Top 10 News : राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार?, भाजपची 2029 च्या तयारीला सुरुवात आणि ‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नाचा रौद्र अवतार , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार?
29 ऑगस्टच्या शरद पवारांच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष
Top 10 News : महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा रंगली आहे. शरद पवार यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली असून, पक्षाच्या पुढील वाटचालीसह संभाव्य विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतर या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दोन्ही गटांतील नेत्यांनी परस्परांवरील टीका कमी केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
2029 च्या तयारीला सुरुवात!
महाराष्ट्र भाजपकडून प्रकोष्ठ प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर
भाजपने महाराष्ट्रातील पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी विविध प्रदेश प्रकोष्ठांचे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. विधी प्रकोष्ठाची जबाबदारी भूषण महाडिक, वैद्यकीय प्रकोष्ठाची डॉ. भारती पवार, सहकार प्रकोष्ठाची प्रवीण दरेकर आणि सांस्कृतिक प्रकोष्ठाची आशीष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच सोशल मीडिया, आयटी, क्रीडा, मीडिया आणि विविध सामाजिक घटकांसाठी स्वतंत्र प्रकोष्ठ नियुक्त करण्यात आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
महायुतीतील वाद मिटवण्यासाठी फडणवीसांची सक्त ताकीद
महायुतीतील अंतर्गत वाद आणि मतभेद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक पार पडली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्तरावरील धुसफूस, रखडलेली महामंडळे आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावर चर्चा झाली. महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर सार्वजनिक टीका करू नये, असे कडक निर्देश देण्यात आले. निधी वाटपावरील वाद प्रथम विभागीय आयुक्तांकडे सोडवले जातील. पुढील 15 दिवसांत महामंडळ वाटपावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, आणखी दोन बैठका होणार आहेत.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे फडणवीसांना पत्र
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुण्यातील आंदोलनात सहभागी विद्यार्थिनी निशा साबळे हिने दिलेल्या निवेदनाचा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे. वसतीगृहातील वयोमर्यादा, अपमानास्पद नियम, अन्न-स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यासह विद्यार्थिनींच्या कथित प्रेग्नन्सी टेस्टबाबत राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘स्कूल ठीक करो’ मोहिमेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये;
महिन्याभरात शाळा सुविधायुक्त करण्याचे आदेश
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शाळा महिन्याभरात सुविधायुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि वर्गखोल्यांच्या स्थितीनुसार शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण केले जाणार आहे. आठ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मूलभूत सुविधा नसलेल्या शाळांमध्ये तातडीने कामे करण्याचे आदेश देतानाच, कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
सणासुदीत साखरेचा झटका!
देशात खरंच तुटवडा आहे का?
सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, गेल्या महिन्यात किरकोळ आणि घाऊक बाजारातील किंमती सुमारे 24 टक्क्यांनी वाढल्या आहेत. साखर 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मात्र, देशात साखरेचा तुटवडा नसल्याचे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला मंजुरी दिली आहे. सट्टेबाजी आणि साठेबाजीमुळे दर वाढल्याचा दावा करण्यात आला असून, देशांतर्गत साखरेचा पुरवठा पुरेसा असल्याचे उद्योग क्षेत्राने म्हटले आहे.
टीएमसीच्या 20 बंडखोर खासदारांचा वाद सुप्रीम कोर्टात;
अपात्रतेच्या याचिकेवर आज सुनावणी
पश्चिम बंगालच्या राजकारणातील मोठा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी 20 बंडखोर खासदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवर लोकसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा, यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हे खासदार दुसऱ्या पक्षात विलीन झाल्याने पक्ष-बदल विरोधी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बंडखोर खासदारांनी मात्र स्वतंत्र गटाची मान्यता मागितली असून एनडीएला पाठिंबाही जाहीर केला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
अमेरिकेच्या नव्या निर्बंधांना इराणचा ठाम विरोध;
‘दबावापुढे झुकणार नाही’
अमेरिकेने इराणवर नव्याने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर तेहरानने दबावाला न झुकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. इराण सरकारच्या प्रवक्त्या फातिमा मोहजेरानी यांनी आर्थिक आव्हाने मान्य करत, देश एकजूट राहून संकटावर मात करेल, असे म्हटले. अमेरिकेने सुमारे 60 व्यक्ती, संस्था आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत. इराणचे अर्थमंत्री अली मदनीझादेह यांनीही देश या निर्बंधांना सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. अमेरिकेचा इराणच्या तेल उत्पन्नावर आणि आर्थिक नेटवर्कवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी मोठी खुशखबर!
पदक विजेत्यांच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
राज्यातील उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रोख पारितोषिक योजनेचा विस्तार करण्यास मंजुरी दिली आहे. नॅशनल गेम्स, खेलो इंडिया आणि दिव्यांगांच्या सहा प्रमुख स्पर्धांचा योजनेत समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्पर्धांतील सुवर्णपदकासाठी आता 7 लाख रुपये मिळणार आहेत. युथ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्याला 50 लाख रुपये दिले जातील. टेनिस ग्रँड स्लॅम विजेत्यास तब्बल 3 कोटी रुपयांचे पारितोषिक मिळेल. खेळाडूंच्या यशात योगदान देणाऱ्या प्रशिक्षकांनाही पारितोषिकाच्या 10 टक्के रक्कम देण्यात येणार आहे.
‘महाकाली’मध्ये अक्षय खन्नाचा रौद्र अवतार!
शुक्राचार्यांच्या भूमिकेचा थरारक प्रोमो रिलीज
अक्षय खन्नाच्या आगामी पौराणिक चित्रपट ‘महाकाली’चा नवा प्रोमो रिलीज झाला असून, त्यातील त्यांचा भेदक आणि रौद्र अंदाज चर्चेत आहे. चित्रपटात अक्षय खन्ना असुरगुरू शुक्राचार्यांची नकारात्मक भूमिका साकारत आहेत. दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी 24 ऑगस्ट रोजी हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला. प्रोमोमध्ये समुथिरकानी आणि अभिनेत्री सीरेया रेड्डी यांचीही झलक पाहायला मिळते. सीरेया रेड्डी माता महाकालीच्या रूपात दिसत आहेत. तेलुगू भाषेतील हा चित्रपट हिंदीतही प्रदर्शित होणार असून, प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.





