Top 10 News: “कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही”, जुलै महिन्याचा १५०० रु.चा हप्ता कधी मिळणार? आणि इंडियन आयडल 16’ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News: नागपूर महापालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली.

कामासाठी डोक खाल्ले नाही तर शासन लक्ष देत नाही
देवेंद्र फडणवीसांचा आमदारांना मिश्किल सल्ला
Top 10 News: नागपूर महापालिकेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे आणि मोहन मते विकासकामांसाठी सतत निधीची मागणी करतात, हे चांगले असून “कामासाठी डोके खात राहा, म्हणजे कामे होत राहतील,” असा मिश्किल सल्लाही त्यांनी दिला. यावेळी 579 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण आणि व्हॉट्सॲप तिकीटिंग सेवेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यभरातील हजारो पदभरती आणि नागपूर महापालिकेतील 4,407 नियुक्त्यांबाबतही त्यांनी माहिती दिली.
उद्धव ठाकरेंना हादरा!
३ जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अहिल्यानगर, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांतील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशामुळे संबंधित भागात उबाठा गटाला धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी नवागतांचे स्वागत करत, विकास आणि जनतेचा विश्वास हीच शिवसेनेची ताकद असल्याचे सांगितले. यावेळी अनेक आमदार, खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, नागपुरात पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान 33 अंशांवर पोहोचून उकाडा वाढला आहे. मात्र, 28 आणि 29 जुलैला विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार?
महत्त्वाची अपडेट अन् तारीख आली समोर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा ₹1,500 हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो महिला प्रतीक्षेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत होण्याची शक्यता असून, 10 ते 15 ऑगस्टदरम्यान रक्कम खात्यात जमा होऊ शकते. जूनचा हप्ता न मिळालेल्या पात्र महिलांना जून आणि जुलैचे मिळून ₹3,000 मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसीनंतर सुमारे 1.70 कोटी पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार असून, प्रलंबित अर्जांची पडताळणी सुरू आहे.
मेळघाटात शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विषबाधा
चार शाळांमधील 100 हून अधिक विद्यार्थी बाधित (Top 10 News)
अमरावतीच्या मेळघाटातील शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विषबाधेच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. टीटम्बा, बिजू धावडी, सावलीखेडानंतर आता सुसर्दा आश्रमशाळेतील 15 ते 20 विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाली आहे. आतापर्यंत चार शाळांमधील 100 हून अधिक विद्यार्थी बाधित झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयाराम जावरकर यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनांनंतर सेंट्रल किचनमधील भोजनपुरवठा तातडीने बंद करून संबंधित पुरवठादारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
10 वर्ष तुरुंगवास अन् 10 कोटीपर्यंत दंडाची तरतूद
पेपरफुटीविरोधात केंद्र सरकारचं मोठं पाऊल!
सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठीचे सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे विधेयक मांडतील. पेपरफुटीसारख्या गैरप्रकारांसाठी 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यात आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्फोसिसचे संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन केल्याची घोषणा केली असून, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यावर हा गट काम करणार आहे.
पोलीस विभागात मोठा फेरबदल ;
14 पोलीस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मध्य प्रदेशातील दतिया जिल्हा पोलीस विभागात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. आयोगाच्या सूचनेनंतर 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. त्यानुसार पोलीस महासंचालक कैलास मकवाना यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. नीरज कुमार आणि रचना माहौर यांची पोलीस मुख्यालय, भोपाळ येथे, तर कौशलेंद्र सिंह गुर्जर आणि राजीव बिठोरे यांची दतिया जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत निष्पक्षता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
‘आता उत्तर देणार…’
जहाजावरील हल्ल्यानंतर इराणचा इशारा
कॅस्पियन समुद्रातील इराणच्या व्यावसायिक जहाजावरील कथित हल्ल्यानंतर इराण-युक्रेन तणाव वाढला आहे. इराणने युक्रेनवर हल्ल्याचा आरोप करत हा संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन असल्याचे म्हटले असून, या कारवाईला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिला. हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला. दुसरीकडे, युक्रेनने निर्बंधाखालील लष्करी मालवाहू जहाजांवर ड्रोन कारवाई केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, इराणने युक्रेनच्या कार्यवाहक मुत्सद्दींना समन्स बजावत तीव्र राजनैतिक निषेध नोंदवला.
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी…
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो गटात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. स्नॅचमध्ये 85 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 105 किलो, असे एकूण 190 किलो वजन उचलून तिने राष्ट्रकुल स्पर्धेचा नवा विक्रम प्रस्थापित केला. हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्ण आणि एकूण चौथे पदक आहे. या विजयामुळे भारताला स्पर्धेतील पहिले सुवर्ण मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे अभिनंदन करत तिला प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणास्थान असल्याचे म्हटले.
इंडियन आयडल 16’ची विजेती ठरली ज्योतिर्मयी नायक;
ट्रॉफीसह मिळालं 20 लाखांचं रोख बक्षीस ( Top 10 News)
‘इंडियन आयडॉल 16’ची विजेती म्हणून ओदिशाची ज्योतिर्मयी नायक हिने बाजी मारली. तिने ट्रॉफीसह 20 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले. ग्रँड फिनालेमध्ये ‘सैयां ओ सैयां’ या गाण्यावरील तिच्या सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली, तर जबलपूरचा तनिष्क शुक्ला प्रथम उपविजेता ठरला. संगीतासोबतच ज्योतिर्मयी कॅन्सर रुग्णांसाठी म्युझिक थेरपीचेही काम करते. ट्रॉफी जिंकल्यानंतर तिने हा क्षण स्वप्नपूर्ती असल्याचे सांगत कुटुंब, चाहते, परीक्षक आणि मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.




