Ajit Pawar : सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा; शरद पवारांसमोर अजित पवार नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या चढ-उतारांनंतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्र आले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.
आज सोमवारी (१२ मे) मुंबईत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमासाठी या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी शरद पवार यांच्यासमोरच एक विधान केलं आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरूच ठेवायची, म्हणजे हे लोक सुतासारखी सरळ होतील, असं अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, सहकारात काही लोकं चुकीची कामं करतात, मग सत्तेत सहभागी होतात आणि चुकीच्या केलेल्या गोष्टीबाबत स्टे आणतात. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, अशा लोकांनी जरी प्रवेश केला तरी त्यांच्यावरची कारवाई सुरूच ठेवायची, म्हणजे हे लोक सुतासारखी सरळ होतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासमोर केले.
तसेच महाराष्ट्राच्या मातीला संघर्षाचा इतिहास आहे. दख्खनची उठाव झालेली शौर्य भूमी माझ्या मतदार संघातील आहे. सूपा परगणा माझ्या बारामती मतदारसंघात हा विभाग येतो. विद्याधर अनस्कार यांच कौतुक करायला हवं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनासकर प्रशासक, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी देखील अनासकर प्रशासक मधल्या काळात बाळासाहेब पाटील सहकार मंत्री होते. त्यावेळी शरद पवार साहेबांचा फोन आला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अनस्कार यांना प्रशासक करा. सगळ्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.





