Top 10 News : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ते डॉक्टरांना मारहाण भोवली..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या
Top 10 News : Top 10 News : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ते डॉक्टरांना मारहाण भोवली..; वाचा आजच्या दहा टॉप बातम्या

Top 10 News : १) ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वैभवी प्रस्थान; दीड लाख वारकऱ्यांची भक्तिमय उपस्थिती
आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५व्या आषाढी पायी वारीला आज भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधआरतीनंतर दिवसभर भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माऊलींच्या पादुका सजवलेल्या पालखीत विराजमान झाल्यानंतर पालखीने पंढरपूरकडे वैभवी प्रस्थान केले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘माऊली… माऊली…’च्या अखंड जयघोषाने संपूर्ण आळंदी दुमदुमून गेली. टाळ-मृदंग, फुगड्या, भजन आणि भगव्या पताकांनी भक्तीचा महासागर उसळला. दीड लाखांहून अधिक वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काही वारकरी थेट पुण्याकडे मार्गस्थ झाले. रात्री उशिरा पालखीने प्रदक्षिणा मार्गावरील दर्शन मंडप येथे पहिला मुक्काम केला. (Top 10 News)
2) महाराष्ट्रात पुढील ६ दिवस अतिवृष्टीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट
महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून आता पुढील सहा दिवसही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. ८ ते १२ जुलैदरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलाय. ८ जुलै रोजी पालघर, रायगड, नाशिक घाट आणि सातारा-पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. ९ जुलैला सातारा आणि पुणे घाटात ऑरेंज अलर्ट राहणार आहे. त्यानंतर १० ते १२ जुलैदरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आलेय. (Top 10 News)
3) दुर्दैवी घटना! फलटणमध्ये विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे अत्यंत दुर्दैवी घटना घडलीय. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये आलेल्या प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झालाय. पिसुरड्या किसन शिंदे (48) यांना प्रथम विजेचा धक्का बसला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या गंगुबाई शिंदे (46), सचिन शिंदे (26) आणि आरती शिंदे (22) यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि चौघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेत. घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह कसा आला, याचा तपास सुरू असून या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण खामगाव आणि फलटण तालुक्यावर शोककळा पसरलीय. (Top 10 News)
4) डॉक्टरांना मारहाण भोवली! शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत
डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर अटक करण्यात आलीय. या घटनेवरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर विष्णूनगर पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह अक्षय कारंडे आणि प्रमोद निकम या तिघांना अटक केलीय. आरोपींवर सरकारी कामकाजात अडथळा आणणे, डॉक्टरांना जीवे मारण्याचा प्रयत्न आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक केलेल्या तिघांना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. या कारवाईनंतर डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या घटनांवर पुन्हा एकदा राज्यभरात तीव्र चर्चा सुरू झालीय. (Top 10 News)
5) ममता बॅनर्जींना मोठा धक्का! ईडीने तृणमूल काँग्रेसची ४४० कोटींची खाती गोठवली
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. कथित आर्थिक गैरव्यवहार आणि फंडिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पक्षाशी संबंधित सुमारे ४४० कोटी रुपयांची बँक खाती गोठवली आहेत. या प्रकरणात एका खासगी विमान कंपनीच्या कार्यालयावरही ईडीने छापे टाकले असून, या कंपनीने माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या वरिष्ठ नेत्यांना चार्टर्ड विमान सेवा पुरवल्याचा तपास सुरू आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील अंतर्गत वादातून या खात्यांचा मुद्दा समोर आला होता. खात्यातील निधीचा गैरवापर आणि भ्रष्टाचारातून पैसा जमा झाल्याचे आरोप करण्यात आले होते. या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने तातडीचा दिलासा नाकारला. आता ईडी या प्रकरणाचा मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने सखोल तपास करत आहे. (Top 10 News)
6) मुसळधार पावसाने पालटलं नशीब! अंगणातलं झाड कोसळताच वृद्धाला मिळाले 28 लाख (Top 10 News)
