Bhima River – दौंड तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या भीमा नदी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातच तळ गाठल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे अनेक शेतकरी शेतीपंप खाली घेण्यासाठी नदीकाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. याचा सर्वाधिक फटका देऊळगावराजे येथील शेतकऱ्यांना बसला आहे. येथील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत बसवले गेले नाहीतच, उलट ते नदीकाठच्या बाजूला जसेच्या तसे अवस्थेत पडून असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरवाजे वेळेत टाकले नसल्यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवता आले नाही, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जात आहे. परिणामी नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतीपंप व पाइपलाइन फुटबॉल उघड्यावर झाले आहे. सध्या गहू, हरभरा व कांदा ही पिके अंतिम टप्प्यात असताना पाण्याअभावी उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी पर्यायी पाण्याच्या स्रोतांचा शोध घ्यावा लागत आहे. काही शेतकरी विहिरींचा आधार घेत आहेत, तर काहींनी नदीपात्रात पाणी असेपर्यंत शेतीपंप चालवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत बसविले असते तर काही प्रमाणात पाणी साठवून शेतीला दिलासा मिळाला असता, अशी भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले लक्ष दरम्यान, प्रशासनाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन देऊळगावराजे येथील बंधाऱ्याचे दरवाजे त्वरित बसवावेत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकरी दस्तगीर इनामदार यांनी केली आहे. सध्या संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण असून शेतकऱ्यांचे लक्ष प्रशासनाच्या निर्णयाकडे लागले आहे.