Nirmala Sitharaman : “विरोधक भारतीयांच्या कामगिरीला कमी लेखतात”; अर्थमंत्री सीतारामन यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना विरोधक कायमच भारतीयांच्या कामगिरीला कमी लेखतात.

Nirmala Sitharaman – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीका करताना विरोधक कायमच भारतीयांच्या कामगिरीला कमी लेखतात, अशा शब्दांत आरोप करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
तसेच करोना आणि पश्चिम आशियातील संघर्ष यांसारख्या मोठ्या संकटांच्या काळातही विरोधक भारताच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करत आहे. राहुल गांधी जसे चित्र रंगवत आहेत, तसे कोणतेही संकट देशावर ओढवलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीतारामन म्हणाल्या, जेव्हा जेव्हा लोकसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बोलतात, तेव्हा ते केवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करतात आणि भारत व भारतीयांच्या कामगिरीला कमी लेखतात. त्यांना वाटते की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारला कमी लेखत आहेत.
राहुल गांधी सतत असे म्हणतात की पुढील काही आठवड्यांत सर्व काही कोलमडून पडणार आहे. तसेच विरोधी पक्षनेते सतत सांगत असतात की मोठे संकट येणार आहे. परंतु भारतावर असे कोणतेही संकट येणार नाही.
याउलट, प्रत्येक तिमाहीत आणि प्रत्येक वर्षाला भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरत आहे. भारत ही सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असा दावा केवळ केंद्र सरकार करत नाही, तर जीडीपीची आकडेवारीच हे दर्शवते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देखील भारताची प्रगती होत असल्याचे म्हटले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेस नेत्याच्या वारंवार केल्या जाणाऱ्या टीकेमुळे देशाच्या आर्थिक स्थितीबाबत नागरिकांमध्ये चुकीचा समज निर्माण होऊ शकतो, असा आरोप केंद्रीय मंत्र्यांनी केला.





