पवना धरण पुन्हा १०० टक्के भरले
पिंपरी – पवना धरण यावर्षी दुसऱ्यांदा १०० टक्के भरले आहे. शहराला दररोज पाणी पुरवठा केला तरी हा पाणीसाठा पुढील वर्षी ३० जून २०२० पर्यंत पुरणार आहे. यामुळे शहरवासायांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
यंदाच्या वर्षी २९ जून रोजी पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तरी देखील गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा जवळपास ४० टक्क्यांनी कमी होता. जुलै महिन्याच्या अखेरीस पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने अवघ्या आठ दिवसांत धरणातील पाणीसाठा ४ ऑगस्ट रोजी १०० टक्के झाला. पवना धरणातून २० हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याने पिंपरी चिंचवड शहरात पूरस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने धरणातील पाणीसाठा पुन्हा ९५ टक्क्यांवर आला. त्यानंतर अधुनमधून आलेल्या पावसाच्या सरींमुळे आज २१ ऑगस्ट रोजी धरणातील पाणीसाठा पुन्हा १०० टक्के झाला आहे.
सध्या पाऊस नसल्याने नदीतील पाणी पातळी कमी झाली आहे. यामुळे आजपासून पवना धरणातून शहरवासियांनाकरिता धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. सप्टेंबर महिन्यातही परतीचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहर, एमआयडीसी आणि इतरांच्या वापराकरता पवना धरणातून दररोज ०.२५ ते ०.३०% पाणी सोडले जाते. हा पाणीसाठा पुढील वर्षी ३० जून २०२० पर्यंत पुरणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची मिटली आहे.