Top 10 News : सुप्रिया सुळे-विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास, राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा आणि ‘बिग बॉस २०’ मध्ये मोठा ट्विस्ट, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : दिल्लीत जलजीवन मिशनची बैठक सुरू असताना सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अचानक बैठकीतून बाहेर पडले आणि दोघेही एकाच कारमधून निघून गेले.

सुप्रिया सुळे-विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Top 10 News : दिल्लीत जलजीवन मिशनची बैठक सुरू असताना सुप्रिया सुळे आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अचानक बैठकीतून बाहेर पडले आणि दोघेही एकाच कारमधून निघून गेले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एनडीएमधील संभाव्य सहभागाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. मात्र, अमोल कोल्हे यांनी या भेटीत राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे म्हटले. सुनील तटकरे यांनी दोघांची स्टँडिंग कमिटीची बैठक असल्याने ते एकत्र गेल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठकही झाली.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा
दोन्ही नेत्यांमध्ये ‘वर्षा’वर खलबतं?
जेनझी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या माहितीनुसार, कोकणातील रस्त्यांची स्थिती आणि शिवाजी पार्क मैदानासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. या भेटीमुळे ठाकरे गटातही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी या भेटीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टोला लगावला. राज्यातील खड्डे, शिक्षण आणि उद्योगांसह विविध प्रश्नांवरून वातावरण तापले असताना राज ठाकरे-फडणवीस भेटीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
“मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या”
75 वर्षीय आजींची विनंती
आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील ७५ वर्षीय आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाणा आणि खामगावला या. इथे खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते, मात्र अधिकारी कारवाई करत नाहीत,” असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, गोंदियातील चार आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपन्यांचे परवाने गंभीर त्रुटी आढळल्यानंतर कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. ही कारवाई मे ते जुलै २०२६ दरम्यान करण्यात आली.
राज्यातील एक कोटी, ८० लाख मतदार अपात्र?
१७ ऑगस्टपर्यंत अर्ज भरून देण्याचे आवाहन
राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल फेरतपासणीअंतर्गत सुमारे 1 कोटी 80 लाखांहून अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेले नाही. त्यामुळे त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी या मतदारांना तातडीने प्रपत्र भरून देण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया 17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून, प्रपत्र न भरलेल्या मतदारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल, तर 27 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. नागरिकांना दावे-हरकती नोंदवण्याची संधीही मिळणार आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट Top 10 News :
राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम असून, आज मुंबईसह ११ जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, गोंदिया आणि गडचिरोलीत जोरदार सरींचा अंदाज आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, विदर्भात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नागपूरमध्ये १ जून ते १२ ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा २१ टक्के कमी पाऊस झाला असून, विदर्भाची एकूण तूट १३ टक्क्यांवर पोहोचली आहे.
जंतर-मंतर ‘सीझन २’ लवकरच…
अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
जंतरमंतरवरील विद्यार्थी आंदोलनात झालेल्या लाठीमारावरून कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावर अमित शाहांनी संसदेत चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “शाह संसदेतून पळ काढत आहेत,” असा आरोप दिपके यांनी केला. दरम्यान, जंतरमंतरवरील आंदोलनाचा ‘सीझन-2’ लवकरच सुरू होणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे. इन्स्टाग्रामवरील प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.
Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगनाला भोवणार?
भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात
NEET पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी जेन झींबाबत ‘गटर जनरेशन’ अशी टिप्पणी केल्याने भाजप खासदार कंगना रणौत अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात आग्रा येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, 21 ऑगस्टला पहिली सुनावणी होणार आहे. आंदोलक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा अपमान केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, कंगना यांनी आपल्या वक्तव्याचे पुन्हा स्पष्टीकरण दिले. “जे लोक स्वतःला कॉक्रोच म्हणतात, त्यांचं घर गटार असेल, असं म्हटलं तर गैर काय?” असा सवाल त्यांनी केला. तसेच, हे वक्तव्य सर्व तरुणांसाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेचं पूर्ण नियंत्रण”
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीबाबत मोठा दावा केला आहे. “होर्मुझवर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असून ते कायम ठेवू,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या नौदलाची नाकेबंदी ‘पोलादी भिंत’ असल्याचा दावा करत त्यांनी इराणचे सैन्य मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले. इराणकडे पैसा नसून देश आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे आणि तिथे ३०० टक्के महागाई असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लिओनेल मेस्सीची वडिलांसाठी भावनिक पोस्ट
निवृत्तीचेही दिले संकेत
लिओनेल मेस्सीने वडील जॉर्ज मेस्सी यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 7 ऑगस्टला दीर्घ आजाराने जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाले. ते मेस्सीचे वडीलच नव्हे, तर त्याच्या फुटबॉल कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मार्गदर्शक आणि एजंटही होते. मेस्सीने सांगितले की, शेवटचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी वडिलांनीच त्याला सर्वाधिक प्रेरणा दिली होती. मात्र, आता वडिलांशिवाय पुढे कसे जायचे, याचा विचार करताना त्याच्या मनात फुटबॉल खेळत राहण्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. “तुमच्याशिवाय आता काय करायचं, कसं पुढे जायचं, हेच कळत नाही,” अशा भावनिक शब्दांत मेस्सीने वडिलांना श्रद्धांजली वाहिली.
‘बिग बॉस २०’ मध्ये मोठा ट्विस्ट;
स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकणार सदस्य Top 10 News :
सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस हिंदी 20’ची सध्या जोरदार चर्चा आहे. 6 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या शोचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला असून, सलमान एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. यंदाच्या सीझनमध्ये ‘एक्स्ट्रा जीवन दान’ हा खास ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रोमोमध्ये दोन योद्ध्यांची लढाई सुरू असताना सलमानची दमदार एन्ट्री होते. “बिग बॉस में मिलेगा… एक्स्ट्रा जीवन दान” अशी घोषणा करत तो “तथास्तु” म्हणतो. या अतिरिक्त संधीमुळे स्पर्धकांचा खेळ कसा बदलणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.





