TOP 10 NEWS : पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र ‘मॉडेल’ची पुनरावृत्ती ते बॉलीवूड विश्वात लाखांच्या चोरीने खळबळ…; वाचा टॉप 10 बातम्या
तामिळनाडूतील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते के. अन्नामलाई लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात

1- तामिळनाडू राजकारणात मोठा भूकंप? अन्नामलाई भाजपला रामराम देणार असल्याच्या चर्चांना उधाण
तामिळनाडूतील राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे आक्रमक आणि लोकप्रिय नेते के. अन्नामलाई लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमध्ये आपले राजकीय भविष्य मर्यादित होत असल्याची भावना अन्नामलाई यांच्या मनात निर्माण झाली असून, ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचेही सांगितले जात आहे. (TOP 10 NEWS)
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 234 पैकी केवळ एका जागेवर विजय मिळाल्यानंतर पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याची चर्चा आहे. त्यातच अन्नामलाई यांना पक्षात दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये वाढल्याचेही बोलले जात आहे.
दिल्ली दौऱ्यादरम्यान त्यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियांमुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. “दोन दिवस थांबा, सविस्तर बोलतो,” असे त्यांनी पत्रकारांना सांगितल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पक्ष नेतृत्वाने त्यांना राज्यसभेची संधी देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी तो प्रस्ताव नाकारल्याचीही माहिती समोर येत आहे. अन्नामलाई थेट पक्ष स्थापन करण्याऐवजी प्रथम जनआंदोलन उभे करून तरुणांचा आणि समर्थकांचा मजबूत नेटवर्क तयार करण्यावर भर देऊ शकतात.
2- RCom बँक फसवणूक प्रकरणात मोठी कारवाई; रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला CBI च्या ताब्यात
RCom बँक फसवणूक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत रिलायन्स समूहाचे वरिष्ठ अधिकारी अमिताभ झुनझुनवाला यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
CBI च्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या नेतृत्वाखालील बँक समूहाची तब्बल 6,000 कोटी रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या काळात झुनझुनवाला हे रिलायन्स कम्युनिकेशनचे ग्रुप मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. (TOP 10 NEWS)
तपास यंत्रणेचा दावा आहे की, बँकांकडून घेतलेल्या मोठ्या कर्जाचा वापर ठरलेल्या उद्देशासाठी न करता इतर कारणांसाठी करण्यात आला. त्यामुळे बँकांना हजारो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आणि संबंधित खाती एनपीए झाली.
यापूर्वी SBI च्या तक्रारीवरून रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधातही CBI ने गुन्हा दाखल केला होता. अमिताभ झुनझुनवाला हे आधीच दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांना तिहार कारागृहात ठेवण्यात आले होते.
3 – पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्र ‘मॉडेल’ची पुनरावृत्ती? तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या बंडाचे संकेत!
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात 2022 मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जशी उभी फूट पडली, तसाच राजकीय भूकंप आता बंगालमध्येही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी उघड होत असल्याचे चित्र आहे. कालीघाट येथील तातडीच्या बैठकीला पक्षाच्या 80 पैकी तब्बल 60 आमदारांनी गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जवळपास 50 आमदार पक्ष नेतृत्वावर नाराज असून ते वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. काही खासदारही या बंडखोर गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पक्षातील अंतर्गत वादामुळे दोन आमदारांना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आमदारांमधील नाराजी आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.
या संपूर्ण घडामोडींवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट प्रतिक्रिया देत भाजप आणि काही अंतर्गत गटांवर गंभीर आरोप केले आहेत. “केंद्रीय यंत्रणा, पैसा आणि पोलिसांचा वापर करून आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा त्यांनी फेसबुक लाईव्हमध्ये केला आहे.
4 – इंग्लंड vs भारत तिसरा टी20 निर्णायक सामना! मालिका कोण जिंकणार? आज होणार महा फैसला
इंग्लंड आणि भारत महिला संघांमधील 3 सामन्यांची टी20 मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. त्यामुळे आज होणारा तिसरा आणि अंतिम सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
ही निर्णायक लढत टाँटन येथील द कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंडवर खेळवली जाणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार आणि मालिका कोणाच्या नावावर होणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (TOP 10 NEWS)
भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी कर्णधार हरमनप्रीत कौर करणार आहे, तर इंग्लंड संघाची धुरा चार्ली डीन हिच्या खांद्यावर असेल.
मालिकेची सुरुवात भारताने दमदार पद्धतीने केली होती. पहिल्या सामन्यात स्मृती मंधाना यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 38 धावांनी विजय मिळवत आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता तिसरा सामना ‘करो या मरो’ ठरणार असून, दोन्ही संघांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची आहे.
5 – राज्यावर अवकाळी संकट.! पुढील 24 तास धोक्याचे, अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट !
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल दिसून येत असून, अनेक भागांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट जारी केला आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील काही भागांमध्ये वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसादरम्यान वीज कोसळून आठ शेळ्या आणि एका गायीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर जळगावमध्ये मुसळधार पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले आणि नागरिकांची मोठी धावपळ उडाली.
गंगाखेड तालुक्यातही वीज कोसळल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला असून अनेक ठिकाणी घरांचे आणि शेतीचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
6 – “लाडक्या बहिणींना दिलासा, पण गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई निश्चित…”; CM फडणवीस यांचा मोठा निर्णय.!
