मुंबई – राज्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारच्या व्यापक तपासणी मोहिमेतून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरांमध्ये तब्बल एक कोटी ५१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यात हजारो महिला कर्करोगाच्या विळख्यात सापडल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेतून चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, तपासणी झालेल्या महिलांपैकी १७ हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचा संशय, तर ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संशयित रुग्ण आढळले असून, राज्यातील एकंदर आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त करायला लावणारी ही आकडेवारी आहे. राज्यभरातील ३ लाख ३८ हजार २७९ शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात अॅनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. संशयित रुग्णांना पुढील तपासणी आणि मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी दिली. स्तन तपासणीत ८२ लाख ५१ हजार महिलांची तपासणी झाली. यामध्ये १२ हजार २८६ संशयित रुग्णांपैकी १,४७० महिलांची बायोप्सी करण्यात आली आणि ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले.