Deool Band 2 : ‘देऊळ बंद 2’मध्ये झळकणार होता ‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता, पण अचानक झाला पत्ता कट; प्रवीण तरडेंनी सांगितला रंजक किस्सा
चित्रपटावर पुन्हा काम सुरू झाल्यावर माझी पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे हिने एक महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोर मांडला." ती म्हणाली...

Deool Band 2 : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘देऊळ बंद 2‘ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.
चित्रपटाने नुकताच 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून त्याचे भरभरून कौतुक होत आहे. चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे विविध मुलाखतींमध्ये या सिनेमाच्या निर्मितीमागचे अनेक रंजक किस्से सांगताना दिसत आहेत.
‘देऊळ बंद’च्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर जवळपास दहा वर्षांनी ‘देऊळ बंद 2’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या भागात कथा प्रामुख्याने राघव शास्त्री या पात्राभोवती फिरत होती. मात्र दुसऱ्या भागात एका श्रद्धाळू शेतकऱ्याची नास्तिक पत्नी देवालाच प्रश्न विचारताना आणि परिस्थितीशी दोन हात करताना दिसते.
हे दमदार पात्र अभिनेत्री स्नेहल तरडे यांनी साकारले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला या चित्रपटाच्या कथेत हे महिला पात्र नव्हते. त्यामागचा रंजक प्रवास प्रवीण तरडेंनी एका मुलाखतीत उलगडला.
प्रवीण तरडे सांगतात, “2016 मध्ये ‘मिट्टा पुरस्कार’ सोहळ्यानिमित्त मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तिथे बसमधील प्रवासादरम्यान मी ‘देऊळ बंद 2’ची मूळ संकल्पना अभिनेते मकरंद अनासपुरे यांना ऐकवली. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आधारित ही कथा त्यांना खूप आवडली आणि त्यांनी लगेच या चित्रपटासाठी होकार दिला.”
मात्र, त्यानंतर देशभरात कोरोनाचे संकट आले आणि अनेक चित्रपटांप्रमाणेच ‘देऊळ बंद 2’चाही प्रकल्प काही काळासाठी रखडला. कोरोनानंतर पुन्हा चित्रपटावर काम सुरू झाल्यानंतर कथेत मोठा बदल झाला.
याबद्दल प्रवीण तरडे म्हणाले, “चित्रपटावर पुन्हा काम सुरू झाल्यावर माझी पत्नी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे हिने एक महत्त्वाचा मुद्दा माझ्यासमोर मांडला.” ती म्हणाली, “आपल्या मातीतला पुरुष शेतकरी संकटात सापडला, कर्जबाजारी झाला की अनेकदा खचून जातो किंवा टोकाचं पाऊल उचलतो.
पण शेतकरी स्त्री, आई किंवा पत्नी कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपल्या लेकरांना सोडून पळ काढत नाही. ती शेवटच्या क्षणापर्यंत संकटाशी लढत राहते. जेव्हा रोज देवाची पूजा करणारी, नैवेद्य दाखवणारी आणि संपूर्ण घर सांभाळणारी स्त्रीच असते, तेव्हा देवाच्या डोळ्यात डोळे घालून जाब विचारण्याचा पहिला अधिकार तिचाच का नसावा?”
स्नेहल तरडे यांच्या या विचाराने प्रवीण तरडे प्रभावित झाले आणि त्यांनी चित्रपटाच्या पटकथेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संपूर्ण कथेला नवं वळण मिळालं आणि एका लढवय्या, नास्तिक पण वास्तववादी शेतकरी महिलेचं प्रभावी पात्र चित्रपटात समाविष्ट करण्यात आलं.
याच पात्रामुळे ‘देऊळ बंद 2’ला वेगळी भावनिक आणि सामाजिक खोली मिळाली. देव, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि ग्रामीण वास्तव यांचा संघर्ष एका स्त्रीच्या नजरेतून मांडण्याचा प्रयत्न प्रेक्षकांच्या मनाला भिडला.
प्रवीण तरडे यांनी सांगितलेला हा किस्सा केवळ चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल माहिती देणारा नाही, तर एका संवेदनशील स्त्रीच्या विचारामुळे संपूर्ण कथानकाला नवी दिशा कशी मिळू शकते, याचंही उत्तम उदाहरण ठरतो.







