कुरापती पाकिस्तानच्या, पण जयघोष भारताचा ! १९४७ पासून ते आजपर्यंत पाकचा हरलेला इतिहास पाहा….

India | Pakistan – ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने अवघ्या २५ मिनिटांत अचूक हल्ला केला आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयासह नऊ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उद्ध्वस्त केली. लष्कराने केवळ पहलगाममधील बर्बर दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला नाही तर स्वातंत्र्यानंतर संसद भवन, मुंबई, पठाणकोट आणि अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या अनेक हल्ल्यांचाही बदला घेतला. भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे, तरीही पाकिस्तान आपल्या कारवाया थांबवत नाही.
१९४७ : पहिले भारत-पाकिस्तान युद्ध
भारत आणि पाकिस्तान या नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांमध्ये तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी लढले गेलेले हे युद्ध. याला पहिले काश्मीर युद्ध असेही म्हणतात. ऑक्टोबर १९४७ मध्ये जेव्हा पाकिस्तान समर्थित आदिवासी हल्लेखोरांनी राज्यावर हल्ला केला तेव्हा त्याची सुरुवात झाली.
महाराजा हरि सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचे भारतीय संघराज्यात विलिनीकरण केल्यानंतर, भारताने या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी आपले सैन्य पाठवले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला. हा संघर्ष जानेवारी १९४९ पर्यंत चालू राहिला. संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरचे विभाजन झाले आणि दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषा अस्तित्वात आली.
१९६५ : दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध
५ ऑगस्ट १९६५ रोजी काश्मीरबाबत सशस्त्र संघर्ष सुरू झाला. नियंत्रण रेषा ओलांडून हजारो पाकिस्तानी सैनिक स्थानिक अतिरेक्यांच्या वेशात भारतीय हद्दीत घुसले. ऑपरेशन ‘जिब्राल्टर’ म्हणून ओळखले जाणारे हे गुप्त ऑपरेशन, प्रदेश अस्थिर करणे आणि स्थानिक बंडखोरी भडकवणे या उद्देशाने होते.
भारताने प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई सुरू केली. ही कारवाई आंतरराष्ट्रीय सीमेवर पूर्ण प्रमाणात लढाईत रूपांतरित झाली. हे युद्ध २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत चालू राहिले. दोन्ही बाजूंनी सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदीवर सहमती दर्शविली.
१९७१ : बांगलादेश मुक्ती युद्ध
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानवर (आता बांगलादेश) केलेल्या अत्याचारामुळे आणि स्वातंत्र्याच्या मागणीमुळे सुरू झाले. बांगलादेशी स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देण्यासाठी भारत युद्धात सामील झाला. पूर्व आणि पश्चिम दोन्ही आघाड्यांवर झालेल्या भीषण लढाईनंतर, १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली. या युद्धामुळे बांगलादेशची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली.
१९९९ : कारगिल युद्ध
१९९९ चे कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये मे ते जुलै दरम्यान लढले गेले. जम्मू आणि काश्मीरमधील कारगिल सेक्टरमधील शिखरांवर पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेक्यांनी कब्जा केल्यावर संघर्ष सुरू झाला. भारताने ऑपरेशन ‘सफेद सागरसह’ हवाई दलाच्या मदतीने ऑपरेशन ‘विजय’ सुरू केले. हे युद्ध २६ जुलैपर्यंत चालू राहिले. भारताने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना हाकलून लावल्यानंतर कारगिलच्या टायगर हिलवर ताबा मिळवला. २६ जुलै हा दिवस आता कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
२०१६ : उरी हल्ला
१८ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला केला. यामध्ये १९ भारतीय सैनिक शहीद झाले. याचा बदला घेण्यासाठी भारताने २८-२९ सप्टेंबर रोजी नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केले. भारतीय सैन्याने पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी लाँच पॅडना लक्ष्य केले, ज्यामुळे घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले.
२०१९ : पुलवामा हल्ला
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यामध्ये ४० सैनिक शहीद झाले. प्रत्युत्तरादाखल, भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर हवाई हल्ला केला. १९७१ च्या युद्धानंतर भारताने पाकिस्तानी हद्दीत खोलवर असलेल्या तळावर लढाऊ विमानांचा वापर करून हा पहिलाच हवाई हल्ला होता. यामध्ये जैश कॅम्प उद्ध्वस्त झाला आणि अनेक दहशतवादी मारले गेले.





