Rajnath Singh – भारतीय नौदलाची जहाजे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून देशाच्या टँकर्सना सुरक्षितपणे मार्गस्थ करत आहेत. त्यामुळे देशात इंधन किंवा वायूची अर्थात गॅसची कोणतीही कमतरता नाही. पश्चिम आशियातील संघर्षामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही ऊर्जा संकटाचा सामना करण्यास भारत सज्ज आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी केले. निवडणुका होऊ घातलेल्या केरळमध्ये आयोजित एका सैनिक सन्मान संमेलनात ते बोलत होते. राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आखाती प्रदेशातील भारताच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मुत्सद्दीपणाचा वापर करत आहेत. आम्ही पश्चिम आशियातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. आपल्या भाषणादरम्यान, सिंह यांनी उपस्थितांना विधानसभा निवडणुकीत भाजपलाच पसंती देण्याचे आवाहन केले. राज्यात बदल घडवून आणण्यासाठी हाच योग्य राजकीय पक्ष आहे, आणि तो सोबत मोदींच्या हमी घेऊन येत आहे. मोदींचे नेतृत्व २४ कॅरेट सोन्यासारखे आहे. ते पूर्णपणे पारखलेले आणि सिद्ध झालेले आहे. १४० जागा असलेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुका ९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत.