Top 10 News : जरांगेंना ‘जशास तसं’ प्रत्युत्तर देणार, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आणि ‘बायंगी’मध्ये अमेय वाघची प्रमुख भूमिका, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यात तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती;
तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार त्रस्त
Top 10 News : राज्यात तब्बल 15 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवताना उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पात्रतेनुसार विषय व पदांची पसंती उपलब्ध न होणे, माहिती व्यवस्थित न दिसणे आणि ओटीपी उशिरा मिळणे, अशा तक्रारी आहेत. शिक्षण विभागाने पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत 11 ऑगस्टऐवजी 13 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. मात्र, उमेदवार व शिक्षक संघटनांनी आणखी आठवडाभर मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. ओटीपी न आल्यास काही वेळ प्रतीक्षा करावी, तसेच ब्राउझरची हिस्ट्री-कॅशे क्लिअर करून इनकॉग्निटो विंडो वापरण्याच्या सूचना विभागाने दिल्या आहेत.
जरांगेंना ‘जशास तसं’ प्रत्युत्तर देणार
लक्ष्मण हाके यांचा इशारा
महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापूर दौऱ्याची घोषणा केली आहे. ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी सोलापुरात ओबीसी, व्हीजेएनटी बांधवांची वज्रमूठ बांधण्याचे आवाहन हाके यांनी केले. मनोज जरांगे हे ओबीसी नेते आणि मंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने ओबीसींच्या आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. जरांगे यांना जशास तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल, असा इशाराही हाके यांनी दिला. हाके उद्या सकाळी 11 वाजता मोहोळमार्गे सोलापुरात दाखल होणार आहेत.
बुलढाण्याचं नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी;
मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन नामकरणाची मागणी केली. राजमाता जिजाऊंची जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजाचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून जिल्ह्याला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका महाले यांनी मांडली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत प्रशासनाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. यापूर्वी उस्मानाबादचे ‘धाराशिव’ आणि औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्यामुळे आता बुलढाण्याच्या नामकरणाच्या मागणीने जोर धरला आहे.
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड;
कारभार होणार कागदविरहित
मुंबई महापालिकेचा कारभार अधिकाधिक डिजिटल आणि कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या 237 नगरसेवकांसह काही समिती कर्मचाऱ्यांना आयपॅड देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महिनाभरात प्रक्रिया पूर्ण करून आयपॅड उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सभागृह आणि समिती बैठकीतील विषयपत्रिका, प्रस्ताव व अहवाल डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे कागदाचा वापर आणि खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, गरजेनुसार नगरसेवकांना कागदी प्रतीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यापूर्वी 2012 मध्ये नगरसेवकांना लॅपटॉप देण्यात आले होते; मात्र अनेकांनी त्याचा वापर न केल्याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर आता प्रश्नचिन्ह आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता;
हवामान विभागाकडून ‘येलो अलर्ट’ जारी Top 10 News :
राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली असली तरी अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याचा घाटमाथा, अकोला आणि अमरावती येथे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, वर्धा आणि नागपूरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. 13 ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी विजांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी;
जुलैचा हप्ता ‘या’ तारखेपूर्वी खात्यात?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जुलै महिन्याचा ₹1,500 हप्ता 15 ऑगस्टपूर्वी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वितरणाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे 1 कोटी 66 लाख पात्र महिलांना टप्प्याटप्प्याने पैसे मिळू शकतात. दरम्यान, ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख महिला अपात्र ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. जुलैचा हप्ता 18 ऑगस्टपर्यंत जमा न झाल्यास जुलै आणि ऑगस्टचे मिळून ₹3,000 एकत्र देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
JPSC मध्ये मोठा फेरबदल;
CID चौकशीआधीच तीन सदस्यांचा राजीनामा
झारखंड लोकसेवा आयोगाच्या (JPSC) परीक्षेतील कथित अनियमिततेविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच आयोगात मोठा प्रशासकीय बदल झाला आहे. JPSCच्या तीन सदस्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. अजिता भट्टाचार्य, जमील अहमद आणि अनिमा हंसदा यांनी आपले राजीनामे राज्यपालांकडे पाठवले आहेत. परीक्षेतील कथित अनियमिततेबाबत वाद आणि CID चौकशीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सदस्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या घडामोडीमुळे JPSCच्या कार्यपद्धतीवर आणि परीक्षेतील कथित गैरप्रकारांवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, विद्यार्थी संघटनांकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली जात आहे.
कोसोवोच्या संसदेत राडा!
महिला खासदाराने पंतप्रधानांवर फेकली अंडी
कोसोवोच्या संसदेत शनिवारी मोठा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजा यांनी काळजीवाहू पंतप्रधान अल्बिन कुर्टी यांच्यावर अंडी फेकल्याने सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. “तुम्हाला लाज वाटली पाहिजे!” असे म्हणत काद्रिजा यांनी पंतप्रधानांच्या दिशेने अंडी फेकली. सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी हस्तक्षेप करून त्यांना दूर केले. 7 जूनच्या निवडणुकीत कुर्टी यांच्या ‘वेतेवंदोस्जे’ पक्षाला 120 पैकी 53 जागा मिळाल्या, मात्र सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळाले नाही. नवीन सरकार आणि राष्ट्राध्यक्षांच्या निवडीवरून सुरू असलेल्या राजकीय कोंडीदरम्यान हा प्रकार घडला.
सिराजचा ‘सिक्सर शो’;
अखेरच्या षटकात भारताला विजय
भारत-श्रीलंका कसोटी मालिकेपूर्वी कोलंबो येथे झालेल्या सराव सामन्यात मोहम्मद सिराजने आपल्या फलंदाजीने खळबळ उडवली. श्रीलंका इलेव्हनने भारतासमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले होते. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज असताना सिराजने सलग तीन षटकार ठोकत सामना भारताच्या बाजूने फिरवला. सिराजने अवघ्या 15 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. त्याच्या खेळीत चार षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. सिराजच्या या फटकेबाजीनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी त्याची बॅट हातात घेऊन मजेशीरपणे पाहणी केली. भारताने हा सामना सहा विकेट्सने जिंकला.
TVFचा मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश;
‘बायंगी’मध्ये अमेय वाघची प्रमुख भूमिका Top 10 News :
डिजिटल मनोरंजनविश्वातील लोकप्रिय द व्हायरल फीव्हर अर्थात TVFने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पणाची घोषणा केली आहे. ‘बायंगी : पळायची नाही, टाळायची!’ या चित्रपटातून TVF मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अमेय वाघ प्रमुख भूमिकेत दिसणार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन अभय राऊत करणार आहेत. हार्दिक जोशी, मनमीत पेम आणि अविनाश खेडेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अलौकिक लोककथांच्या पार्श्वभूमीवर विनोद आणि मनोरंजनाने भरलेली कथा चित्रपटातून मांडली जाणार आहे. ‘पंचायत’, ‘गुल्लक’ आणि ‘कोटा फॅक्टरी’सारख्या लोकप्रिय मालिकांनंतर TVFच्या या मराठी पदार्पणाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.




