Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गेंच्या ‘त्या’ विधानाने इंडियातील घटक पक्षांचीही अडचण; ‘या’ पक्षाला बसणार विशेष फटका !

Mallikarjun Kharge – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रयागराजमधील संगमात भाजप नेत्यांनी स्नान केल्यावर भाष्य केले होते. या विधानावर केवळ भारतीय जनता पार्टीनेच नाराजी व्यक्त केली नाही तर कॉंग्रेस ज्या इंडिया आघाडीचा घटक आहे त्या आघाडीतील इतर पक्षांनीही कॉंग्रेस व खर्गे यांच्या विधानांपासून स्वतःला दूर केले आहे.
वास्तविक समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही संगमात डुबकी मारली आहे. त्यामुळे खर्गेंच्या विधानामुळे त्यांचीही अडचण होणे स्वाभाविक आहे. अर्थात काँग्रेस नेत्यांच्या विधानांपूर्वीच इंडिया आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाला वाटते की ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला आव्हान देऊ शकतात. फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील विजय हे त्याचे एक उदाहरण आहे. राम मंदिर असूनही, भाजप तिथे पराभूत झाला. आता मिल्कीपूर पोटनिवडणुकीतही सपाला त्याचीच पुनरावृत्ती करायची आहे. अशा परिस्थितीत, खर्गे यांचे विधान सपासमोर अडचणी निर्माण करू शकते.
अखिलेश यादव संगमावर स्नान करतानाचे फोटो व्हायरल करण्यात आले आहेत. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ’ब्रायन आणि उत्तर प्रदेश काँग्रेसचेही अनेक नेते महाकुंभात सहभागी झाले आहेत. एका विरोधी नेत्याने खर्गेंच्या विधानाबाबत आपली भूमिका मांडताना सांगितले की, आपल्याला प्रत्येक गोष्टीवर भाष्य करण्याची गरज नाही. लोक कधी आणि कुठे डुबकी मारायची हे स्वतः ठरवू शकतात. इतरांनी त्याबाबत बोलण्याची आवश्यकता नाही.
काँग्रेस नेत्यांच्या विधानांमुळे त्यांच्या मित्रपक्षांना त्रास होण्याची ही पहिलीच वेळ नाही. महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावर नाराजी व्यक्त केली होती. गेल्या वर्षी काँग्रेसने राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, तर काही मित्रपक्षांनी त्यात भाग घेतला होता.
उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्म विधानावर काँग्रेसने घेतलेल्या मौनामुळे अनेक पक्ष अस्वस्थ होते. तसेच मध्य प्रदेश निवडणुकीपूर्वी भोपाळमध्ये झालेल्या संयुक्त विरोधी पक्षांच्या रॅलीत, कॉंग्रेसचेच मध्य प्रदेशातील नेते द्रमुकच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर बसण्यास घाबरत होते. तसे केल्याने राज्यातील जनतेत आपण सनातन विरोधी असल्याचा संदेश जाईल अशी भीती त्यांना वाटत होती व त्यांची भीती खरीही ठरली.
मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले होते?
मध्य प्रदेशात पक्षाच्या एका रॅलीत बोलताना कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाले होते की, ‘गंगेत डुबकी घेतल्याने गरीबी दूर होईल का? तसे केल्यामुळे तुम्हाला खायला मिळेल का? कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा इरादा नाही, कोणाला दु:ख झाले असेल तर मी माफी मागतो; मात्र तुम्हीच सांगा जर मूल उपाशी मरत असेल, शाळेत जात नसेल, कामगारांना मजूरी मिळत नाही असे होत असताना हे लोक हजारो रूपये खर्च करून डुबकी मारत आहेत. जोपर्यंत ते टीव्हीवर चांगले दाखवले जात नाही तोपर्यंत ते डुबकीच मारत राहतात’. असं ते म्हणाले होते.





