Supriya Sule : बारामतीमधील ‘त्या’ कार्यक्रमाचे ऐनवेळी निमंत्रण मिळाल्याने खा. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव (कऱ्हावागज) येथे कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे ऐनवेळी निमंत्रण दिल्याने खासदार सुप्रिया सुळे कमालीच्या नाराज झाल्या आहेत. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आज अंजनगाव येथील महावितरणच्या ३३..११ केव्ही उपकेंद्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियोजित उदघाटन कार्यक्रमास सुळे यांना ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले.यावर सुळे यांनी नाराजी व्यक्त करीत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. लोकसभा मतदार संघाचे आपण लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे किमान २४ तास आधी निमंत्रण मिळाले, तर त्या अनुषंगाने दौऱ्याचे नियोजन करता येते त्यामुळे संबंधीत यंत्रणांनी योग्य तो प्रोटोकॉल पाळावा, असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
विशेष म्हणजे आजच खासदार सुळे यांचा बारामती तालुका दौरा सुरू आहे. अंजनगाव येथील कार्यक्रमाबाबत त्यांना आधीच कल्पना असती, तर त्यानुसार त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करता आले असते, हेही त्यांनी आपल्या पत्रातून लक्षात आणून दिले असून हेच पत्र त्यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना पण पाठवले आहे.
अंजनगाव (कऱ्हावागज) ता. बारामती येथे आज कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ के. व्ही. उपकेंद्राचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मला थोड्या वेळापूर्वी मिळाली. मी स्वतः या भागाची लोकप्रतिनिधी असून येथील जनतेचे लोकसभेत प्रतिनिधित्व करते. त्यामुळे माझे दौरे तथा कार्यक्रम… pic.twitter.com/e05gNg0lmI
— Supriya Sule (@supriya_sule) January 11, 2025
तसेच आपले दौरे तथा कार्यक्रम पुर्वनियोजित असतात. तरीही महत्वपूर्ण सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन किमान २४ तासांपुर्वी जरी केले आणि मला तशी कल्पना दिली तर आपल्या कार्यक्रमात तसा बदल करता येणे शक्य आहे. संबंधित यंत्रणांनी याची कृपया नोंद घ्यावी. लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठवताना योग्य तो प्रोटोकॉल पाळला जावा, असे सुप्रिया सुळेंनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.





