सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका व प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवारासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर मोठ्या पोलीस बंदोबस्तात काल अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनंतर सोलापुरात तणावाचे वातावरण असून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सोलापुरात येऊन सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी वातावरण अत्यंत भावनिक झाले होते. “माझे पप्पा मला आणून द्या… मी माझ्या पप्पांना भेटलेच नाही,” असा हृदयद्रावक टाहो बाळासाहेब सरवदे यांच्या चिमुकल्यांनी अमित ठाकरेंसमोर फोडला. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अमित ठाकरेही गहिवरून गेले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले, “राजकारण काहीही असो, पण राजकारणासाठी कोणाचा जीव जाणं अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.” दरम्यान, मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला असून, यामागे किरण देशमुख यांचा हात असल्याचा दावा केला आहे. सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “सत्तेच्या हव्यासापोटी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. भाजपचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला आहे,” असे त्या म्हणाल्या. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या राजकीय वादातून एका निरपराध मनसे पदाधिकाऱ्याचा जीव गेल्याने सोलापूर हादरून गेला असून, या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.