खर्च वाचला : चहा टपरी, वडापाव सेंटर बंद असल्याचा परिणाम
पिंपरी – करोनाच्या प्रतिबंधतेसाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातही त्याची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे चौकाचौकांमधील चहा टपरी, रेस्टॉरंट, शाकाहारी, मांसाहारी जेवणाचे हॉटेल्स, धाबे, भेळ, पाणीपुरी सेंटर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चवदार खवय्यांना जिभेचे चोचले पुरवायचे तरी कसे असा प्रश्न सतावू लागला आहे. दरम्यान जमावबंदीमुळे बाहेर पडता येत नसल्याने आता रोजच्या नाष्ट्याची सोय घरातच होऊ लागली आहे. त्यामुळे निदान बाहेरचा खर्च वाचल्यानेकुटुंबीय खूश आहेत.
शहरात सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चहा टपरी, रेस्टॉरंट गर्दीने फुललेली असतात. माणसाला दिवसातून एकदा का होईना टपरीवर चहा पिऊन किंवा वडापाव खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. ज्यांना दिवसातून एकदा का होईना टपरीवर चहा, हॉटेलमध्ये नाश्ता किंवा पाणीपुरी खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. अशा खवय्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सरकारकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने सध्या सर्वत्र शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.
ज्यांना दररोज बाहेर हॉटेलमध्ये नाश्ता, जेवण करण्याची सवय आहे अशा खवय्यांनी आता आपल्या घरातच नवनवीन बेत करण्यास सुरुवात केली आहे. चवदार पदार्थ बनविण्याचे आदेश घरातील अर्धांगिनीला सोडले जात आहेत. बाहेर नाही तर किमान घरात तरी चांगला नाश्ता मिळावा यासाठी कुटुंबीयांकडे हट्ट केले जात आहेत. त्यांच्याकडूनही ते पूर्ण केले जात आहेत. घरात बनवून खाल्लेल चांगले पण बाहेर नको अशीही चर्चा आहे. त्यामुळे या करोनाच्या संकटाने खवय्यांना घरातच आवडीचे पदार्थ करून दिले जात आहेत.