Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलक मनोज जरांगे मागच्या पाच दिवसापासून (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहेत. आरक्षणासाठी अंतरवाली सराटी याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे.
अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारने चर्चेला यावं, असं प्रतिआवाहन केलं आहे. पण अद्याप सरकारकडून चर्चेसाठी सकारात्मक हालचाली होत नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला ललकारलं आहे. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
आज (29 ऑक्टोबर) उपोषणाच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे यांनी पाणी आणि उपचार घेण्याच्या विनंतीवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. मनोज जरांगे म्हणाले, ‘गावातील लोकांच्या चुली पेटत नाहीये आणि तेही जेवण करत नाहीये. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या, अशी चिट्ठी लिहून मला संदेश देण्यात आला.
मी कधीच या गादीला नाही म्हटलेलो नाही. पण माझा नाईलाज आहे. परंतु गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो आहे. त्यामुळे मला ही कठोर भूमिका घ्यावी लागते. मला माफ करावं. हे तुमचेच लेकरं आहे.’ असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.