TOP 10 News: सोनम वांगचूक रुग्णालयात, जंतरमंतरवर गोंधळ ते 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बंद होणार? जाणून घ्या TOP 10 NEWS…
TOP 10 News: राज्य, देश-विदेश, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी...

TOP 10 News: 1. सोनम वांगचूक यांना पोलिसांनी जंतरमंतरवरून हटवलं; रुग्णालयात दाखल
प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि समाजसेवक सोनम वांगचूक यांना उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांच्या आरोग्याची खालावलेली स्थिती पाहता पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात नेल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या इतर आंदोलकांनाही पोलिसांनी तिथून हटवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे सध्या या ठिकाणी गोंधळाचा वातावरण निर्माण झाले आहे. यावर कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठा दावा करत मारहाण करण्यात आल्याचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, वांगचुक यांनी ‘चलो संसद’च्या आंदोलनाचा नारा दिला होता. यासाठी त्यांनी आंदोनलात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते, परंतु त्यापूर्वीच हा संपूर्ण प्रकार घडला आहे.
2. बारामतीच्या श्रावणी सुनेत्रा पवारांकडून कौतुक; दादांची काढली आठवण
देशात री-नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये, बारामतीची श्रावणी कुदळे नीट परीक्षेमध्ये देशात पाचवी तर मुलींमध्ये पहिली आली आहे, विशेष म्हणजे ती राज्यात पहिली आली आहे. श्रावणीने 720 पैकी तिने 710 मार्क मिळवले आहेत. श्रावणीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्रावणी कुदळे हिच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रावणीच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तिच्या शिक्षकांचेही अभिनंदन केले. तसेच, “दिवंगत लोकनेते अजितदादा पवार आज आपल्यात असते, तर त्यांनाही तुझ्या या यशाचा खूप अभिमान वाटला असता. त्यांचे आशीर्वाद सदैव तुझ्यासोबत आहेत,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
3. वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारसाला 1 लाख रुपयांची मदत
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान दुर्दैवाने एखाद्या वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कायदेशीर वारसाला एक लाख रुपये इतके आर्थिक साह्य देण्याची घोषणा श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्या वतीने करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यास सहभागी झालेल्या धाराशिवमधील 55 वर्षांच्या मीनाबाई सत्यवान सूर्यवंशी यांचे बेलवाडी या ठिकाणी रिंगण सोहळ्यादरम्यान हृदयविकाराने निधन झालं. त्यानंतर देहू संस्थानाने वारकऱ्यांना मदतीची घोषणा केली आहे. अनेकदा लांबच्या वारीच्या प्रवासात अनुचित घटना घडून काही वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू होतो. अशा कठीण प्रसंगी गरीब वारकरी कुटुंबाला संकटकाळात आधार मिळावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थानने हा निर्णय घेतला आहे. मात्रत्र, सदर आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी संस्थानकडून काही नियमांची आणि अटींची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.
4. राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता; मराठवाड्याला प्रतीक्षा
महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील ५ दिवसांसाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान मुंबई-कोकण वगळता आज उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्वेकडील राज्यात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रातील हवामानात बदल होत आहेत. पुढील काही दिवस कोकण, सह्याद्रीचा घाट परिसर आणि राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची स्थिती उत्तम राहील. तर विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्याला अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असून शेतकरी वर्गात चिंता आहे.
5. लालपरीचा प्रवास महागला, आजपासून नवे दर लागू
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. एसटी बसच्या भाड्यात सरासरी 13.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नुकतेच या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून आजपासून भाडेवाढ लागू होईल. मात्र, शिवनेरी गाड्यांच्या तिकीट दरांत कोणतेही बदल होणार नाही. मध्य पूर्वेत सुरू असणाऱ्या युद्धाचा फटका इंधन दरांना बसत आहे. डिझेलच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वाहनांचे सुटे भाग, टायर, देखभाल खर्च आणि एसटी कर्मचाऱ्यांचे विविध भत्ते देखील वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे एसटीवर आर्थिक भार वाढला होता. हाच भार कमी करण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एसटीच्या 6 किलोमीटर प्रवासासाठी किमान भाडे 13 रुपयांपर्यंत होते. आता नवीन भाडेवाढीमुळे हेच दर 13 रुपयांवरून 15 रुपयांवर जातील.
6. महाराष्ट्रात मतदारयाद्यांच्या ‘एसआयआर’ला मुदतवाढ
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआर प्रक्रियेला १० दिवसांची मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. यानुसार 8 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्यात येणार असून 19 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाच्या आधीच्या वेळापत्रकानुसार घरोघरी भेट देणे आणि अर्ज भरण्याची मुदत २९ जुलैपर्यंत होती, तर अंतिम मतदारयाद्या ७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्याचे नियोजित होते, मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यांमुळे मतदार नोंदणी अधिकार्यांना मतदारांपर्यंत पोहोचता आले नव्हते. यामुळे महाराष्ट्रात ‘एसआयआर’ मोहिमेला मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्ष तसेच विविध संघटनांकडून करण्यात आली होती. यानंतर केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राज्यात एसआयआरला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली.
