Top 10 News : भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर?, ठाकरेंच्या आमदारांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट आणि ‘होम मिनिस्टर’चं नवीन पर्व लवकरच सुरू होणार, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर?
त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ
Top 10 News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्याआधी अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं होतं. आता समोर आपल्या माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलीय. भाजपकडून एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अॅडव्होकेट असिम सरोदे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सरोदे यांच्या पोस्टमुळे राज्यातील राजकारणासह देशभरातील राजकारणात खळबळ उडाली आहे. एका बड्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. मात्र त्यासाठी विलीनकरणाची मोठी अट ठेवली आहे, राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय ? असं सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. त्यांच्या या ट्विटने मात्र राजकरणात एकच खळबळ उडाली आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये नवा ट्विस्ट
ठाकरेंच्या आमदारांनी मध्यरात्री घेतली ओमराजेंची भेट
एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने आता नवा सस्पेन्स तयार झाला आहे. ओमराजेंनी काल मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय घेईन, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना परतायचे असल्यास सकारात्मक विचार केला जाईल, असे संकेत दिले होते. या सगळ्यानंतर शनिवारी रात्री पुण्यात एक महत्त्वाची घडामोड घडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी काल मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याचे समजते. या नव्या ट्विस्टमुळे ऑपरेशन टायगरबाबत राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय. ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटासोबत राहिल्यास उर्वरित पाच फुटीर खासदारांना स्वतंत्र गट स्थापन करता येणार नाही आणि त्यांच्या पक्षांतरबंदी कायद्यातंर्गत कारवाई होऊ शकते.
६ मतदारसंघ, एकच लक्ष्य;
बंडखोरांविरोधात ठाकरेंची मोहीम ठरली
पक्षातून फुटलेल्या खासदारांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर सहा खासदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी ठाकरे यांनी सुरू केली असून, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून संघटना पुन्हा मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.जिल्हाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फुटलेल्या सहा मतदारसंघांतील संघटनात्मक परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बंडानंतरही शिवसैनिक पक्षासोबत ठामपणे उभे राहावेत, यासाठी प्रत्येक मतदारसंघात संघटना अधिक बळकट करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दौऱ्यात ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. वाशिम-यवतमाळ, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या मतदारसंघांचा दौरा निश्चित करण्यात आला असून, उद्या ईशान्य मुंबईचाही दौरा होणार आहे.
शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय;
प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश
राज्यातील ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाला चालना आणि शासकीय जमिनींवरील अतिक्रमणांना आळा या त्रिसूत्रीवर आधारित महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. महसूल विभागाच्यावतीने ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ जाहीर केली.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने ही योजना सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय पडीक जमिनी नोंदणीकृत महिला बचत गट, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट आणि ‘उमेद/माविम’ अंतर्गत येणाऱ्या ग्रामसंघांना नाममात्र एक रुपया दराने भाडेपट्ट्याने दिल्या जाणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावनिहाय शासकीय जमिनींचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आलेत.
लोकसभा अध्यक्ष ठाकरे गटाला ऑपरेशन टायगरचा पुरावा देणार,
फुटीर खासदारांच्या गटाचा फोटो प्रसिद्ध होणार
शिवसेना ठाकरे गटाच्या दुसऱ्या अभूतपूर्व बंडानंतर राज्यासह देशभरातलं राजकारण अक्षरशः ढवळून निघाला आहे. असे असताना शिवसेनेच्या ऑपरेशन टाइगर बाबत अनेक तर्क-वितर्क, दावे-प्रतिदावे केले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांच्या ऑपरेशन टाइगरचा पुरावा समोर येणार अशी माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. तर नवीन गटाचा फोटो आणि प्रमाणपत्र आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातून जाहीर केला जाणार असल्याचेही बोललं जात आहे. तर ऑपरेशन टाइगरचा पुरावा ठाकरेंच्या गटाकडून मागितला जात होता, लोकसभा अध्यक्ष ओम् बिर्ला यांच्याकडे गटस्थापन केल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले होते. मात्र प्रमाणपत्र आणि फोटो समोर आला नसल्याने अद्यापही शंका उपस्थित केली जात होती. पण आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी अध्यक्षांच्या ऑफिसमध्ये दोन्ही गोष्टी बाहेर येतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
योग केवळ व्यायाम नाही; तो जगण्याचा मार्ग – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज १२ वा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता याठिकाणी रेड रोडवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीच्या योग दिनाची थीम “निरोगी वृद्धत्वासाठी योग” अशी ठेवण्यात आली आहे. वाढत्या वयातही शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि उत्तम जीवनशैली कशी राखता येईल, यावर याद्वारे भर देण्यात आला आहे. यावेळी जमलेल्या हजारो योगसाधकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नाही आणि तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही; तर ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे. योग आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतो आणि काय करावे व काय करू नये याचे भान देतो.” वयाचा संदर्भ देत पंतप्रधान पुढे म्हणाले, “आपले ध्येय हे असायला हवे की आपण वयाच्या ४० व्या वर्षी, २० व्या वर्षापेक्षा जास्त लवचिक असले पाहिजे आणि वयाच्या ६० व्या वर्षी, ३० व्या वर्षापेक्षा जास्त ऊर्जावान राहिले पाहिजे.” असे त्यांनी यावेळी म्हटले.
