Top 10 News : महाराष्ट्रात पाणीटंचाई गंभीर ते आषाढी वारीत ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या
Top 10 News : Top 10 News : महाराष्ट्रात पाणीटंचाई गंभीर ते आषाढी वारीत 'तुकाराम मुंढे पॅटर्न'..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

Top 10 News : १) महाराष्ट्रात पाणीटंचाई गंभीर; राज्यातील २२ लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात मान्सून समाधानकारक न झाल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. सध्या राज्यातील १,२०० हून अधिक टँकरद्वारे तब्बल २२ लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागवली जात आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोकण, अमरावती आणि नागपूर विभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांतील विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोत कोरडे पडल्याने नागरिकांसह जनावरांनाही पाण्याचा फटका बसत आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धरणांतील पाणीसाठा सप्टेंबरपर्यंत टिकवण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे सांगितले. कृत्रिम पावसाच्या पर्यायावरही सरकार तज्ज्ञांशी चर्चा करणार आहे. हवामानातील अनिश्चिततेमुळे राज्यातील जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जातेय. (Top 10 News)
२) आषाढी वारीत ‘तुकाराम मुंढे पॅटर्न’; वारकऱ्यांना स्वच्छ, सुरक्षित अन्नासाठी FDA ची धडक मोहीम
यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष धडक मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपुरातील बैठकीत याबाबत संकेत दिलेत. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वारी मार्गावरील खाद्यपदार्थांची तपासणी करून स्वच्छ व दर्जेदार अन्न उपलब्ध होईल याची खबरदारी घेतली जाणार आहे. यासाठी जयकुमार गोरे तुकाराम मुंढे यांच्याशी समन्वय साधणार आहेत. तसेच पालखी मार्गावर ग्रामपंचायतींच्या हद्दीत १० हजार झाडे लावून ‘हरित वारी’ उपक्रम राबवला जाणार आहे. वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार विशेष एसटी बसही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Top 10 News)
३) समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कारमधील एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे टोलनाका परिसरात भीषण अपघात झाला. चंद्रपूरहून मुंबईकडे निघालेल्या वॅगनर कारने भरधाव ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत कारमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र धडक इतकी भीषण होती की कोणालाही वाचवता आले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केलाय. (Top 10 News)
४) पुढचे १० तास महत्त्वाचे! महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रासह देशातील १६ राज्यांसाठी पुढील १० तास अतिमहत्त्वाचे असल्याचा इशारा दिलाय. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ७० ते ८० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक, झारखंड, जम्मू-काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. ईशान्य भारतातील राज्यांमध्येही अतिवृष्टीची शक्यता आहे. ३० जूनपर्यंत अनेक भागांत मुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, सुरक्षित ठिकाणी राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन हवामान खात्याने केलेय. (Top 10 News)
५) चित्रपट निर्मात्याची थेट कॅबिनेट दर्जाच्या पदावर नियुक्ती; विजय यांच्या निर्णयानं खळबळ
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी चित्रपट निर्माते आणि उद्योजक के. वेंकट नारायणन यांची नवी दिल्लीतील तमिळनाडूचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलीय. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. राज्य सरकारने हे पद एका वर्षासाठी नव्याने निर्माण केले असून केंद्र-राज्य समन्वय, केंद्रीय मंत्र्यांशी बैठका, केंद्राच्या योजना आणि निधीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी या पदावर असेल. वेंकट नारायण हे KVN ग्रुपचे अध्यक्ष असून KVN Productionsचे संस्थापक आहेत. त्यांच्या निर्मितीत मुख्यमंत्री विजय यांचा ‘जन नायकन’ हा शेवटचा चित्रपट तयार होत आहे. या नियुक्तीवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीय. (Top 10 News)
