राज्य मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल! ‘या’ ८ मंत्र्यांना मिळणार डच्चू; तर कोणत्या नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी, पाहा…

devendra fadnavis | ajit pawar | eknath shinde – राज्यातील राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात याबद्दलचा दावा करण्यात आला आहे.
महायुती सरकारमधील ८ वादग्रस्त मंत्र्यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेह-यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोलले जात आहे. यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर राज्यात महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण हे सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीचे काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातही काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. हीच बाब लक्षात घेता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. इतर पक्षातील काही दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यांच्यावर टांगती तलवार?
शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
तर अजित पवार गटातील सातत्याने वादग्रस्त ठरणा-या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे.





