कोपरगाव, (प्रतिनिधी)- शहरातील अवैध व्यवसाय त्वरीत बंद व्हावे, तसेच १९ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या गोळीबारातील जखमी इसमाने आमदार काळे व त्यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांचे नाव घेतले होते. त्याबद्दल सखोल चौकशी व्हावी, यासाठी दत्ता काले, विजय आढाव, बबलू वाणी, विनोद राक्षे, संदीप देवकर उपोषणास बसले होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर अन्नत्याग करत मागण्या मान्य करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, युवानेते विवेक कोल्हे, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी उपोषणकर्त्यांचे म्हणणे जाणून घेत मागणीनुसार गोळीबार घटनेतील आमदार व त्यांचे स्वीय सहाय्यकांवर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी व अवैध धंदे बंद होण्यासाठी कार्यवाही करू, असे सूचित केल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. सध्या सुरू असलेले चक्री, बिंगो, गांजा विक्री, कुत्ता गोळी, रेशन काळा बाजार आणि अवैध शस्त्र कारखाना असे अनेक अवैध व्यवसाय शहरात वाढले आहे. त्यातूनच व्यसनाधिनता वाढत चालली आहे. व्यसनामुळे टोकाची गुन्हेगारी फोफावली असून, खून, मारामाऱ्या,चोऱ्या, महिला छेडछाड हे प्रकार देखील वाढीस लागत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक दहशतीमध्ये असून, भीतीचे वातावरण अनेकांमध्ये असल्याच्या नागरिकांमधून भावना व्यक्त झाल्या. भयावह दहशतीमुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होत आहे.सोने चोरीसारखे अनेक गुन्हे अलीकडच्या काळात घडले व पुरावे असून त्याचा छडा अद्याप लागला नाही. अल्पवयीन युवक व्यसन आणि गुन्हेगारीकडे मोठ्या संख्येने वळले असून, यामागे राजकीय वरदस्ताने अवैध व्यवसाय सुरू असल्याचे समोर येत आहेत, अशी भूमिका कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली. गोळीबार प्रकरणातील जखमी व्यक्तीने आरोप केलेल्या व्हिडिओतील नावांची चौकशी होऊन त्यांचे फोन कॉल डिटेल्स, सीडीआर तपासून चौकशी होण्याची जी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे त्याची पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी. आम्ही घटना घडल्याबरोबर आपल्याला निवेदन दिले आहे. त्याला दहा दिवस उलटून जाऊन अद्यापही सर्व नावांची चौकशी झालेली नाही, अशी भावना नागरिकांची असल्याने पोलिसांनी कुठल्याही दबावात न येता नि:पक्षपणे या घटनेचा सखोल तपास करावा, असेही कोल्हे म्हणाले. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या उपअधीक्षक वमने यांच्यासमोर मांडल्या. त्यावर त्यांनी आम्ही या प्रकाराची सखोल चौकशी करू व अवैध धंदे बंद करण्यासाठी कार्यवाही करू, असे आश्वस्त केल्यानंतर उपोषण तूर्तास स्थगित करण्यात आले. आगामी काळात या प्रकरणात असणाऱ्या नावांची चौकशी व मोबाईल कॉल डिटेल्स तपासणी झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. या आंदोलनास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय व मित्र पक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे, ज्येष्ठ नागरिक मंचाचे विजय बंब, सुधीर डागा व्यापारी महासंघ यांच्यावतीने या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यात आला.आजी-माजी नगराध्यक्ष,नगसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.