TOP 10 NEWS : सलमान खानची कोर्टात धाव ते शेतकरी कर्जमाफीच्या निकषांची A टू Z माहिती…; वाचा टॉप 10 बातम्या
देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

1 – इराणचा कुवेत आणि बहरीनवर मोठा हल्ला; जगात पुन्हा खळबळ
मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, इराणने कुवेत आणि बहरीनच्या दिशेने क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. मात्र, अमेरिका, बहरीन आणि कुवेतच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी बहुतांश हल्ले हवेतच निष्फळ ठरवले.
CENTCOM च्या दाव्यानुसार, कुवेतकडे डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे लक्ष्यापर्यंत पोहोचली नाहीत, तर बहरीनच्या दिशेने सोडलेली तीन क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या रोखण्यात आली. अनेक ड्रोनही हवेतच नष्ट करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणच्या केशम बेटावरील काही लष्करी ठिकाणांवर स्वसंरक्षणात्मक कारवाई केल्याचे मान्य केले आहे. हे हल्ले इराणच्या कारवायांना प्रत्युत्तर म्हणून केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
दुसरीकडे, इराणने अमेरिकन लष्करी तळ आणि नौदलाशी संबंधित लक्ष्यांवर कारवाई केल्याचा दावा केला आहे. मात्र, अमेरिकेने हे सर्व हल्ले निष्फळ ठरल्याचे स्पष्ट केले आहे.
2 – पंतप्रधान बालेन शाहांच्या विधानानंतर नेपाळमध्ये निदर्शने; राजीनाम्याची केली मागणी
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी संसदेत भारत-नेपाळ सीमावादावर केलेल्या वक्तव्यामुळे देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शाह यांनी सीमावाद एकतर्फी नसल्याचे सांगत भारत-नेपाळ सीमारेषेवर प्रश्न उपस्थित केले होते.
या वक्तव्यानंतर कालापानी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या वादग्रस्त भागांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. भारत या भागांना आपला अविभाज्य हिस्सा मानतो, तर नेपाळकडून वेगळी भूमिका मांडली जात आहे.
शाह यांच्या वक्तव्यावरून नेपाळमध्ये राजकीय वातावरण तापले असून विद्यार्थी संघटना आणि विविध संघटनांनी काठमांडूमध्ये आंदोलन केले आहे. “राष्ट्रविरोधी वक्तव्य” केल्याचा आरोप करत आंदोलकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.
दरम्यान, नेपाळच्या संसदेतही या मुद्द्यावरून गोंधळ झाला असून, सदस्यांनी शाह यांच्या वक्तव्याबाबत माफीची आणि ते वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे नेपाळमध्ये राजकीय तणाव वाढला आहे.
3 – प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सरांच्या कोचिंग क्लासवर गोळीबार; संस्था उडवून देण्याची दिली धमकी !
बिहारची राजधानी पटना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूबर खान सर यांच्या कोचिंग संस्थेबाहेर मंगळवारी रात्री गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये एका सुरक्षा रक्षकाला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक वृत्तांनुसार, घटनास्थळी पाच ते दहा राऊंड फायरिंग झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच परिसरात तोडफोड झाल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.
घटनेनंतर खान सर यांनी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचा दावा केला. त्यांनी गोळीबार स्वतः पाहिल्याचे सांगत काही प्रतिस्पर्धी कोचिंग संस्थांवर गंभीर आरोप केले आहेत. कमी शुल्कात शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या यशामुळे काही जण नाराज असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून जखमी सुरक्षा रक्षक आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू केली आहे. आरोपींची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. विशेष म्हणजे, २०१९ मध्येही खान सर यांच्या संस्थेवर देशी बॉम्ब हल्ला झाला होता.
4 – ‘निवडणुकीत गैरप्रकाराने भाजपचा विजय…’; ममता बॅनर्जींचा भाजपवर खळबळजनक आरोप
पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. कोलकात्यात झालेल्या दिवसभराच्या धरणे आंदोलनात ममता बॅनर्जी यांनी भाजपवर मतमोजणीदरम्यान गैरप्रकार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, २९४ पैकी १७७ मतदारसंघांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
निवडणुकीनंतर राज्यात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. तसेच पुनर्वसनाशिवाय फेरीवाल्यांना हटवणे, नीट परीक्षेतील अनियमितता आणि सरकारच्या कथित सूडबुद्धीच्या कारवायांवरही त्यांनी टीका केली.
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, या कठीण काळात त्या तृणमूल कार्यकर्त्यांना एकटे सोडणार नाहीत. तसेच भाजपविरोधात लवकरच देशव्यापी आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे संकेतही त्यांनी दिले.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांमागे भाजपचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
5 – पुढील काही तासांत मान्सून धडकणार; मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
देशभरातील शेतकरी आणि नागरिक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते, तो मान्सून आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार झाले असून कोणत्याही क्षणी मान्सूनची एंट्री होऊ शकते. ४ जूनपर्यंत मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुख्य मान्सून दाखल होण्यापूर्वीच महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांत पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून केरळनंतर पुढील चार दिवसांत तळकोकणात दाखल होऊ शकतो. त्यानंतर कोकण मार्गे मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागांत त्याची प्रगती होणार आहे. १० जूनपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
6 – शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, जाणून घ्या निकषांची ए टू झेड माहिती…
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही कर्जमाफी योजना लागू केली जाणार असून, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांचे तब्बल 36 हजार 585 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे.