६) सेशेल्सचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान मोदींना; ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ पुरस्काराने गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्स देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ प्रदान करण्यात आलाय. सेशेल्सच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि ग्रीन व्हिजनला दिलेल्या जागतिक नेतृत्वाबद्दल हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आलाय. तीन दिवसांच्या सेशेल्स दौऱ्यावर असलेल्या मोदींनी हा सन्मान १४० कोटी भारतीयांचा आणि भारत-सेशेल्समधील ५० वर्षांच्या मैत्रीचा गौरव असल्याचे म्हटलेय. या दौऱ्यात त्यांनी ‘महासागर’ व्हिजन आणि ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणावर भर दिला. यापूर्वीही मोदींना FAO चा ‘एग्रिकोला मेडल’, ‘सियोल पीस प्राइज’ आणि संयुक्त राष्ट्रांचा ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ यांसारखे अनेक प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. (Top 10 News)
७ ) महिंद्राने Thar ROXX स्टार एडिशन भारतात लॉन्च; प्रीमियम फीचर्सची मेजवानी
महिंद्रा अँड महिंद्राने लोकप्रिय Thar ROXX ची नवीन Star Edition भारतात लॉन्च केली असून तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹16.85 लाख आहे. या एसयूव्हीमध्ये पियानो-ब्लॅक ग्रिल, ब्लॅक अलॉय व्हील्स, ऑल-ब्लॅक लेदरेट सीट्स आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्ससह प्रीमियम लूक देण्यात आलाय. सिट्रिन यलो, टँगो रेड, एव्हरेस्ट व्हाइट आणि स्टील्थ ब्लॅक अशा चार रंगांमध्ये ती उपलब्ध आहे. यात 2.0-लिटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लिटर डिझेल इंजिनचे पर्याय असून RWD सेटअप देण्यात आला आहे. मोठी टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर, Harman Kardon साउंड सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्ज आणि भारत NCAP 5-स्टार सुरक्षा रेटिंगसह ही एसयूव्ही ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहे. (Top 10 News)
८) iPhone 18 लॉन्चनंतरही iPhone 17 स्वस्त होणार नाही? अॅपल चाहत्यांना मोठा धक्का
दरवर्षी नवीन आयफोन लॉन्च झाल्यानंतर जुन्या मॉडेल्सच्या किमतीत घट होते. मात्र यंदा iPhone 18 लॉन्च झाल्यानंतरही iPhone 17 आणि iPhone 16 स्वस्त होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. डिस्प्ले, कॅमेरा आणि चिप्ससारख्या महत्त्वाच्या घटकांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे अॅपलला किंमत कमी करणे कठीण जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय. जपानमध्ये iPhone 17 च्या 256GB मॉडेलच्या किमतीतही वाढ झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे iPhone 18 आल्यानंतर जुन्या मॉडेल्सवर मोठी सूट मिळेल, अशी अपेक्षा करणाऱ्या ग्राहकांची निराशा होण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. (Top 10 News)
०९) ‘गोविंदाचे अनेक अफेअर्स होते’; पत्नी सुनीताचा मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांनी ‘लॉक अप २’ या रिअॅलिटी शोमध्ये वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा केला. गोविंदाच्या अफेअर्सच्या चर्चांवर बोलताना त्या म्हणाल्या, “खरं प्रेम असेल तर नात्यात अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. कलाकारांच्या आयुष्यात अशा चर्चा होतच असतात.” इतकी वर्षे गोविंदाची साथ दिल्याचा उल्लेख करत त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. नात्यात तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे अनेक समस्या निर्माण होतात आणि संबंध बिघडू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वतः नेहमी प्रामाणिकपणे बोलत असल्याने गोविंदाला आपल्या बाबतीत चिंता वाटते, असेही सुनीता यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. (Top 10 News)
१०) १४९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं! आमिर जंगू-रोस्टन चेसने केला वर्ल्ड रेकॉर्ड
वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटीत आमिर जंगू आणि कर्णधार रोस्टन चेस या जोडीने कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी केली आहे. या जोडीने सहाव्या विकेटसाठी तब्बल ४०१ धावांची ऐतिहासिक भागीदारी रचून नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. या खेळीदरम्यान त्यांनी २०१६ मधील बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोचा ३९९ धावांचा विक्रम मोडीत काढला. आपला दुसराच सामना खेळणाऱ्या आमिर जंगूने २३३ धावा कुटल्या, तर कर्णधार चेस १८४ धावांवर नाबाद राहिला. (Top 10 News)





