Top 10 News : विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग, सिद्धारामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? आणि ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

विधान परिषदेच्या 6 जागांवर शिवसेनेत लॉबिंग;
3 आमदारांच्या मुलांची नावं आघाडीवर
Top 10 News : विधान परिषदेच्या 6 जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. याच 6 जागांवर शिवसेनेत इच्छुक उमेदवारांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे. यात ठाणे-पालघरमधून रवींद्र फाटक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. तर हिंगोली-परभणीमधून आमदार अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर आणि माजी आमदार विप्लव बाजोरीया यांचे नाव चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर-जालनातून जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचेही नाव चर्चेत आहे. तर बाजीराव चव्हाण हेही इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधून माजी खासदार हेमंत गोडसे, सईद खान आणि भाऊसाहेब चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे. रायगडमधून मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा आहे.जळगावच्या जागेसाठीही शिवसेना आग्रही असून या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांचे पूत्र प्रतापराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर यवतमाळबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे कळते. तसेच यामधील शिवसेनेला 5 जागा मिळाव्यात ही आग्रही मागणी असून सहावी जागा मेरिटवर किंवा जिल्ह्यातील पक्षाची ताकद पाहता द्यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.
‘स्वत:ला एकटं समजू नका,
तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा’
रायगडमधील आंबेनळी घाटात शनिवारी स्कॉर्पिओ कार 1200 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला होता. या तरुणांच्या कुटुंबीयांची साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आसगावमध्ये जाऊन भेट घेतली. अपघातात मृत्यू झालेल्यापैकी सहा तरुण एकुलते एक असल्याचे समजतात छत्रपती उदयनराजे भोसले प्रचंड भावूक झाले. यावेळी त्यांनी या सगळ्यांचे सांत्वन केले. “मी तुमच्या मुलाची जागा घेऊ शकत नाही, पण मुलगा आणि भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा राहीन. स्वतःला कधीच एकटे समजू नका. तुमचा मुलगा म्हणून कधीही हाक मारा, मी कायम तुमच्या सोबत आहे,” असे म्हणत त्यांनी कुटुंबीयांना धीर दिला.तसेच यावेळी उदयनराजे भोसले यांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
अखेर प्राजक्त तनपुरे यांच ठरलं!
भाजपमध्ये प्रवेश करणार
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे हे आता भाजपच्या वाटेवर असल्याचं निश्चित झालं आहे. भाजप प्रवेशाची तारीख लवकरच निश्चित होणार असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती. तेव्हापासून ते भाजपच्या वाट्यावर असल्याची चर्चा सुरू होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. प्राजक्त तनपुरे हे आज किंवा उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामुळे नगरमध्ये भाजपची ताकद वाढणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र तो मोठा धक्का मानला जात आहे.
राज्यात नोकरीची मोठी संधी!
तब्बल 89, 731 कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
राज्यात गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सुमारे 89 हजार 731 कोटी रुपयांच्या पाच विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे 20 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. परिणामी, विदर्भ, मराठवाडा, नाशिकसह राज्यातील विविध भागांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार असून, कोळशापासून वायू ऊर्जा निर्मिती, सोलर सेल मॉड्युलर, वेफर्स पॅनेल आणि इलेक्ट्रिक स्टील अशा अत्याधुनिक आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित उद्योगांचा यात समावेश आहे.
१०० नगरसेवकांचा राजीनामा;
राज्यातील राजकारणात खळबळ
बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पराभवानंतर पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. टीएमसी खासदार काकोली घोष यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, तर टीएमसी-नियंत्रित नगरपालिकांमधील अंतर्गत कलह सुरू झाला असून सामूहिक राजीनाम्यांची लाट आलीय. राज्यात ज्या ज्या महापालिकेत टीएमसीची सत्ता आहे, त्या पालिकेतील एक-एक, दोन-दोन अशा शंभर नगरसेवकांनी राजीमाना दिलाय.गेल्या काही दिवसांत विविध नगरपालिकांमधील जवळपास १०० नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. या राजकीय उलथापालथीमुळे, आतापर्यंत प्रामुख्याने तृणमूल काँग्रेसच्या नियंत्रणाखाली असलेल्या नगरपालिकांमध्ये आपली पकड मजबूत करण्याची संधी भाजपला मिळाली आहे.
कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप;
सिद्धारामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार?
कर्नाटकाच्या राजकारणात पुन्हा मोठा उलथापालथ होणार आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यापदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाने दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत काल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासोबत दिवसभर चर्चा केली.सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. हे दोघेही आपल्या समर्थक आमदारांसह दिल्लीत दाखल झाले होते. बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी आपल्या निकटवर्तीय मंत्र्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्याने राजकीय चर्चाना आणखी उधाण आलंय.
मान्सून श्रीलंकेतच थबकला
केरळमध्ये ‘या’ दिवशी धडकणार
भारतीय हवामान विभागाने मान्सून यंदा केरळमध्ये वेळेआधीच दाखल होणार असा अंदाज व्यक्त केला होता मात्र मान्सूनचा प्रवास लांबला आहे. मान्सून २६ मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज होता पण श्रीलंकेच्या आसपास अरबी समुद्रातच रेंगाळला आहे.दरम्यान हवामान खात्याने दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवसांत मान्सूनच्या वाऱ्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल आणि मान्सून वेगाने पुढे सरकेल असा शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे विदर्भात उष्णता कायम आहे. अनेक जिल्ह्यात भीषण उष्णतेची लाट आहे.काही ठिकाणी तापमान ४४ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.
पाकिस्तानच्या मध्यस्थींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानवर आता अधिक टीका होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटचे सहकारी असलेले सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या तटस्थतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. इस्लामाबादचा इस्रायलप्रती असलेला विरोध लक्षात घेता, त्यांनी पाकिस्तानच्या भूमिकेला अडथळा म्हटलय। पाकिस्तानने इस्लामाबादने अब्राहम करारात सामील व्हावे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीला नकार दिल्यानंतर रिपब्लिकन सिनेटरचे हे विधान आले आहे. लिंडसे ग्रॅहम यांनी इस्लामाबादवर आपल्या हवाई तळांवर इराणी लष्करी विमानांना आश्रय दिल्याचा आरोप केला आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाची विधाने चिंताजनक असल्याचे म्हटले, ज्यामुळे मध्यस्थीच्या चर्चेतील त्यांच्या निःपक्षपातीपणाबद्दल गंभीर शंका निर्माण झाली आहे.
फायनलचं तिकीट RCBच्या खिशात
आयपीएल 2026 च्या थरारात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने इतिहास रचत फायनलमध्ये धडक मारली आहे. धर्मशाळामध्ये हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या क्वालिफायर 1 च्या हाय-व्होल्टेज सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (GT) 92 धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयामुळे आरसीबीचा संघ यंदाच्या हंगामातील फायनलचे तिकीट मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. या पराभवानंतरही गुजरात टायटन्सचे स्पर्धेतील आव्हान संपलेले नाही. गुणतालिकेत अव्वल दोनमध्ये राहिल्याचा फायदा गुजरातला मिळणार असून त्यांना फायनलमध्ये पोहोचण्याची आणखी एक संधी उपलब्ध असेल. आता आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ‘एलिमिनेटर-1’ चा सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, त्या विजेत्या संघासोबत गुजरात टायटन्सला क्वालिफायर-2 मध्ये भिडावे लागेल.
मनोज वाजपेयींच्या ‘गव्हर्नर’च्या जबरदस्त ट्रेलरची प्रचंड चर्चा Top 10 News :
‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द केरळ स्टोरी 2’चे निर्माते आता आणखी एका सत्य घटनांवर आधारित कथा घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहेत. 1990 मध्ये भारतावर आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. अभिनेता मनोज बाजपेयी प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटात भारताच्या इतिहासातील अत्यंत कठीण काळ दाखवण्यात आलाय.2 मिनिटे 54 सेकंदांच्या या ट्रेलरची सुरुवात 1990 च्या त्या काळापासून होते, जेव्हा भारत गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होता. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. चित्रपटात मनोज बाजपेयी यांची भूमिका माजी RBI गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारित असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि भारताला आर्थिकदृष्ट्या कोसळण्यापासून वाचवण्यासाठी जे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले, त्याभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसते.