‘नीट’ची आज फेरपरीक्षा;
दोन लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज
पेपरफुटीनंतर रद्द करण्यात आलेली वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची फेरपरीक्षा आज देशभरात घेण्यात येणार आहे. ही पुनर्परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तयार केली असून, त्यासाठी तब्बल दोन लाखांहून अधिक कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले आहेत. देशातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ‘नीट यूजी’ पुनर्परीक्षा होणार आहे. या परीक्षेला तब्बल २२.७९ लाख विद्यार्थी बसणार आहेत. रविवारी दुपारी २ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत लेखी पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. परीक्षेत अपंग विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ देण्यात येणार असून, या विद्यार्थ्यांना सायंकाळी ६.२० वाजेपर्यंत परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा यशस्वी, गैरप्रकारविरहीत आणि सुरक्षितरित्या, सुरळीत पार पडावी यासाठी ‘एनटीए’ने विविध यंत्रणांच्या समन्वयातून व्यापक नियोजन केले आहे.
‘होर्मुझ’ची पुन्हा नाकेबंदी;
लेबनॉनवरील इस्रायली हल्ल्यांनंतर इराणची घोषणा
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आणि शांतता करारातील अटींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करून इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली. तसेच हल्ले सुरू राहिल्यास यापुढील रणनीती ठरली असल्याचे इराणने म्हटले. यामुळे जागतिक इंधनपुरवठ्यावर पुन्हा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘वॉशिंग्टनने केलेला स्पष्ट विश्वासघात आणि करारातील पहिल्या कलमाची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश, तसेच लेबनॉनमधील युद्धबंदीचे इस्रायलने केलेले उल्लंघन यामुळे ही सामुद्रधुनी बंद करण्यात आली आहे’, असे इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या निवेदनात लष्करी कमांडने नमूद केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ही बंदी म्हणजे पहिले पाऊल असून, यापुढेही आक्रमण सुरूच राहिल्यास वेगळी पावले उचलली जातील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
आज भारत विरुद्ध श्रीलंका फायनलचा सामना
वैभव सूर्यवंशीकडे सुवर्णसंधी
भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिंरगा मालिकेचा अंतिम सामना 21 जून खेळवला जाणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात दोन्ही संघ विजेतेपदासाठी आमनेसामने येतील. याआधी जेव्हा दोन्ही संघ लीग स्टेजमध्ये भिडले होते, तेव्हा भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात मैदानावर कमालीची चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला ट्रॉफीवर नाव कोरायचे असेल, तर आज कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. या सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असेल. आयपीएल 2026 मध्ये तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या वैभवला या मालिकेत अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. अशा स्थितीत अंतिम सामन्यात बॅटने चोख उत्तर देण्याची सुवर्णसंधी त्याच्याकडे असेल.
“दार उघड बये…दार उघड”
‘होम मिनिस्टर’चं नवीन पर्व लवकरच सुरू होणार
‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राच्या घराघरांत एक वेगळी ओळख निर्माण केली. या कार्यक्रमाने तब्बल २० वर्षांनी मागच्या दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र आता हा सदाबहार कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचं नवीन पर्व लवकरच सुरू होईल. याची अधिकृत घोषणा झी मराठीकडून करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके आदेश बांदेकर भावोजी पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आदेश बांदेकरांच्या कमबॅकचा प्रोमो नुकताच वाहिनीकडून अधिकृतरित्या शेअर करण्यात आला आहे. मात्र, सध्या या कार्यक्रमाची लॉन्च डेट अन् वेळ गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. लवकरच याचीही घोषणा केली जाईल.



