणांचा जल्लोष, दहीहंडी उत्साहात
छत्रपती संभाजीनगरमध्ये दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना आमदार अंबादास दानवे यांनीही तरुणांसोबत ठेका धरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टीव्ही सेंटर परिसरात आयोजित ‘धर्मरक्षक दहीहंडी’ कार्यक्रमात दानवे यांनी ‘मैं हूँ डॉन’, ‘एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों’ आणि ‘किसमें कितना है दम, मटकी फोडे’ या गाण्यांवर डान्स केला. दानवेंचा डान्स पाहून तरुणांनी मोठा जल्लोष केला. दहीहंडी हा केवळ उत्सव नसून सामूहिक शक्ती आणि एकजुटीचे प्रतीक असल्याचे दानवे यांनी सांगितले. श्रीकृष्णाच्या गोवर्धन पर्वत उचलण्याच्या प्रसंगातूनही सामुदायिक शक्तीचा संदेश मिळतो, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात पावसाची उघडीप;
पुढील ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता कमी Top 15 News :
महाराष्ट्रात सध्या मोठ्या पावसाची चिन्हे नसून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, धुळे, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, जालना आणि हिंगोलीमध्येही तुरळक पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळेल. पावसाने उघडीप घेतल्याने तापमानात वाढ झाली असून सोलापुरात ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. खरिपाच्या हंगामात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
महिला दहीहंडीतून ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ फोडली;
धुळ्यात युवासेनेचा सामाजिक संदेश
धुळ्यात महिला दहीहंडी उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देण्यात आली. भगवा चौकात युवासेनेचे राज्य सहसचिव ॲड. पंकज गोरे यांच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या उत्सवात ‘अवैध धंद्यांची दहीहंडी’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. बर्वे कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत दहीहंडी फोडली. दहीहंडीच्या गाण्यांसह आदिवासी गीतांवर विद्यार्थिनींनी ठेका धरला. धुळ्यातील कथित अवैध धंदे, त्याचा तरुणाईवर होणारा परिणाम आणि वाढती गुन्हेगारी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणाईला अवैध धंद्यांपासून दूर ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
ऊसदरासाठी शेतकरी आक्रमक;
२९ सप्टेंबरपासून हुबळीत बेमुदत धरणे आंदोलन
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी उच्चांकी दरासाठी आंदोलनाच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारने साखरेचा किमान आधारभूत दर प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, या मागणीसाठी २९ सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हुबळीतील निवासस्थानाबाहेर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गुरलापूर येथील शेतकरी मेळाव्यात आंदोलनाची घोषणा केली. मागण्या मान्य न झाल्यास दोन्ही राज्यांतील एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. गत हंगामातील उसाला प्रतिटन ३०० रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणीही करण्यात आली.
पालघरमध्ये रुग्णालयात शिवसैनिकांचा गोंधळ;
डॉक्टरांना शिवीगाळ अन् कर्मचाऱ्याला मारहाण
पालघरमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा पथकातील सदस्यांवर उपचार सुरू असताना रुग्णालयात शिवसैनिकांनी गोंधळ घातल्याचा आरोप आहे. तपासणीच्या शुल्कावरून हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि अन्य कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. सिटी स्कॅन का करण्यात आला, असा जाब डॉक्टरांना विचारण्यात आला. यावेळी रुग्णालय फोडण्याची धमकी देत महिला डॉक्टरांशी अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप आहे. तसेच एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचेही सांगण्यात आले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
मोदी सरकारमध्ये मोठे बदल होणार?
नव्या टीमनंतर मंत्रिपदासाठी नेत्यांची लॉबिंग सुरू!
