Bihar Election 2025 : प्रचार तोफा थंडावल्या.! बिहारमध्ये अंतिम टप्प्यासाठी मंगळवारी मतदान

पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या राज्यातील १२२ जागांसाठी मंगळवारी (११ नोव्हेंबर) मतदानाची प्रक्रिया होईल. पहिल्या टप्प्यात बिहारच्या इतिहासातील आजवरचे सर्वोच्च मतदान झाले. तो विक्रम अंतिम टप्प्यात मोडला जाणार का याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केवळ बिहारचेच नव्हे; तर संपूर्ण देशाचे लक्ष १४ नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागेल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. त्यातील १२१ जागांसाठी ६ नोव्हेंबरला विक्रमी ६५.०८ टक्के इतके मतदान झाले. त्या भरघोस मतदानामुळे निवडणुकीची रंगत आणखीच वाढली आहे. त्यातून अंतिम टप्प्यासाठी राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी प्रचाराची धार आणखी वाढवली. साहजिकच, राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापले.
सत्ताधारी एनडीएच्या प्रचाराचा किल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लढवला. त्यांच्या दिमतीला केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचीही फौज होती. विरोधकांच्या महाआघाडीच्या प्रचाराची धुरा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राजदचे नेते तेजस्वी यादव आदींनी सांभाळली.
बिहारच्या राजकीय रणसंग्रामात प्रथमच जन सुराज पक्षानेही दंड थोपटले आहेत. त्या पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनीही प्रचाराचा धुरळा उडवून दिला. आता बिहारमधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद पणाला लावली. अंतिम टप्प्यासाठी पात्र मतदार त्यांचा कौल देतील. त्यानंतर बिहारचा जनादेश काय असणार ते निकालातून समोर येईल.





