पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी दर जाहीर एकरामागे २ कोटी आणि कुटूंबातील एकाला नोकरी Top 10 News : प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणासाठी सरकारने दर जाहीर केले आहेत. याची घोषणा पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. तसेच या प्रकल्पात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्याकडून घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 10 टक्के जमीन विकसित भूखंड शेतकऱ्याला परत केला जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पुरंदर विमानतळाच्या या प्रकल्पासाठी पुरंदरमधील 7 गावांमध्ये मिळून 1 हजार 216 हेक्टर जमीन तर इतर 242 एकर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. या गावांमधील शेतकऱ्यांना व्याजासहित एक एकरला 1 कोटी 51 लाख 1 हजार 925 रुपये एवढा दर देण्यात येणार आहे. 10 जूनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. ज्याची सहमती असेल त्यांना पैसे दिले जातील, जे सहमती देणार नाहीत त्याची सक्तीने भूसंपादन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु जमीन अधिग्रहणास स्थानिकांचा विरोध कायम आहे यावर आता स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पुण्यात 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न पुण्यातील नसरापूरमध्ये अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला असताना आणखी एक घटना समोर आलीय. पुण्यातील पर्वती परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. वेळीच नागरिकांनी प्रसंग ओळखून हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचं सांगण्यात येतंय. आरोपी पीडित मुलीचा नातेवाईक असल्याची माहितीही समोर आलीय. घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली.संतप्त नागरिकांनी पर्वती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं. संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर पीडितेला मेडिकलसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं. ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला परभणीत मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठ्या राजकीय हालचाली होत आहे. याठिकामी ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या विधानामुळे पक्षातील नेत्यांमध्ये चलबिचल सुरू होती. त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंनी पक्षात सर्जिकल स्ट्राइक करत जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव यांची हकालपट्टी केली. मात्र आता त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटत आहेत. पक्षातील 82 पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीमाने दिलेत. या सामुहिक राजीमान्यांनुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. गंगाप्रसाद आनेराव यांच्यावरील कारवाईने 82 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी Top 10 News : महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडणार असून इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिलीय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याआधी इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला असून येत्या जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून तो लागू केला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी निश्चित करण्यात आली आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे. यानंतर अभ्यासक्रम समन्वय समितीकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाणार आहे. कलिंगड खाऊन मृत्यू प्रकरणी सर्वात मोठी माहिती मुंबईतील पायधूनी परिसरात डोकाडिया कुटुंबातील चारही सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आता एक महत्वाची माहिती समोर आलीय. जेजे रुग्णालयात डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आलंय. मृत्यूचे नेमके कारण, उपचाराची वेळ आणि प्रक्रियेत काही विलंब झाला का याचा तपास केला जातोय. प्राथमिक तपासात अन्न विषबाधा नाकारण्यात आली असून, मृतांच्या शरीरात विषारी रसायनांचे अंश आढळलेत. प्राथमिक निष्कर्षांनुसार अन्न विषबाधेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सामान्य अन्नदूषिततेमुळे इतक्या वेगाने मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. त्यामुळे या प्रकरणात विषारी घटक किंवा इतर कारणांचा समावेश असण्याची शक्यता तपासली जात असून, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. थलपती विजयचं काँग्रेसला साकडं तामिळनाडू विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये थलपती विजयच्या TVK पक्षानं एक बलाढ्य शक्ती म्हणून छाप सोडलीय.टीव्हीके या पक्षाने विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकल्यानंतर तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केलाय. टीव्हीकेने सरकार स्थापन करण्याचा आपला हक्क सांगत आणि सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत राज्यपालांकडे मागितलीय. दरम्यान विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर आलीय.तर तमिळनाडूत विजयच्या सरकारला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय काँग्रेसच्या प्रदेश पातळीवर घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी दिली. पंजाबध्ये लष्करी छावणीबाहेर दुहेरी स्फोट पंजाबमध्ये रात्री वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दोन स्फोटांमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात. सुरुवातीला जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाबाहेर स्फोट झाला आणि काही तासांनंतर, अमृतसरच्या खासा भागातील लष्करी छावणीजवळ स्फोट झाल्याचे सांगण्यात आलं. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या दोन्ही स्फोटांमध्ये काही संबंध आहे की या वेगवेगळ्या घटना आहेत, हे सुरक्षा यंत्रणा निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. परिसरात दक्षता वाढवण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. या घटनांनंतर, कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी संपूर्ण पंजाबमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? आखाती युद्ध गेल्या काही दिवसांपासून शांत झालेले असतांना युद्धखोर भूमिका घेतलेल्या ट्रम्प यांनी पुन्हा एकदा जगावर संकट निर्माण करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. वारंवार भूमिका बदलणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट इराणला नकाशावरून मिटवून टाकू अशी धमकी दिलीये. एवढंच नव्हे तर होर्मुझमध्ये असलेल्या इराणच्या सहा युद्ध नौकाही अमेरिकेनं उडवून दिल्या आहेत. मात्र आयआरजीसीनं हा दावा फेटाळलाय. होर्मुझमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षा पुरवण्याचं काम अमेरिकन नौदल करत आहे. त्यांना टार्गेट केलं तर आम्ही प्रोजेक्ट फ्रीडम आणखीन तीव्र करु असा इशारा ट्रम्पनं दिलाय. या ऑपरेशनचा उद्देश इराणी भूसुरुंगांचा मार्ग मोकळा करणे हा आहे. आता ट्रम्प यांच्या या धमकीला इराण कसं उत्तर देणार याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलंय. परंतू ‘प्रोजेक्ट फ्रीडम’च्या माध्यमातून ट्रम्प यांचा होर्मुझमध्ये इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सफल होतो की इराण अमेरिकेच्या या मोहिमेला सडेतोड उत्तर देते हे पाहणं महत्वाचं असेल. CSK चा दिल्लीवर एकतर्फी विजय आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४८ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सला ७ गडी बाद १५५ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने नाबाद ८७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने ८ गडी राखून आणि १५ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी कायम आहे. चेन्नईने आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले आहेत. तर ५ सामने गमावले आहेत. चेन्नईचा संघ सध्या १० गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ ८ गुणांसह सातव्या स्थानी आहे. ‘तुम्बाड 2’ मध्ये आलिया भट्टची एन्ट्री? Top 10 News : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच हॉरर जॉनरमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ॲक्शन, रोमँस आणि गंभीर भूमिका साकारल्यानंतर आलिया भट्ट आता ‘तुम्बाड 2’ या हॉरर फँटसी ड्रामामधून या जॉनरमध्ये प्रवेश करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नवाजुद्दीन सिद्दिकीनंतर आता या यशस्वी फ्रँचायझीमध्ये आलियाचं नावही जोडण्यात आलं आहे आणि तिने शूटिंगलाही सुरुवात केली आहे. ती जवळपास 20 दिवस या चित्रपटासाठी शूटिंग करणार असल्याचं समोर आलं आहे. तिचा स्क्रीन टाइम मर्यादित असला, तरी तिची भूमिका अत्यंत प्रभावी असेल आणि कथेत अनेक ट्विस्ट-टर्न्स आणेल. तसेच हा रोल पुढील ‘तुम्बाड 3’साठीही पाया घालणार असल्याचं सांगितलं जातंय.