भाजपच्या नव्या संघटनात्मक टीमची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक भाजप खासदार सध्या मतदारसंघाऐवजी दिल्लीत अधिक वेळ देत असल्याचे चित्र आहे. काही मंत्रिपदे रिक्त असल्याने संघटनेत स्थान न मिळालेल्या नेत्यांच्या आशाही वाढल्या आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून, महिला आरक्षण आणि सीमांकनाशी संबंधित विधेयकांवरही चर्चा होऊ शकते. २०२७ मध्ये उत्तर प्रदेशसह काही राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्याने संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशला विशेष महत्त्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
मुलींना स्कर्टऐवजी पाय झाकणारा सलवार सूट घालावा
पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदलाचे निर्देश
पश्चिम बंगालमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. शरदवत मुखर्जी यांनी शाळांना विद्यार्थ्यांच्या गणवेशात तात्पुरते बदल करण्याचे आवाहन केले आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यांसाठी मुलांना पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि पूर्ण लांबीची पँट, तर मुलींना स्कर्टऐवजी पाय झाकणारा सलवार सूट घालण्याची परवानगी देण्याची सूचना करण्यात आली आहे. गुडघ्यापर्यंतचे मोजे डासांपासून पुरेसे संरक्षण देत नसल्याचेही मुखर्जी यांनी स्पष्ट केले. डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्याचे आवाहन त्यांनी शिक्षक व शाळा प्रशासनाला केले. अंतिम निर्णय शाळा प्रशासनाकडे राहणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराआधीच मोठी जबाबदारी;
डॉ. दिनेश शर्मा थेट नायब राज्यपाल!
भाजपचे खासदार आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांच्यावर केंद्र सरकारने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रपती भवनाने शनिवारी रात्री उशिरा शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली. यापूर्वी ॲडमिरल डी. के. जोशी या पदावर कार्यरत होते. नियुक्तीनंतर शर्मा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले. ही जबाबदारी संविधान, राष्ट्र आणि जनसेवेप्रती बांधिलकी असल्याचे त्यांनी म्हटले. शर्मा यांचा राज्यसभा कार्यकाळ २५ नोव्हेंबरला संपणार होता. त्यापूर्वीच त्यांना नवी जबाबदारी मिळाली आहे.
युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेची ‘मास्टरप्लॅन’!
विटकॉफ-कुशनर थेट पुतिन यांच्या भेटीला
रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षे उलटूनही संघर्ष थांबलेला नाही. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या शहरांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुन्हा पुढाकार घेतला आहे. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर चर्चा करण्यासाठी रशियात पोहोचले आहेत. त्यांच्या दौऱ्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवरील हल्ले तीन दिवस थांबवण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. विटकॉफ आणि कुशनर पुतिन यांची भेट घेऊन शांतता प्रस्तावावर चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी ठोस प्रस्ताव असल्याचे म्हटले आहे. मात्र, या प्रस्तावाचा सविस्तर तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.
भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय;
अवघ्या ५५ धावांत डाव गुंडाळला!
महिला आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. टॉस जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी घेतली; मात्र भारतीय गोलंदाजांसमोर त्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या ५५ धावांत १८.१ षटकांत बाद झाला. भारताकडून श्री चरणी आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून शवाल जुल्फिकारने सर्वाधिक १४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ७ विकेट्स राखून लक्ष्य गाठले. हरमनप्रीत कौरने नाबाद १८, तर दीप्ती शर्माने नाबाद १४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
डीजेविरोधी बापटांच्या समर्थनार्थ सोनाली कुलकर्णी;
अवधूत गुप्तेंनीही केलं खास गाणं Top 15 News :
गणेशोत्सवातील डीजे आणि वाहतुकीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारे पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट सध्या चर्चेत आहेत. पुणे महापालिका बैठकीतील त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या स्पष्ट आणि कायदेशीर मुद्द्यांची चर्चा झाली. या भूमिकेमुळे त्यांना विरोध आणि हल्ल्याचा प्रयत्नही झाल्याचे समोर आले. मात्र, आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि गायक अवधूत गुप्ते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. सोनाली कुलकर्णीने बापट यांचे कौतुक करत त्यांना ‘जागरूक नागरिक’ म्हटले. तर अवधूत गुप्तेंनी त्यांच्या समर्थनार्थ खास गाणे तयार करून सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान, बापट यांच्यावर टीकाही होत असून त्यांचा एआय व्हिडिओ व्हायरल झाला आहे.