7. आता १० आणि २० रुपयांच्या नोटा बदलणार? RBIकडून मिळाले संकेत
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) लवकरच १० आणि २० रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. RBI ची नोटा छापणारी कंपनी भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड यांनी प्लास्टिक नोटांसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी जागतिक स्तरावर ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागवला आहे. त्यामुळे प्लास्टिकच्या नोटांचा प्रकल्पाची तयारी सुरू होत असल्याचे संकेत मिळत आहे. सुरुवातीला १० आणि २० रुपयांच्या नोटांची पायलट चाचणी घेतली जाऊ शकते. प्लॅस्टिकच्या नोटांना पॉलिमर नोटा म्हणतात. या नोटा प्लास्टिक किंवा पॉलिमर फिल्मवर छापल्या जातात. त्यामध्ये असलेली पारदर्शक सुरक्षा विंडो आणि आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांमुळे बनावट नोटा तयार करणं जास्त कठीण होतं. तसेच या नोटा पाण्यामुळे खराब होत नाहीत, फाटत नाहीत आणि कागदी नोटांच्या तुलनेत जास्त टिकाऊ असल्याचं मानलं जातं. पण परंतु सध्या कागदी नोटा बंद करण्याचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
8. ॲन्डी बर्नहॅम बनणार ब्रिटनचे नवीन पंतप्रधान
ब्रिटनमधील ॲन्डी बर्नहॅम यांची लेबर पक्षाकडून नवीन नेते म्हणून औपचारिकपणे निवड करण्यात आली. ते ब्रिटनच्या नवीन सरकारचे पंतप्रधान असणार आहेत. पुढीलआठवड्यात ते विद्यमान काळजीवाहू पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या जागेवर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. उत्तर इंग्लंडमधील मेकरफिल्डचे ५६ वर्षीय खासदार असलेल्या बर्नहॅम हे गेल्या दशकभरातील ब्रिटनचे सातवे पंतप्रधान असणार आहेत. २०२४ मधील निवडणुकीच्यावेळी लेबर पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठीची ही अखेरची संधी असणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात स्टार्मर यांनी राजीनामा जाहीर केल्यापासून नेतृत्वाच्या शर्यतीत बर्नहॅम,हे एकमेव उमेदवार होते.
9. रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI ने दिलं उत्तर
लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा 19 जुलै रोजीचा तिसरा वनडे सामना हा हा रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो, कारण 2027 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी लक्षात घेऊन निवड समिती आता तरूण खेळाडूंना टीममध्ये संधी देण्याच्या तयारीत आहे, असा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता. त्यामुळे रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता BCCI चे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मा निवृत्त होणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसून, रोहितच्या निवृत्तीबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्या केवळ अफवा आहे, रोहित हा भारतीय वनडे टीममधील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. टीमला त्याची गरज असेपर्यंत तो भारतासाठी खेळत राहणार आहे,” असे देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं.
10. शाहरूख खानच्या ऑनस्क्रीन लेकीला गंभीर आजार
शाहरूख खानच्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातील बालकलाकार म्हणून झळकलेली त्याची मुलगी ‘अंजली’ म्हणजे सना सईदने तिच्या आजारपणाबाबत मोठा खुलासा केला आहे. सनाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ती बराच काळ ‘बुलिमिया’ नावाच्या डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचे सांगितले. बुलिमिया डिसऑर्डर हा एक गंभीर खाण्याशी संबंधित मानसिक विकार आहे. या विकारामध्ये व्यक्ती एकावेळी खूप जास्त प्रमाणात अन्न खाते आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून उपाशी राहणं किंवा काही मोजकेच पदार्थ खाणं पसंत करते. या आजाराबाबत तिने सांगितले की, “मला अनेक वर्ष हेच माहितीच नव्हतं की, मी एका इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त आहे. कारण हा शब्द मी कधी ऐकलाच नव्हता किंवा मोठी होईपर्यंत कुणी याचा उल्लेखही केला नव्हता. माझा जो प्रॉब्लेम होता त्यासाठी कोणता शब्दच नव्हता. त्यामुळे मी अनेक वर्ष एकटीच सहन करत राहीले”. पण आता ती या आजारातून पूर्णपणे बरी झाल्याचेही सनाने सांगितले.
Maharashtra Politics : …तरच एनडीएमध्ये या! भाजपने शरद पवार गटासमोर ठेवली ‘ही’ मोठी अट? चर्चांना उधाण







