Top 10 News : “उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, आता राष्ट्रवादी फोडणार,”, एकनाथ शिंदेंची नवी रणनीती? आणि प्राजक्ता माळीचं हटके सेलिब्रेशन, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

शरद पवारांच्या खासदारांची मोदींशी भेट;
पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
Top 10 News : शरद पवार गटाच्या खासदारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट मतदारसंघातील प्रश्न आणि महाराष्ट्रातील विविध ज्वलंत मुद्द्यांसाठी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीमागे वेगळा राजकीय अजेंडा असल्याचा दावा केला. “उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला, आता राष्ट्रवादी फोडणार,” असं सत्तापक्षातील जुन्या मित्रांकडून सांगितलं जात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र राष्ट्रवादीत प्रत्यक्ष फूट पडेल की नाही, हे सांगता येणार नसल्याचंही चव्हाण म्हणाले. दरम्यान, बैठकीत दुष्काळ, कांद्याचे दर आणि चंद्रभागा नदी प्रदूषणासारखे मुद्दे मांडण्यात आल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती?
सचिन आहिर यांच्यावर मोठी जबाबदारी देणार?
राज्यात पुढील तीन वर्षे मोठ्या निवडणुका नसल्याने पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहेत. शिवसेना आणि चिन्हाच्या न्यायालयीन लढाईचा निर्णय जवळ येत असताना शिंदे गटाने मुंबईसाठी नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीतील अपयशानंतर संघटनात्मक बदल सुरू आहेत. सचिन आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवकांची बैठक झाली. राहुल शेवाळे, अमेय घोले उपस्थित होते. 15 ऑगस्टनंतर मतदारसंघनिहाय बैठका होणार. अशी माहिती अमेय घोले यांनी दिली. या बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर देण्यात आला. मुंबईतील आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू आहे. असे स्पष्ट झाले
मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले!
तासाभरात भूकंपाचे दोन धक्के
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांत रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवले. अवघ्या एका तासाच्या अंतराने बसलेल्या या धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जमीन हादरल्याचा आणि गूढ आवाज आल्याचा अनुभव नागरिकांनी सांगितला. सलग दोन धक्क्यांमुळे घाबरलेले काही नागरिक घराबाहेर पडले. काही दिवसांपूर्वीही जव्हारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा मोठी वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच;
मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश
मुंबईत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली कारवायांचा धडाका सुरू आहे. दहिसरमध्ये गुन्हे शाखेने बनावट दूध तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून चार आरोपींना अटक केली. अमूल व गोकुळच्या नावाने तयार केलेले 470 लिटर भेसळयुक्त दूध, 13 हजार बनावट पिशव्या आणि 10 लाखांची मशिनरी जप्त करण्यात आली. सुमारे 20 लाख पाऊच विक्री झाल्याचा संशय आहे. तसेच मालाडमधील Blinkit गोदामात अस्वच्छता व मुदतबाह्य अन्न आढळल्याने FDA ने कारवाई करत अन्न परवाना निलंबित केला.
श्रावणाआधीच पावसाचा जोर;
पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यांना येलो अलर्ट Top 10 News :
श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरीसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र ढगाळ वातावरण, हलक्या सरी आणि उघडीप पाहायला मिळेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. दरम्यान, श्रावणात राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. पावसाने उघडीप दिलेल्या भागात शेतकऱ्यांनी कोळपणी आणि तणनाशक फवारणीची कामे पूर्ण करून घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
‘शुद्ध पेट्रोल तुझ्या बापाच्या घरूनआणायचं का?’
भाजप खासदाराच्या वक्तव्याने वाद
पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणावरून देशात विरोध सुरू असतानाच भाजप खासदार जनार्दन मिश्रा यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. मध्य प्रदेशातील रिवाचे खासदार मिश्रा यांनी एका कार्यक्रमात, “देशात शुद्ध पेट्रोल उपलब्धच नाही, मग ते तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का?” असा सवाल केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका होत आहे. इथेनॉल मिश्रणाचे समर्थन करताना त्यांनी ब्राझीलचे उदाहरण दिले. पेट्रोल-डिझेलसाठी परदेशावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राममंदिर दानचोरीविरोधात साधू-संत रस्त्यावर;
CBI चौकशीची मागणी
राममंदिरातील कथित दानचोरी प्रकरणावरून साधू-संत आक्रमक झाले असून, सुमारे 500 संतांनी पंतप्रधान निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि CBI चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे. मात्र पोलिसांनी पंतप्रधान निवासस्थानाकडे जाण्यास रोखल्यानंतर अनेक साधू रस्त्यावरच बसले आणि काही जण झोपले. दानचोरीमुळे सनातन धर्माची बदनामी होत असल्याचा आरोप संतांनी केला. CBI चौकशी न झाल्यास चित्रकूट ते अयोध्या ‘चंदाचोरी ते आस्था बचाव यात्रा’ काढण्याचा इशाराही देण्यात आला. दरम्यान, प्रकरणाची SIT चौकशी सुरू असून दोन महिन्यांनंतरही मुख्य आरोपी हाती न लागल्याने संतांनी नाराजी व्यक्त केली.
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा भीषण भूकंप;
20 जणांचा मृत्यू, अनेक भिंती कोसळल्या
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियात 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान 20 जणांचा मृत्यू झाला असून अनेक इमारती कोसळल्या आहेत. ढिगाऱ्याखाली नागरिक अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. भूकंपाचे केंद्र चोको प्रांतातील संजोस डेल पाल्मारजवळ 107 किलोमीटर खोलीवर होते. पेरेरा येथे 18, तर मानिझालेस येथे दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. कॅली शहरात 20 हून अधिक इमारती कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. बोगोटासह इक्वेडोर, पनामा आणि व्हेनेझुएलातही धक्के जाणवले. बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे.
यश ढुल-प्रियांश आर्याचा मैदानावर वाद?
सामन्यानंतर वाढला तणाव
दिल्ली प्रीमियर लीगमधील सेंट्रल दिल्ली किंग्स आणि आउटर दिल्ली वॉरियर्सच्या सामन्यानंतर मैदानावरील कथित वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यश ढुलच्या नेतृत्वाखालील सेंट्रल दिल्लीचा पराभव झाल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये तणाव निर्माण झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सोशल मीडियावरील दाव्यानुसार, यश ढुल आणि प्रियांश आर्या यांच्यात वाद झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, वादाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सामन्यात आउटर दिल्लीने 216 धावा केल्या, तर सेंट्रल दिल्लीचा डाव 191 धावांत संपला. यशने 47 धावांची आक्रमक खेळी केली.
प्राजक्ता माळीचं हटके सेलिब्रेशन
व्हिडीओ शेअर करत दिली माहिती Top 10 News :
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने यंदाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. ९ ऑगस्टला वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने सोलापूरमधील तिच्या गावी कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. यावेळी ती चक्क शेतात उतरून भाताची रोपं लावताना दिसली. चिखलाने भरलेल्या शेतात तिने ‘इंद्रायणी’ भातशेतीत सुमारे तासभर श्रमदान केलं. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर करत, ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच, त्याला वाढदिवसाला जागले,’ असं कॅप्शन दिलं. प्राजक्ताच्या या हटके सेलिब्रेशनचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत असून तिचा निसर्ग आणि मातीशी असलेला जिव्हाळा पुन्हा एकदा दिसून आला.





