Top 10 News : मनोज जरांगेंचं उपोषण मागे, मुंबईसह अनेक शहरात पावसाची हजेरी आणि स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत रीलस्टारची हिरोईनसाठी वर्णी, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

मनोज जरांगेंचं उपोषण मागे;
सरकारकडून मागण्या मान्य
Top 10 News : जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मागे घेतलं आहे. काल रात्री मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सूचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी रात्री साडेदहा वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी मध्यरात्री 1.15 वाजता पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. तसंच शासन निर्णय न दिल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. आमच्या मागण्यांवर सरकारने दिलेल्या ड्राफ्टवरून मंगळवारपर्यंत आदेश काढायचे सरकारने तयारी दाखवल्याने उपोषण स्थगित केलं आहे, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. तसेच सातारा गॅझेटीयर साठी सरकारला एक महिना वेळ द्यायला हरकत नाही. पण तोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र काढण्यात येतील, अशी माहितीही मनोज जरांगेंनी दिली. आता जर थांबले तर आम्ही या दोघांना जबाबदार धरणार, असा इशाराही मनोज जरांगेंनी यावेळी दिला.
विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठीअखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. प्रदेश आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. अतिरिक्त एक जागा पदारात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यशस्वी झाली. तर 7 जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला 4 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
सरकारची तत्परता नव्हे तर लाचारी ;
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके संताप
मनोज जरांगे यांचं उपोषण कोणाचं तरी पॉलिटिकल कोअर सेट करण्यासाठी होतं. हे नियोजित आंदोलन होतं. जरांगे उन्हात बसले म्हणून या शासनाने ही तत्परता दाखवली. ही शासनाची तत्परता नव्हती, तर ती त्यांची लाचारी बघायला मिळाली. असं म्हणत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके. यांनी मनोज जरांगे यांच्या एक दिवसाच्या उपोषणावर आणि सरकारवर सडकून टीका केलीय.दरम्यान, प्रसाद लाड यांचा अपमान जरांगे करत होते. याच वेळी मुख्यमंत्र्यांचा सुद्धा जरांगे वेळोवेळी अपमान करत होते. यावेळी लाचार सरकार आम्हाला बघायला मिळाले. ओबीसी लोकांच्या वेदना आणि दुःख या सरकारला कधी दिसत नाही. मनोज जरांगेच्या आंदोलनाला बळी पडून जात पडताळणी करणाऱ्या समितीवर दबाव आणला तर ओबीसी त्याला प्रचंड विरोध करतील. असा इशाराही ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिलाय.
मुंबईसह अनेक शहरात पावसाची हजेरी
पालघरला यलो अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४० शी पार होता. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. अशातच रविवारची सकाळ नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून अनेक मुंबईसह अनेक शहरात पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी मान्सूनपूर्व पावसाने मुंबईची लोकल विस्कळीत झाली. दरम्यान आज मुंबई शहरासह पालघरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले;
दररोज ‘इतक्याच’ भाविकांना प्रवेश Top 10 News :
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल ५ महिन्यांनंतर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होत आहे. मात्र वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी वेळेची मर्यादा, ऑनलाइन नोंदणी आणि दररोज केवळ एक हजार भाविकांनाच प्रवेश अशी नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज एक हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हे दर्शन १५ ते ३० जूनदरम्यान सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेत देण्यात येईल आणि नोंदणीकृत भाविकांसाठी वैध ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.मुख्य मंदिराच्या सभा मंडपाचे काम व परिसरातील राडारोड्याची साफसफाई करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.यामुळे भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 15 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
सत्ताधारी हे मारेकरी झाले आहेत,
भाजपला लाज वाटली पाहिजे”
तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील सोनारपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यांच्यावर अंडी आणि दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली. दरम्यान , या हल्ल्यावर आता बंगालच्या माजी मुख्यमंरी ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी “सत्ताधारी हे मारेकरी झाले आहेत, भाजपला लाज वाटली पाहिजे”अशी सडकून टीका केली. अभिषेक बॅनर्जी यांनी हा हल्ला पूर्वनियोजित आणि ‘भाजप-प्रायोजित’ असल्याचे म्हटले, तसेच परिसरातील पोलिसांच्या अभावाकडे लक्ष वेधले.
