Vishwas Nangare Patil :’आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणंही अवघड’; विश्वास नांगरे पाटील असं का म्हणाले?
Vishwas Nangare Patil : अशातच एका कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 'जेन झी'बाबत काहीसे वेगळं मत मांडलं आहे.

Vishwas Nangare Patil : दिल्ल्तील जंतर मंतर येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनात तरुणांचा लक्ष्यणीय सहभाग साऱ्यांनाच अचंबित करणारा ठरला. अखेर ३५ दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल केंद्र सरकारला घेणे भाग पडले आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला.
मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात एका केंद्रीय मंत्र्यांला आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ. त्यामुळे या आंदोलनाची देशभरात चर्चा झाली. शिवाय तरुणांच्या लढ्याचे कौतुकही करण्यात आले. सर्वच स्तरातून ‘जेन झी’ पिढीला कौतुकाची थाप मिळत आहेत. अशातच एका कार्यक्रमात बोलताना पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जेन झी’बाबत काहीसे वेगळं मत मांडलं आहे.
जेन झी पिढी सतत मोबाईलवर असते. त्यामुळे त्यांच्या विचार क्षमतेवर परिणाम होऊन त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाल्याचे मत विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. ते सोमवारी कारगिल विजय दिनानिमित्त भोसला मिलिटरी स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात बोलत होते.
नेमकं काय म्हणाले विश्वास नांगरे पाटील?
“आजच्या पिढीचा स्क्रीन टाइम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सतत मोबाईलवर स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे विचार करण्याची आणि भावनिकदृष्ट्या परिस्थिती हाताळण्याची क्षमता प्रभावित होत आहे. एकंदरित केमिकल लोचा झाला आहे. तसेच, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासाबरोबरच कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकदही प्रत्येकामध्ये विकसित होणे गरजेचे असायला हवी.” असे वक्तव्य विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.
….तर मीच अधिक शिव्या खातोय
पुढे बोलताना विश्वास नांगरे पाटील म्हणाले, ‘जेन-झी’ ही देशाचे भविष्य आहे. मात्र, आजच्या काळात त्यांना काही सांगणंसुद्धा अवघड झालं आहे. पोलीस असोत किंवा सीमेवरील जवान, त्यांची सेवा ही कधीही न थांबणारी असते. कितीही काम केलं तरी टीका आणि शिव्या पोलिसांच्या वाट्याला येतात. गेल्या काही दिवसांपासून तर मीच अधिक शिव्या खातोय, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.





