सांगवी – पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मधील सिंहगड कॉलनी येथे रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. ते खड्डे बुजविण्या ऐवजी महापालिकेने अक्षरशः संपूर्ण रस्त्यातच मुरूम टाकला आहे. त्यामुळे पाऊस आला की दुचाकी या मुरुमामध्ये रुतून बसत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या या अजब कारभाराविषयी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सिंहगड कॉलनीतील रस्त्याची दुरवस्था झाल्याने संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता. पाऊस कमी झाल्यामुळे येथील रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा महापालिकेने प्रयत्न केला. येथील खड्डे बुजविताना संपूर्ण रस्त्यावरच मुरूम टाकण्यात आला. त्यामुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने अक्षरशः रुतून बसल्याने ढकलण्याची वेळ वाहनचालकांवर आली. दुचाकी वाहने घसरून अपघात होत असल्याने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले होते. सामाजिक कार्यकर्ते अमरसिंग आदियाल, तानाजी जवळकर यांनी स्मार्ट सिटी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार केली. पावसाने गेली दोन दिवस दिलासा दिल्याने महापालिकेने तत्परता दाखवत खड्डे बुजविण्यासाठी प्रयत्न केला. या वेळी केवळ खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून खड्डे बुजविण्याऐवजी संपूर्ण रस्त्यावरच मुरूम पसरविला.
तो इतका पसरविला की दुचाकी, चारचाकी वाहने ये-जा करताना अक्षरशः रूतून बसत होती. तर दुचाकी वाहनांना अपघात होत आहेत.
महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित येथील रस्त्यावर अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या मुरमावरून रोड रोलर फिरवून अथवा त्वरित डांबरीकरण करून रस्ता सुरळीत करून द्यावा, अशी मागणी येथील परिसरातील नागरिकांडून होत आहे.
वाहनचालकांना करावी लागतेय कसरत
गरज नसताना संपूर्ण रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची अक्षरशः महापालिकेनेच चाळण करून टाकली. त्यामुळे स्मार्ट सिटीने सिमेंट कॉंक्रीट केलेल्या रस्त्यावर देखील खडी वाळू पसरत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेने केलेल्या कामाचा वाहनचालकांना व नागरिकांना त्रास होत आहे. वाहनचालकांना या मार्गावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.
पादचाऱ्यांना अपघाताचा धोका
या रस्त्याच्या दुतर्फा अनेक नगरे आहेत. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. जवळच अनेक छोट्या मोठ्या शाळा आहेत. भाजीमंडई, व्यापारी वर्ग, बॅंका, संस्था कार्यालये, डेअरी कार्यालये, मंदिरे असल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थी, विद्यार्थिनींची सतत वर्दळ सुरू असते. त्यातच रस्ता अरुंद, दुतर्फा बाजूस वाहने पार्क केलेली, रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पायी चालणाऱ्या नागरिकांनाही या मुरमावरून जपून चालावे लागत आहे.