राज्यातील अत्यंत चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सुरू असलेला राजकीय वाद आता शमण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याचा दावा विरोधकांनी केल्यानंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट करत मोठी घोषणा केली आहे. योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या कोणत्याही महिलेकडून आधी दिलेली रक्कम परत घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ज्या महिलांचे अर्ज कागदपत्रांच्या त्रुटी किंवा तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरले आहेत, त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा KYC प्रक्रिया सुरू करणार आहे.
मात्र, दुसरीकडे सरकारने गैरवापरावर कठोर भूमिका घेतली आहे. योजनेचा चुकीचा लाभ घेतल्याचे प्रकरण समोर आले असून तब्बल १४ हजार पुरुषांनी बनावट अर्ज करून योजनेचा फायदा घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व १४ हजार पुरुषांकडून योजनेचे पैसे पूर्णपणे वसूल केले जाणार असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
7 – तुकाराम मुंडेंची एन्ट्री अन् प्रशासन ‘अॅक्शन मोड’मध्ये! भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर विभागात मोठा बदल दिसून येत आहे. अनेक दिवस सुप्त अवस्थेत असलेला हा विभाग आता अचानक ‘अॅक्शन मोड’मध्ये आल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त पदार्थ तयार करणारे कारखाने, गुटखा आणि पानमसाला विक्री करणारे तसेच विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून, आरोग्याशी खेळ करणाऱ्या बेकायदेशीर व्यावसायिकांवर कठोर पावले उचलली जात असल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे.
तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागात नवचैतन्य निर्माण झाले असून कारवाईचा वेग आणि कडकपणा दोन्ही वाढल्याचे दिसत आहे. एकीकडे या धडक मोहिमेचे कौतुक होत असताना, दुसरीकडे याआधी अशी कारवाई का झाली नाही? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
8 – “मी नसतो तर ना तुम्ही आता जेलमध्ये असता… मी तुम्हाला वाचवले आहे” ट्रम्प संतापले! नेतन्याहू यांना थेट इशारा
मध्यपूर्वेतील वाढत्या युद्धस्थितीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. इस्त्रायलकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे ट्रम्प संतप्त झाल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, ट्रम्प यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवरून थेट संवाद साधला. या संभाषणात त्यांनी हल्ले तात्काळ थांबवण्याचा स्पष्ट इशारा दिला.
ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत म्हटले की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे आणि या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्त्रायलविरोधी भावना वाढत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहू यांना म्हटले की, तुम्ही पूर्णपणे पागल झाले आहेत… जर मी नसतो तर ना तुम्ही आता जेलमध्ये असता… मी तुम्हाला वाचवले आहे. सध्याच्या घडीला प्रत्येकाला तुमचा राग येत असून त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे. तुम्ही जे करत आहात त्यामुळे सर्वजण इस्त्रायलची नफरत करत आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात मतभेद अधिक उघड झाल्याची चर्चा सुरू आहे.
9 – आखातात मालवाहू जहाजावर स्फोट! आंतरराष्ट्रीय तणाव आणखी वाढला
इराकजवळील आखात क्षेत्रात मालवाहू जहाजावर भीषण स्फोट झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे. उम कासर बंदराजवळ सुमारे 40 सागरी मैल अंतरावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
या घटनेची जबाबदारी इराणने स्वीकारल्याचा दावा इराणी माध्यमांकडून करण्यात आला आहे. पनामा-ध्वजांकित कंटेनर जहाज ‘MSC Sariska V’ला क्रूझ क्षेपणास्त्राने लक्ष्य करण्यात आल्याचा इराणचा दावा आहे.
इराणी रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) कडून हे जहाज अमेरिकन मालकीचे असल्याचा दावा करण्यात आला असून, ओमान किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून ही कारवाई झाल्याचेही सांगितले जात आहे.
सुदैवाने या घटनेत जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या संपूर्ण घटनेमुळे आखातातील तणाव पुन्हा वाढला असून, जागतिक तेल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
10 – विश्वास ठेवावा तरी कोणावर? अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबातच 25 लाखांच्या चोरीने खळबळ
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांच्या कुटुंबात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रवीना टंडन यांच्या आईचे तब्बल 25 लाख रुपये किमतीचे दागिने आणि महागडी घड्याळे चोरीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चोरीचा आरोप कुटुंबाच्या विश्वासातील एका महिलेलाच अटक करण्यात आली आहे. जुहू पोलिसांनी 47 वर्षीय रशी छाब्रिया हिला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिला 2020 पासून टंडन कुटुंबाच्या संपर्कात होती. रवीना टंडन यांच्या आईची देखभाल करण्यासाठी ती नियमितपणे त्यांच्या घरी ये-जा करत होती. याच विश्वासाचा गैरफायदा घेत तिने घरातील तिजोरी फोडून सोन्या-हिऱ्याचे दागिने आणि दोन महागडी घड्याळे चोरल्याचा आरोप आहे.
या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रात आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. घरातील विश्वासू व्यक्तीवरच चोरीचा आरोप झाल्याने “विश्वास ठेवावा तरी कोणावर?” असा प्रश्न अनेकांना पडला आहे.





