The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ला राष्ट्रीय पुरस्कार; FTII विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध, “ही फिल्म नाही, फासीवादी अजेंड्याचं शस्त्र”

The Kerala Story: ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून ‘द केरळ स्टोरी’ या सुदीप्तो सेन दिग्दर्शित चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मात्र या निर्णयावरून वाद निर्माण झाला असून अनेकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता पुण्याच्या एफटीआयआय (भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था) च्या विद्यार्थी संघटनेनेही या पुरस्काराच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, एफटीआयआयच्या एका विद्यार्थी संघटनेने ‘द केरळं स्टोरी’ला पुरस्कार दिल्याबद्दल सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, “सरकारकडून अशा प्रकारे दिलेली मान्यता केवळ निराशाजनकच नाही, तर धोकादायकही आहे.”
‘द केरळ स्टोरी’मध्ये केरळ मधील महिलांना इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेत जबरदस्तीने भरती करण्यात येत असल्याचा कथित दावा करण्यात आला होता, ज्यामुळे २०२३ मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटावर मोठा वाद निर्माण झाला होता.
विद्यार्थी म्हणतात, “ही फिल्म नव्हे, एक फासीवादी शस्त्र आहे”
एफटीआयआयच्या निवेदनात म्हटले आहे, “राज्यशक्तीने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, जर एखादा चित्रपट त्यांच्या बहुसंख्याकवादी आणि द्वेषमूलक अजेंड्याशी सुसंगत असेल, तर त्याला पुरस्कार देऊन गौरवले जाईल. ‘द केरळ स्टोरी’ ही कोणतीही फिल्म नाही, तर एक शस्त्र आहे. मुस्लिम समाजाची बदनामी आणि केरळ सारख्या सहिष्णुतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राज्याची प्रतिमा मलीन करण्याचा हा डाव आहे.”
“आम्ही शांत बसणार नाही”
विद्यार्थ्यांनी पुढे नमूद केलं की, “जेव्हा एखादी सरकारी संस्था अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा आणि भीती पसरवणाऱ्या चित्रपटाचा सन्मान करते, तेव्हा ती केवळ कला नव्हे, तर हिंसेलाही समर्थन देत असते. हे भविष्यातल्या लिंचिंग, सामाजिक बहिष्कार आणि राजकीय भेदभावाला खतपाणी घालणारे आहे.”
“आम्ही इस्लामोफोबियाला पुरस्कार देण्यास पात्र मानण्यास तयार नाही आणि आम्ही शांत राहणारही नाही. आम्ही, विद्यार्थी आणि जबाबदार नागरिक म्हणून, अशा फासीवादी प्रवृत्तींविरोधात आवाज उठवत राहू.”
राजकीय नेत्यांचाही विरोध
‘द केरळ स्टोरी’ला पुरस्कार दिल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हा पुरस्कार एका द्वेषमूलक अजेंड्याला प्रोत्साहन देणारा निर्णय आहे.”
तसेच केरळचे शिक्षण मंत्री वासुदेवन शिवनकुट्टी यांनी देखील सोशल मीडियावरून या चित्रपटाला पुरस्कार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करत निवड समितीच्या निर्णयावर टीका केली आहे.





