नागपूर – मिंदे गट (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट) आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले होते. ते काल शिवसेनेच्या कार्यालयातही गेले होते. ते तेथेही त्यांचा हक्क सांगायला गेले होते का? असा सवाल माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला आहे. सध्या राज्यात दुसऱ्यांचे मंत्री आणि पक्ष कार्यालय चोरण्याचा प्रकार सुरू आहे. ज्यांच्याकडे काही नवीन निर्माण करण्याचे धाडस नसते तेच चोरी करणे किंवा बळकावणे असल्या बाबींचा आसरा घेतात. त्यावरून राज्यात टोळीचे सरकार आले की काय अशी भिती वाटू लागली आहे अशा धारदार शब्दांत त्यांनी शिंदे गटावर टीका केली.
एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख न करता ठाकरे म्हणाले, त्यांची वृत्ती घाणेरडी आहे. त्यामुळे संघाने आपली काळजी घ्यावी. त्यांनी संघाच्या कार्यालयात कुठे लिंबू वगैरे टाकले का ते संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही पाहावे. दोन दिवसांमध्ये चार मंत्र्यांवर आरोप झाले. सभागृहात विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. सभागृहाबाहेर आंदोलने झाली. खरेतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे होते. मात्र एकाही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे आरोप झाल्यानंतर पुन्हा त्याच मंत्र्यांना क्लिन चीट देण्याचे काम केले जाणार आहे का?
मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी कर्नाटकच्या दोन मंत्र्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे म्हणाले ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचाच डाव आहे. आजपर्यंत मुंबई कोणामुळे सुरक्षित आहे ते मुंबईकरांना चांगले माहिती आहे.
दरम्यान, अधिवेशन संपत आले तरी विदर्भासाठी सरकारने काहीच घोषणा केली नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. 52 हजार कोटींच्या मागण्या आम्ही केल्या होत्या. त्यावर सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रतिक्रिया आल्या नाहीत. विदर्भाला प्रोत्साहन पॅकेज आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी या मागण्या केल्या होत्या. मात्र त्यावर सरकार गप्पच असल्याचे ते म्हणाले.