कोयनानगर : सातार्याच्या राजकीय संस्कृतीत नेतृत्व म्हणजे मूल्यांचा वारसा मानला जातो. या परंपरेची पायाभरणी ज्येष्ठ नेते बाळासाहेब देसाई यांनी प्रामाणिक आचरण, न्यायनिष्ठता आणि जनहितासाठीची कटिबद्धता यांद्वारे केली. त्यांचा हा वैचारिक वारसा आजही जिल्ह्यात प्रभावीपणे जाणवतो. हाच वारसा पुढे नेत सातार्याचे पालकमंत्री आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी कार्यशैलीला जनहिताचा स्पष्ट आधार दिला आहे. त्यांच्या निर्णयांत विचारांची शिस्त आणि कार्यातील सातत्य हे दोन स्थिर घटक दिसतात. प्रतिमेपेक्षा विश्वासार्हता महत्त्वाची, ही त्यांची भूमिका. पालकमंत्री झाल्यानंतर विकासकामांना गती – कोयना परिसरातील पर्यटनक्षेत्रांचा पुनर्विकास, कास पठाराच्या उन्नतीसाठीची ठोस पावले, सज्जनगड विकासात पर्यावरण-धार्मिक संतुलन, ग्रामीण रस्ते-पूल-जलयोजना यांसाठी केलेला निधी वाटपाचा समतोल, जिल्हा रुग्णालयातील सुधारणा, एसटी स्थानकांचे आधुनिकीकरण आणि शिक्षण सुविधांची उभारणी या सर्व उपक्रमांत त्यांची ‘जमिनीवरील विकास’ ही भूमिका स्पष्ट जाणवते. एका बैठकीत त्यांनी व्यक्त केलेली ओळ त्यांच्या कार्यप्रणालीचं सार सांगते. कागदावरचा विकास चालत नाही; तो दिसला पाहिजे पायवाटांवर. पर्यटनमंत्री म्हणून त्यांनी ‘शाश्वत पर्यटन’ हा मार्ग स्वीकारला. पर्यटन हे रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे साधन आहे, ही त्यांची धोरणात्मक भूमिका कोयना-कास-सज्जनगड-महाबळेश्वर-पंचगणी पट्ट्यातील कामांत दिसून येते. त्यांचे नेतृत्व शांत, पण निर्णय स्पष्ट कमी बोलून अधिक काम करण्यावर त्यांचा भर. बाळासाहेब देसाई यांच्या काळातील ओळ-देसाई बोलले म्हणजे काम निश्चित, हे आजही अनेकांना अनुभवातून पटत आहे. परंपरा व आधुनिकतेचा संतुलित संगम साधत त्यांनी नेतृत्वाला नवी दिशा दिली. सातार्यातील विकासाची गती वाढल्याची जाणीव प्रत्येक तालुक्यात दिसते. अखेरीस लोकशाहीतील खरी परीक्षा म्हणजे जनविश्वास. तो विश्वास सातार्याने पुन्हा त्यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला आहे. कारण… वारसा मिळतो, परंतु त्याला अर्थ मिळतो कृतीतून…