– प्रमोल कुसेकर
मांडवगण फराटा – 1956 सालची ती भयकंपित रात्र आठवली की अजूनही अंगावर शहारे येतात. गर्जत वाहणारी, भयकंपित भीमा नदी त्यानंतर कित्येक वर्षे अशी दिसलीच नाही. शिरूर तालुक्यातील नागरगावच्या जवळून वाहणारी भीमा त्या रात्री काळरात्र बनून आली होती. भीमेचे आक्राळ-विक्राळ पाणी सर्व गावे आणि शिवार कवेत घेऊन पुढे जात होती.
प्रत्येकांचा काळजाचा ठोका चुकत होता. भीमेने रौद्ररूप धारण करीत सर्वांना कवेत घेतले. अन् होत्याचे नव्हते झाले. यंदाच्या महापुराने 1956 मधील महाप्रलयकारी आठवणी तब्बल 63 वर्षांनंतर जाग्या झाल्या. तत्कालीन ज्येष्ठ लोकांच्या मदतीतून नागरगावचे पुनर्वसन झाल्याने गावकरी सुखाची झोप घेत आहेत. 63 वर्षांपूर्वीचा भयपट डोळ्यासमोर जिवंतरूपाने दिसत आहे.
1956 नंतर अनेकदा तुफानी पाऊस झाला. भीमेला महापूर आला. पण 1956 मधील त्या महापुराची सर कोणीही करू शकले नाही. क्षणाक्षणाला वाढणारे पाणी काळजाचा ठोका चुकवत होते. घाटाचं चौथं तबक बुडालं. पाणी महादेवाच्या मंदिराला बुडवून संपूर्ण गाव त्यात बुडू लागलं, अशी चर्चा त्या महापूरावेळी घराघरात होती. संपूर्ण नदीकाठच्या गावातील कुटुंबांनी बाड बिस्तारा बांधून, किडूक मिडूक घेवून गाव सोडत शेजारच्या गावातील पाहुण्यांकडे कूच केली होती. त्याकाळी वाहनेही नव्हती. गर्जत पडणाऱ्या पावसात नखशिखांत भिजत गावाबाहेर काही कुटुंबे पडली. मात्र, गावातील सर्वच घरे महापुरातील जलतांडव पाहत होती. जागोजागी कंदीलाच्या मिणमिणत्या मंदी प्रकाशात भीषणतेची मूक चाहूल देत होते.
गावातील रस्त्यातून ग्रामपंचायतीचा शिपाई सावध.. हुशार।।’ म्हणत ग्रामस्थांना सावध राहण्यासाठी रात्रभर हाका देत होता. जाणते लोक महापूराच्या पाण्याचा अंदाज घेत नदीकाठानेही फिरत होते. क्षणाक्षणाला भीमेच्या पाण्याने आपली हद्द ओलांडली होती. महापुरातील तांडव गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवत होते. जो तो पाणी गावात शिरेल की काय? या धास्तीत होता. काहीजण गोठ्याकडेही चकरा मारत होते. गावाभोवती भीमेने महापुराचा फास आवळून टाकला होता.
भयभीत गावाची कहाणी…
महापुरामुळे काळजाचा ठोका चुकला : नागरगावमधील ज्येष्ठांनी आठवणी जागविल्या
1956 च्या आठवणी सांगताना नागरगाव येथील बबनराव साठे अजूनही भयभित होतात. साठे म्हणाले की, 1956 -57 या दोन्ही वर्षी आलेल्या महापुरामुळे संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाल्याचे ते अनेक दाखले देतात. त्यावेळी चावडीवरील रेडीओवरून पूर येणार असल्याची माहीती मिळाल्याचे ते सांगतात. त्यावेळी गावचे पाटील कोंडीराम शेलार यांनी ग्रामस्थांना तत्काळ गाव खाली करण्याच्या सूचना दिल्या. गावात त्यादिवशी हरिनाम सप्ताहाचा जागर सुरू होता. प्रत्येकजणांची कुटुंबासह गावातून बाहेर पडण्यासाठी घालमेल सुरू होती. काहीजण अडकलेल्या ग्रामस्थांना होडीच्या साहाय्याने बाहेर काढत होते. गावचे आराध्यदैवत असणारे ब्रिजबिहारीदास बाबा हे मंदिरात अडकल्याचे समजले. पारगाव येथील ग्रामस्थांनी जिवाची पर्वा न करता महापूर असतानाही होडीतून बाबांना वाचविल्याचे बबन साठे अभिमानान सांगतात.
1956 नंतर ग्रामस्थ निर्धास्त
1956 साली भीमेचा महापूर प्रलयकारी होता. नागरगावाला विळखा घातल्यामुळे नागरगाव गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यानंतरच्या काही वर्षांत ऐरणीवर आला. 1958 मध्ये गावाचे नवीन ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. महापूर आलेल्या ठिकाणीही ग्रामस्थ आजही उंच ठिकाणी घरे बांधून राहत आहेत. भीमेला महापूर आला तरी आजही नागरगाववासीय निर्धास्त आहेत. ते त्याकाळच्या दूरदृष्टीच्या लोकांमुळेच. गावातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे गाव आज सुखाची झोप घेत आहे. मात्र, यावेळच्या महापुराने त्यांच्या आठवणी भयपटात रुपांतरित झाल्या आहेत.
पोशिंद्यांची पिकेच पाण्याखाली गुदमरली
महापुरात संपूर्ण गाव पाण्याखाली होते. आक्राळ- विक्राळ महापुराने गावातील सर्व वाडे जमिनदोस्त झाले होते. मंदिरे जलमय झाली होती. सलग दोन पुरात आम्हाला विशेषतः आंधळगाव, आंबळे, न्हावरे या गावांनी जेवणाची सोय केली. पूर ओसरला पण होत्याचे नव्हते झाले होते. घरातील काही वस्तू वाहून गेल्या तर काही खराब झाल्या होत्या. गावात फक्त पडलेल्या भिंती नजरेस पडत होत्या. त्यावेळी ज्वारी, बाजरी, हुलगा,मटकी, तूर आदी पिके पाण्याखाली गुदमरून गेली होती.
असे घडले दातृत्वातून पुनर्वसन
1958 साली गावचे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करायचे ठरले. परंतु पुन्हा गावाला पुराचा तडाखा बसू नये म्हणून नदीपासून एक किलोमीटर अंतरावर गावाचे स्थलांतर नियोजनबद्ध करून पेठाचे बांधकाम करण्यात आले. तत्कालीन शासनाने खारीचा वाटा उचलल्याचे ग्रामस्थ सांगतात. नागरगावचे स्थलांतर झाल्यानंतर शिरूरच्या पूर्व भागात प्रथमच या गावात 1958 मध्ये विद्युतपुरवठा सुरू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. संपूर्ण गावचे स्थलांतर एका ठिकाणी करायचे म्हटल्यावर कोणाच्या जागेत स्थलांतर करायचे, हा प्रश्न उभा ठाकला. परंतु दातृत्ववान नरसिंग साठे यांनी आपली बागायती जमिन कमी बाजारभावात गावाला देऊ केली. त्यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक आबासाहेब नरसिंग साठे, कोंडीराम शेलार, पांडुरंग शेलार, नामदेव तुळशीराम साठे, तुकाराम शंकर साठे, साहेबराव साठे, खंडेराव शेलार, विठोबा खुळे यांनी 3 पैसे प्रतिगुंठा याप्रमाणे वर्गणी जमा करून ही जागा खरेदी केली. त्यानंतर नागरगावचे स्थलांतर झाले. नरसिंग साठे यांच्या दातृत्वातून पुनर्वसन झाल्याच्या आठवणी ज्येष्ठ लोक आजही सांगतात.