Top 10 News : राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट, राज्यातील 30 जिल्ह्यांना आज ‘यलो अलर्ट’ आणि अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीला अपघात, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय.

“…पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील”;
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
Top 10 News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.तसेच, दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या;
मनसेचा कडक शब्दात इशारा!
मुंबईतील घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनासाठी रस्त्यावर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. जैन धर्मगुरू अनवाणी चालत असल्याने उन्हामुळे गरम झालेल्या रस्त्यावरून चालताना त्रास होऊ नये, यासाठी ही पांढरी पट्टी रंगवण्यात आली होती, असा दावा जैन समाजातील काही सदस्यांनी केलाय. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद परसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची या पुढे तोंड काळी करण्यात येतील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय. त्यामुळं आता हे प्रकरण कोणतं वळण घेणार हे पाहणं गरजेचं आहे.
राज्यात बोगस तलाठी भरतीचं रॅकेट;
15 लाखांत नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षण
बेरोजगारीचा ज्वलंत प्रश्न असताना तरुणांना सरकारी नोकरीचं आमीष दाखवून फसवणूक केली जातेय. राज्यात बोगस तलाठी भरतीचं रॅकेट उघड झालंय. महागाई आणि बेरोजगारी या प्रश्नांनी तरुणाई त्रस्त असतानाच दुसरीकडे बोगस भरतीद्वारे तरुणांची फसवणूक होतेय. राज्यात बोगस तलाठी भरतीचा पर्दाफाश झाल्याने खळबळ उडालीय. ’15 लाख द्या आणि तलाठी व्हा’ असं आमिष दाखवणारं बोगस भरतीचं रॅकेट उघडकीस आलंय. या प्रकारानंतर एका सजग तरुणानं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशीसाठी फोन केला आणि या रॅकेटचं बिंग फुटलं. या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासनानं 2023ची अधिकृत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्पष्ट केलंय. 153 पैकी 144 जणांना नियुक्ती देण्यात आली आहेत. तसेच नागरिकांना कुठल्याही भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार ;
राज्यातील 30 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी केलाय. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवलीय. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मुंबई आणि ठाणे परिसरात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होतंय. परंतु 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
राज्य प्रशासनात मोठे फेरबदल!
4 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या Top 10 News :
राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, 4 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. यामध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर त्याठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांची बदली मुंबईमध्ये करण्यात आलीय. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत मंगळवारी हा अधिकृत बदली आदेश जारी करण्यात आलाय. डॉ. माधवी खोडे चवरे यांच्यासह सुनील महिंद्रकर ,अनिता मेश्राम आणि आदित्य जिवणे यांच्याही बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या या नवीन आदेशानुसार, सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारणे हेच त्यांच्या लुटीचे मॉडेल
राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित एलपीजी सिलिंडरची वार्षिक मर्यादा ९ वरून ४ वर आणलीय. यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणांवर टीका केली. अब्जाधीश मित्रांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज माफ करण आणि स्वतःच्या अपयशाचं बिल गरिबांच्या माथी मारण हे मोदींचे लुटीचे मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मोदीजी, तुमच्या अपयशाचा भार फक्त गरीबच उचलणार का? तुम्ही निर्माण केलेल्या या ढासळत्या अर्थव्यवस्थेची किंमत कामगार, शेतकरी, महिला आणि मध्यमवर्ग चुकवणार का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का;
मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला
भाजपनं आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलाय. नटराजन यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एका खटल्याची माहिती कथितपणे दडपल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आलाय. मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मीनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाबाबत आक्षेप नोंदवला. भाजपा नेत्यांनी नटराजन यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवार नटराजन यांनी अर्ज भरताना सादर कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रात तेलंगणामधील एका प्रलंबित न्यायालयीन खटल्याचा तपशील जाहीर केला नाही, असा आरोप भाजपाने केला होता. दरम्यान, नटराजन यांची उमेदवारी फेटाळल्याने काँग्रेससाठी हा मोठी धक्का मानला जातोय.
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं ;
अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा
पश्चिम आखातात सुरु असलेला इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष थांबला असे वाटत असतानाच आता अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर जोरदार हल्ला चढवलाय. आज पहाटे अमेरिकन लष्कराकडून इराणवर जबरदस्त क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. यामध्ये होमुर्झ सामुद्रधुनीच्या परिसरातील इराणचे रडार, ड्रोन आणि हवाई संरक्षण प्रणालीला लक्ष्य करण्यात आल्याची माहिती अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांकडून देण्यात आली. अलीकडेच इराणने अमेरिकन लष्कराचे एक अपाचे हेलिकॉप्टर पाडले होते. त्याचा बदला घेण्यासाठी अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केल्याची माहिती आहे. यानंतर इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.
फिफा वर्ल्ड कप सुरू होण्यापूर्वीच मोठा वाद;
इराणचा अमेरिकेवर गंभीर आरोप
क्रीडा जगतातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सुरू होण्यासाठी आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. मात्र, हा फुटबॉल महाकुंभ सुरू होण्यापूर्वीच एक आंतरराष्ट्रीय वाद निर्माण झालाय. इराण फुटबॉल फेडरेशनने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून थेट यजमान देश अमेरिकेवर अत्यंत गंभीर आरोप केलेत. या वर्षी फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे भूषवत आहेत. इराण फुटबॉल फेडरेशनमी, अमेरिकेने राजकीय द्वेषापोटी इराणच्या ग्रुप स्टेज मॅचेसच्या तिकिटांचं वाटप अचानक रद्द केलं.” असा गंभीर आरोप केलाय. तसंच अमेरिकेकडून मुद्दामहून इराणी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यापासून रोखलं जात असल्याचा दावा इराणने केलाय.मात्र, या तिकीट वादामुळे आता फिफा या प्रकरणात कोण मध्यस्थी करणार, याकडे संपूर्ण क्रीडा जगताचे लक्ष लागलय.
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतच्या कारचा अपघात Top 10 News :
‘कपबशी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. चित्रपटाच्या मोशनसाठी पुण्यावरून सांगलीकडे जात असताना कलाकारांच्या गाडीचा अपघात झाला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे हे पुण्याहून सांगलीकडे प्रवास करत होते. सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात त्यांच्या गाडीसह तीन गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीतील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आलीय.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत परिस्थिती नियंत्रणात आणली.