यामध्ये सुमारे 16 लाख 74 हजार शेतकऱ्यांचे सातबारा कोरा होणार आहे. या योजनेचा लाभ 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या आणि 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. दोन लाखांपर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ केले जाणार आहे.
यामध्ये मंत्री, आमदार, खासदार, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे नागरिक आणि उच्च वेतनधारक कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. 25 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा देखील यामध्ये समावेश आहे.
या निर्णयामुळे राज्य सरकारवर सुमारे 14 हजार 754 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असून, आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे.
7 – पुणे-पिंपरी दारूकांड प्रकरणी मोठी अपडेट; पोलीस दलातील आणखी चार कर्मचारी निलंबित, आत्तापर्यंत 29 जणांचे निलंबन
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यात खळबळ उडवणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात पोलीस दलातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे.
विषारी दारू प्रकरणाच्या तपासात पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईनंतर आतापर्यंत एकूण 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे.
प्राथमिक तपासात मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याच्याशी काही पोलीस कर्मचाऱ्यांचे संपर्क असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अजित शिवाजी काळे , सुमीत नंदकुमार वाघ, रामदास ज्ञानदेव जगताप आणि सुभाष बलभीम डोईफोडे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
याआधी पुणे शहर पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. एकूण 29 निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये पुणे शहर पोलीस 3, पिंपरी-चिंचवड पोलीस 6, राज्य उत्पादन शुल्क विभाग 13 आणि पुणे ग्रामीण पोलीस 7 जणांचा समावेश आहे.
दरम्यान, या विषारी दारूमुळे आतापर्यंत 22 नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही दारू फुगेवाडी परिसरात तयार केली जात असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, राज्यभरात अवैध हातभट्टी दारूवर मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे.
8 – आयफोन प्रेमींसाठी खुश खबर.! आयफोन 16 आणि 17 सिरीजवरही मोठी ऑफर्स; चार्जरदेखील मिळणार मोफत
आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. क्रोमाच्या ‘एव्हरीथिंग ॲपल’ सेलमध्ये आयफोन 15 सह अनेक ॲपल उत्पादनांवर मोठ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.
क्रोमाच्या या विशेष सेलमध्ये 128 जीबी स्टोरेज असलेला आयफोन 15 अवघ्या 36 हजार 891 रुपयांच्या किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. या किंमतीमध्ये एक्सचेंज बोनस, डिस्काउंट कूपन आणि टाटा न्यू बेनिफिट्सचा समावेश आहे.
याशिवाय, आयफोन 15 खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 हजार 190 रुपयांचा ॲपल ओरिजिनल चार्जर पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. फक्त आयफोन 15च नव्हे, तर आयफोन 16 आणि आयफोन 17 सिरीजवरही आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. आयफोन 16 चे 128 जीबी मॉडेल 40 हजार 041 रुपयांत, तर आयफोन 17 चे 256 जीबी मॉडेल 44 हजार 768 रुपयांच्या प्रभावी किमतीत उपलब्ध आहे.
ग्राहकांना बँक कॅशबॅक, एक्सचेंज बोनस आणि डिस्काउंट कूपनचा अतिरिक्त लाभही मिळणार आहे. हा ‘एव्हरीथिंग ॲपल’ सेल 14 जूनपर्यंत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांत उपलब्ध असणार आहे.
9 – अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; रोहित-हार्दिकसमोर फिटनेसची अग्निपरीक्षा.!
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी वनडे मालिकेपूर्वी टीम इंडियाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 14 जूनपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे.
दरम्यान, बीसीसीआयने मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली असून शुभमन गिलकडे कर्णधारपद, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मात्र मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
रोहित आणि हार्दिक यांना आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार असून फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना मालिकेत खेळण्याची परवानगी मिळणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली, केएल राहुल, ईशान किशन, कुलदीप यादव आणि अर्शदीप सिंग यांसारख्या प्रमुख खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
मात्र, आता रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या फिटनेस चाचणीत यशस्वी ठरतात का, आणि ते अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत मैदानात उतरतात का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
10 – ‘काला हिरण’ चित्रपटावरून अभिनेता सलमान खान भडकला, थेट कोर्टात ठोकली धाव!
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण आहे त्याचा आगामी चित्रपट नव्हे, तर त्याच्या नावाशी संबंधित एका वादग्रस्त चित्रपटाविरोधात उचललेले कायदेशीर पाऊल.
‘काला हिरण : द बॅटल फॉर लेगसी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानच्या कायदेशीर टीमने नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात 1998 मधील चर्चित काळवीट शिकार प्रकरण आणि त्यानंतरच्या घडामोडींना सिनेमॅटिक स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
चित्रपटात सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादाशी संबंधित काही घटनांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी अद्याप सुरू असताना सलमानचे नाव वापरणे अयोग्य असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करत निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टरूम ड्रामा आणि क्राइम थ्रिलर प्रकारातील हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, सलमान खानच्या या कायदेशीर कारवाईनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




