Pune : नाट्यगृहांचे बुकींग रद्द करू नये; बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन महोत्सव नाट्यदिग्दर्शकांची एकमुखी मागणी

पुणे – नाट्यगृहाची दिलेली तारीख काढून, बुकींग काढून घेतली जाऊ नये. नाटकाच्या प्रयोगाचे २० दिवस आधीपासून बुकींग होत असते. नाटक सादर करण्याची कलाकारांची आणि पाहण्याची प्रेक्षकांची तयारी झालेली असते. कोणीही विनंती केली तरी नाटकाच्या प्रयोगाची दिलेली तारीख काढून घेऊ नये, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांनी केली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त बालगंधर्व परिवारच्या वतीने आयोजित महोत्सवात नाटकावर बोलू काही या विषयावर दामले, केंकरे आणि कुलकर्णी यांच्याशी राज काझी यांनी संवाद साधला. कोणाच्याही विनंती वरून माझ्या नाटकासाठी दिलेली तारीख रद्द करणार नाही, हे विधान मी कलाकार, निर्माता आणि नाट्य परिषदेचा अध्यक्ष अशा तिहेरी भूमिकेतून करीत आहे, असे दामले म्हणाले.
तसेच, विनोदी कलाकार म्हणून शिक्का असला तरी मी गंभीर भूमिका केल्या आहेत. कलाकार म्हणून जोखीम पत्करायला तयार आहे. पण, माझ्यातील निर्माता ते धाडस करायला धजावत नाही. टिकलेली नाटके वेगळी आणि चाललेली नाटके वेगळी एवढेच मला सांगायचे आहे, असे दामले यांनी नमूद केले.
नाटकाच्या तारखा या प्रामुख्याने राजकीय कार्यक्रमांसाठी रद्द केल्या जातात. राजकीय कार्यक्रम सोमवार ते शुक्रवारी केव्हाही होऊ शकतात. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर कशाला हवे? ते गणेश कला क्रीडा मंच येथेही होऊ शकतात की, ज्यामध्ये अधिक लोकांना सामावून घेता येऊ शकते, असा मुद्दा कुलकर्णी यांनी मांडला. नाटक पाहण्यासाठी वेळ काढावा लागतो, नाट्यगृहात जावे लागते. तरुण प्रेक्षक कायम राहिला. ही अशी गंभीर कला आहे की जिथे प्रेक्षक स्वतःवर अंधार करून घेतात, असेही कुलकर्णी म्हणाले.
करोनानंतरच्या कालखंडात मनोरंजनाची माध्यमे वाढली असली तरी वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या नाटकांना प्रेक्षकांनी स्वीकारले. रंगभूमीच्या इतिहासात विनोदी नाटकांपेक्षा गंभीर नाटके अधिक टिकली आहेत, असे केंकरे यांनी नमूद केले.