बंगळुरूमध्ये एका 85 वर्षीय वृद्धाचे नशीब मुसळधार पावसामुळे पालटलं आहे. एन. जी. केसरी यांनी तब्बल 40 वर्षांपूर्वी अंगणात उगवलेल्या चंदनाच्या रोपाची जपणूक केली होती. यंदा जूनमध्ये झालेल्या मुसळधार पावसात शेजारचं एक मोठं झाड चंदनाच्या झाडावर आणि त्याभोवती असलेल्या लोखंडाच्या सुरक्षा जाळीवर पडलं. यामुळे चंदनाचं झाडही पडलं. त्यानंतर त्यांनी याची माहिती वन विभागाला दिली. पाहणीनंतर झाड सरकारी चंदन डेपोत पाठवण्यात आले. जवळपास एक मेट्रिक टन वजन असलेले हे चंदनाचे झाड कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडने खरेदी केले आणि त्याबदल्यात केसरी यांना सुमारे 28 लाख रुपये मिळाले. चंदनाच्या झाडाचे अनेक वर्षे संरक्षण केल्याबद्दल त्यांना ‘चंदन शिरोमणी’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. त्यामुळे पावसामुळे नुकसान होण्याऐवजी त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित आर्थिक भरभराट झाली आहे. (Top 10 News)
7) पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची मोठी घोषणा
मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा हंगामी युद्धबंदी करार संपुष्टात आल्याचे जाहीर करत इराणवर मोठी लष्करी कारवाई केलीय. अमेरिकेच्या सेंटकॉमनुसार, इराणच्या 80 हून अधिक लष्करी ठिकाणांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले. या कारवाईत हवाई संरक्षण प्रणाली, क्षेपणास्त्र तळ, ड्रोन प्रक्षेपण केंद्रे आणि आयआरजीसीच्या 60 हून अधिक बोटी लक्ष्य करण्यात आल्या. यानंतर अमेरिकेने इराणच्या तेल विक्रीला दिलेली सवलतही रद्द केली आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केलाय. ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर कठोर टीका करत चर्चा सुरू राहू शकते, मात्र त्यातून फारसा उपयोग होणार नसल्याचे म्हटलेय. (Top 10 News)
8) 7000mAh बॅटरीसह Moto G77 Power लॉन्च; 50MP कॅमेरा, 2,000 पर्यंत बँक डिस्काउंट
मोटोरोलाने भारतात Moto G77 Power स्मार्टफोन लॉन्च केला असून, 7,000mAh ची दमदार बॅटरी आणि 50MP Sony LYT-600 कॅमेरा हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 25,999 ठेवण्यात आलीय. ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेच्या कार्डवर ₹2,000 ची त्वरित सूट किंवा एक्सचेंज बोनसची ऑफर उपलब्ध आहे. 13 जुलैपासून हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या अधिकृत स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोनमध्ये 6.72 इंचाचा Full HD+ 120Hz डिस्प्ले, MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर, 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा, Android 16 आधारित Hello UI, IP64 रेटिंग, साइड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा चार्ज केल्यानंतर बॅटरी 59 तासांपर्यंत साथ देऊ शकते. (Top 10 News)
9) ‘गोलमाल ५’मध्ये प्रियमणीची दमदार एन्ट्री; पहिल्यांदाच साकारणार खलनायिकेची भूमिका
रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘गोलमाल ५’ सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर आलीय. या चित्रपटात दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री प्रियमणीची एन्ट्री झाली असून ती पहिल्यांदाच हिंदी चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘द फॅमिली मॅन’ वेब सीरिजमुळे लोकप्रिय झालेल्या प्रियमणीने यापूर्वी ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये विशेष गाण्यात काम केले होते. या सिनेमात अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कुणाल खेमू, शर्मन जोशी आणि अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॉनी लिव्हर, संजय मिश्रा, मुकेश तिवारी आणि अश्विनी कळसेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. ‘गोलमाल’ मालिकेचे सर्व भाग सुपरहिट ठरल्यानंतर आता ‘गोलमाल ५’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पुढील वर्षी सणासुदीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. (Top 10 News)
१०) ७६ धावांवर खुर्दा उडाल्यानंतर कोच गौतम गंभीरने केला भारतीय फलंदाजांचा बचाव
नॉटिंघम टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध १२५ धावांनी मिळालेल्या ऐतिहासिक पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीर यांनी भारतीय खेळाडूंचा बचाव केलाय. या सामन्यात २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ७६ धावांवर ऑलआऊट झाला, जो भारताचा टी-२० इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. या पराभवानंतर गंभीर म्हणाले, “आम्ही नक्कीच खराब खेळलो, पण केवळ चार सामने खराब गेल्याने कोणताही संघ वाईट होत नाही. जेव्हा तुम्ही मैदानात अधिक आक्रमक आणि जोखीम पत्करून खेळता, तेव्हा कधीकधी असे निकाल समोर येतात. आमचा भर आता स्वतःच्या खेळात सुधारणा करण्यावर असेल.” (Top 10 News)





