Subhash Ghai : “…तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा”; प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाची खास आठवण
Subhash Ghai : आपल्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ या चित्रपट आणि माध्यम संस्थेच्या प्रकल्पासाठी घई गुजरातमध्ये मोदींची भेट घेण्यासाठी गेले होते.

Subhash Ghai : प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या १५ वर्षांपूर्वीच्या एका जुन्या भेटीचा अविस्मरणीय प्रसंग सांगितला आहे. ही घटना २००९ सालची असून, त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. आपल्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल’ या चित्रपट आणि माध्यम संस्थेच्या प्रकल्पासाठी घई गुजरातमध्ये मोदींची भेट घेण्यासाठी गेले होते.
या भेटीचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला होता. ‘मोदी स्टोरी’ या ‘एक्स’वरील अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सुभाष घई यांनी या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. घई यांनी सांगितले की २००९ मध्ये ते गुजरात सचिवालयात पोहोचले असता नरेंद्र मोदी त्या दिवशी मुंबईला जाणार असल्याचे त्यांना समजले. सचिवालयातील अधिकाऱ्यांनी मोदींना घई आल्याची माहिती दिली.
त्यावेळी मोदींनी घईंना थांबवून घेण्यास सांगितले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी आपल्या निवासस्थानी येण्याचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या आपुलकीमुळे घई प्रभावित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांची भेट झाली.
या प्रकल्पासाठी तुम्हाला काय मदत हवी आहे?
नाश्त्यादरम्यान सुभाष घई यांनी आपल्या प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण नरेंद्र मोदी यांच्यासमोर केले. शिक्षणामध्ये भारतीय संस्कृती, कला आणि सिनेमाचा समावेश करण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कला आणि सिनेमाच्या माध्यमातून शिक्षण देणे गरजेचे असल्याचे घई यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या संकल्पनेने मोदी प्रभावित झाले आणि त्यांनी थेट विचारले, “या प्रकल्पासाठी तुम्हाला काय मदत हवी आहे?”
When Subhash Ghai met PM Modi, he expected bureaucracy, instead he got speed-run execution.
Watch the iconic director explain how a visionary idea went from pitch to reality on the fast track!#Modistory #SubhashGhai pic.twitter.com/S5H5ehL4pV
— Modi Story (@themodistory) August 19, 2026
…तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा.
यावर सुभाष घई यांनी विमानतळाजवळ जमीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे सांगितले. परदेशातून येणाऱ्या शिक्षकांना प्रवासात अडचण होऊ नये, यासाठी ही जागा महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर मोदींनी अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे सांगत बडोद्याकडे जाणाऱ्या महामार्गावर योग्य जमीन निवडण्याची मुभा दिल्याचे घई यांनी सांगितले.
तसेच ही संस्था अहमदाबादमध्येच उभी राहावी, अशी सरकारची इच्छा असल्याचेही मोदींनी स्पष्ट केले. “जर माझे अधिकारी या कामात कोणत्याही प्रकारे विलंब किंवा संकोच करत असतील, तर कोणाकडेही जाऊ नका; थेट मलाच फोन करा.” असे मोदी घई यांना म्हणाले होते. १५ वर्षांनंतरही २००९ मधील ती भेट आपल्या आयुष्यातील अत्यंत खास आणि कायम स्मरणात राहिलेल्या आठवणींपैकी एक असल्याचे सुभाष घई यांनी सांगितले.
दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविषयी…
‘कर्ज’, ‘हीरो’, ‘राम लखन’ आणि ‘खलनायक’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले आहे. त्यांच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यांनी अनेक कलकारांना त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले. त्यांच्या चित्रपटांचा आणि त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे.





