Dhirendra Shastri : “हे लोकही रावणच आहेत, फक्त त्यांनी…”; राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर धीरेंद्र शास्त्रींचा संताप
Dhirendra Shastri : एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhirendra Shastri : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून आता मंदिरातील दानपेटीवर देखील वक्रदृष्ट पडली आहे. त्या पेटीतून चोरी करण्याइतपत मजल गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गंभीर देखल घेत कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला आहे.
तसेच जे काही सत्य आहे, ते लवकरच समोर येईल असे देखील ते म्हणाले आहेत. आता या प्रकरणावर बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कठोर शब्दांत टीका करत ते म्हणाले, “हे लोकही रावणच आहेत, फक्त त्यांनी रूप बदलले आहे. रावणाने माता जानकीचे अपहरण केले होते, तर या लोकांनी राम मंदिराच्या दानपेटीतून कोट्यवधी भाविकांचा विश्वासच चोरला आहे.”
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, या प्रकरणात एफआयआर दाखल झाला असून तपास सुरू आहे. “सत्य कधीही लपून राहत नाही. जसा रावणाचा अंत झाला, तसेच राम मंदिरातील दान चोरणाऱ्यांनाही केवळ कायद्याचीच नव्हे, तर देवाचीही कठोर शिक्षा भोगावी लागेल.” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर अयोध्येतील श्री राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव उर्फ टिन्नू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एसआयटी प्रमुख आणि लखनौ विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांनी सरकारला सादर केलेल्या प्राथमिक अहवालात कठोर कारवाईची शिफारस केली होती. त्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपींची चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या संतोष दुबे याने गंभीर आरोप केले आहेत. केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई होत असल्याचा दावा करत, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अधिकारी डॉ. अनिल मिश्रा, चंपत राय आणि गोपाल राव यांच्या भूमिकेचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : Diana Penty: ‘कॉकटेल’मधील ‘मीरा’ आज काय करते? 14 वर्षांनंतरही डायना पेंटीची जादू कायम






