राज्यात पावसाचा जोर ओसरला, पण उकाडा वाढला ; विदर्भात पारा ३४ अंशांवर, पुढचे २४ तास कसे असतील..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – राज्यात पावसाचा ओसरल्यामुळे कमाल तापमानत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काहीसा उकाडा वाढला आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत राज्यातील गेल्या २४ तासांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यात धुमाकुळ घातलेल्या अवकाळी पावसाचा मागील तीन ते चार दिवसांपासून जोर ओसरला.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तर मराठवाड्यात काही जिल्ह्यात हवामान कोरडे आहे. त्यामुळे कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. बुधवारी (दि. ५) कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता.
त्यानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सांगली आणि पुणे जिल्ह्यासह घाट विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. तसेच, पुढील दोन दिवस राज्यात कोणताही अलर्ट नसून, कोकण-गोवा आणि मध्यमहाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील. विदर्भात हवामान कोरडे राहील, त्यामुळे कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आज विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अमरावती आणि चंद्रपूर येथे ३३.४, अकोला येथे ३२.१, यवतमाळ परिसरात ३२, यासह अन्य जिल्ह्यातही तापमान ३० अंशाच्या पुढे नोंदविले गेले.




