नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. विरोधी पक्षांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या वावड्या उठवल्या. पण शिंदे यांनी स्वतःच पुढे येऊन आपली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महायुती म्हणून घेतलेली भूमिका खूप मोठी आहे, असे ते म्हणाले आहेत. शिंदे यांनी बुधवारी सायंकाळी 4 च्या सुमारास एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर नाराज नसल्याचे ठणकावून सांगितले. बावनकुळे म्हणाले, महायुतीचे आमचे नेते एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कालपासून एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याच्या वावड्या उठवत होते. शिंदेंसारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते. पण आज शिंदेंनी स्वतःहून महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे महाराष्ट्रासह देशाच्या जनतेपुढे आपली भूमिका स्पष्ट केली. शिंदेंनी महाराष्ट्राच्या विकासासाठी खूप काम केले. आम्ही पूर्वीपासूनच त्यांचे काम पाहतो. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना शिंदे यांनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केले. त्यांनी फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण केले, असेही ते म्हणाले आहेत. ठाकरेंनी भाजपला धोका दिला उद्धव ठाकरे यांनी भाजपला धोका दिला. हे एकनाथ शिंदे यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेऊन, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन, पुन्हा या महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली. त्यांनी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी विकासात मोठे योगदान दिले. त्यांनी फडणवीस व अजित पवारांच्या मदतीने महाराष्ट्राला पुढे नेले. ते एक कणखर मुख्यमंत्री ठरले, असेही ते म्हणाले. शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा चेहरा म्हणून मराठा व ओबीसी आरक्षण, आदिवासी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय, भाजप सरकारचे प्रलंबित प्रकल्प पुढे नेण्याचे काम केले. मोदींच्या नेतृत्वात महायुती सरकारने विधानसभेत अभूतपूर्व विजय मिळवला. आता यापुढे राज्याचा अधिक विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल. एकनाथ शिंदे रडणारे नाही तर लढणारे नेते आहेत. लढवय्ये राजकारणी म्हणून ते पुढे आले, असेही चंद्रशेखर बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.