कार ५०० फूट खोल दरीत कोसळली;
८ जणांचा जागीच मृत्यू
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात एक भयंकर अपघात झालाय. भरधाव वेगात असणारी कार ५०० मीटर खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात कारमधील आठही जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. ही दुर्घटना बैरागढ-साच पास-किल्लार रस्त्यावर शुक्रवारी उशिरा रात्री घडली. मात्र दरी अत्यंत खोल असल्याने शनिवारी संध्याकाळी स्थानिक नागरिकांना या अपघाताची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळावरील दुर्गम भूभागामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळा येत होता. तीव्र उतार, खोल दऱ्या आणि बर्फाच्छादित प्रदेशामुळे बचाव पथकांसमोर मोठी आव्हाने उभी राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, त्या गाडीत दोन मुले आणि चालकासह एकूण नऊ जण होते. स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व आठ जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत आणि काही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध
न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी इराण युद्धाला विरोध केला आहे. ते म्हणाले की, हे युद्ध आताच संपले पाहिजे, कारण याची सर्वात मोठी किंमत सामान्य लोकांना मोजावी लागत आहे. पोस्ट करताना ममदानी म्हणाले, “तीन महिन्यांपूर्वी एक असे युद्ध सुरू झाले, ज्यासाठी कोणीही मतदान केले नव्हते. पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली ज्यांचा त्यात काहीही सहभाग नव्हता.” ते म्हणाले की, या युद्धात हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, तसेच 13 अमेरिकन सैनिकही आपल्या कुटुंबाकडे कधीही परत येऊ शकणार नाहीत.
आयपीएलची आज हाय-व्होल्टेज फायनल;
गुजरात आणि बंगळुरु भिडणार
इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या अंतिम सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागलय. बंगळुरु आणि गुजरात या दोन्ही संघांनी एकदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 31 मे रोजी, यापैकी एक संघ आपले दुसरे विजेतेपद पटकावून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात टायटन्स, हे दोन्ही बलाढ्य संघ आता ट्रॉफी जिंकण्यासाठी आमनेसामने येतील. आयपीएल 2026 चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघालाही कोट्यवधी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळेल. याव्यतिरिक्त, प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या इतर दोन संघांनाही बक्षीस रक्कम मिळेल.
स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेत रीलस्टारची हिरोईनसाठी वर्णी Top 10 News :
मालिकांच्या विश्वात टीआरपी गाजवण्यासाठी स्टार प्रवाहने नुकत्याच 8 नव्या कोऱ्या मालिकांची घोषणा केली आहे. या मालिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. नुकतेच या मालिकांचे प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.झी मराठीचे अनेक कलाकार स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये झळकले आहेत. मात्र, या सगळ्यात चर्चा आहे एका मालिकेची. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या नायिकेच्या पात्रासाठी एका प्रसिद्ध रील स्टारची वर्णी लागली आहे. या रील स्टारचे नाव श्रद्धा पवार आहे. सोशल मीडिया इन्फ्लुयेन्सर असलेली ही अभिनेत्री रील स्टार आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. चिन्मय मांडलेकर आणि मंदार देवस्थळी या सुपरहिट दिग्दर्शक जोडीची ‘मराठी मिडीयम’ मालिका लवकरच प्रेक्षकांना स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो स्टार प्रवाहने शेअर केला. या मालिकेत राज्यातील मराठी शाळांच्या अस्तित्वावर, मराठी अस्मिता टिकवणारी गोष्ट दाखवण्यात येणार आहे. या मालिकेत रील स्टार श्रद्धा पवार प्रमुख भूमिकेत आहे. 24 वर्षांच्या या अभिनेत्रीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये कुतूहल वाढले आहे.




