Imran Khan – इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए-इन्साफ पक्षाचे नियोजित आंदोलन दडपण्यासाठी पाक सरकारने कठोर उपाय योजना सुरू केल्या आहेत. पीटीआय पक्षाने आज इस्लामाबादवर विराट मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. गुलामगिरीच्या बेड्या तोडून टाकण्यासाठी जनतेने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे. पक्षाने गेल्या आठवड्यातच या मोर्चाची हाक दिली होती. तेंव्हापासूनच राजधानी इस्लामाबादमधील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. दिनांक १८ नोव्हेंबरपासून इस्लामाबादेत जमावबंदी लागू केली गेली आहे. अटक करण्यात आलेले इम्रान खान आणि पक्षाच्या अन्य नेत्यांची सुटका करण्यात यावी, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत जनादेश चोरला गेल्याचा निषेध आणि न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचे अधिकार लोकप्रतिनिधींना देणारी राज्यघटनेतील २८ वी घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चा अडवण्यासाठी इस्लामाबादकडे येणाऱ्या रस्त्यांवर प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच राजधानीच्या भोवती अडथळ्यांच्या भिंती उभ्या केल्या आहेत. महत्वाच्या सरकारी इमारती असलेल्या रेड झोनकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. महामार्गांवर तसेच विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर कंटेनर आडवे लावण्यात आले आहेत. आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेंजर्स, पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दले तैनात केली गेली आहेत. तसेच, पाकिस्तान रेल्वेने लाहोर, रावळपिंडी आणि पेशावर दरम्यानच्या सर्व रेल्वे सेवा निलंबित केल्या आहेत. राजधानीच्या परिसरामध्ये कोणतेही आंदोलन, मोर्चा अथवा धरणे करता येणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारने म्हटले आहे. मात्र पीटीआयच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या नियोजित विराट मोर्चाची तयारी सुरूच ठेवली आहे. आज खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली आमिन गंदापूर यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात दुपारी ३ वाजता मोर्चाला सुरुवात करण्याचे निश्चित झाले.